Skip to main content

भोग आणि ईश्वर ४९७

भोग आणि ईश्वर  ४९७  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
  
शरण, स्मरण श्रद्धा यांची एकत्रित नितांत आवश्यकता असते. श्रद्धा किती महत्वाची ते आपण गेल्या दोन तीन भागात पाहिलं. स्मरण आणि शरण हे एकत्रित का असावेत यासाठी गीतेतील आणि विष्णूसहस्त्रनामतील एक एक अश्या दोन श्लोकाचा आधार घेऊन, त्यांचा अर्थ समजून घेतला पाहिजे. ते दोन श्लोक पूढीलप्रमाणे : 

सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज।
अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः।।१८.६६।। 

यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात्।
विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे।। 

एक श्लोक म्हणजे भगवंताचं स्वतःचं वचन आहे. ज्यामध्ये ते आग्रहाने मांडतात की, सर्व धर्मांचा म्हणजे सर्व कर्म,कर्मफल, कर्तव्य यांचा त्याग करून, मला एकट्याला शरण ये. आता त्यज्य म्हणजे त्यागणे. पण त्याच गीतेत अर्जुनाला, भगवंत स्वतः सांगतात की, धर्माचा त्याग करणं हे महापाप आहे. मग याची सांगड कशी घालायची. मुळात धर्माचा त्याग करणे म्हणजे इतिकर्तव्यता करताना, त्याच्या फलावर असलेला आपला मूलभूत अधिकार, आपली आसक्ती, आपल्या वासना, इत्यादींचा मोह त्यागणं. 

म्हणजे त्यांच्या फलाची अपेक्षा, श्रीचरणी वाहून, पुढील कर्मात व्यस्त होऊन जाणं. धर्मत्याग न करता फलत्याग करणं. त्याने काय साध्य होईल तर तोच भगवंत, वचन दाता अर्थात guarantor ही शाश्वती देतो की, मी तुला तुझ्या सर्व पापातून मुक्त करीन, याची खात्री बाळग. म्हणून शरण जाणं महत्वाचं आहे. 

पण शरण जाणं म्हणजे नक्की काय, तर आपल्या सर्व भावांना भावनांना आवरतं घेणं. पण शरण जाणं, तेही प्रत्यक्ष भगवंताच्या चरणी, प्रत्यक्षात फक्त अत्यंत भाग्यवंतांना, हा योग प्राप्त झाला आहे. म्हणजे बाकीचे आपल्या मनात वा हृदयात ईश्वराचं अस्तित्व कल्पून, त्याला ही शरणागती नमस्कार, संकल्प, भावप्रकट करून, व्यक्त करू शकतात. म्हणजेच हे शरण जाणं साधत असतानाच, त्याला मनात, हृदयात प्रत्येक शरणा गतीच्या वेळेस, स्मरणे हे क्रमप्राप्त आहे किंवा ते ओघानेच आले.. 

उदाहरण घ्या की, आपण लांबवर असलेल्या आपल्या भावाची आठवण काढतो त्यानंतरच, त्याच्याबद्दलचे भाव मनात व हृदयात उमटतात. म्हणजे शरण जाण्याआधी स्मरण, तद्नंतर शरण ही सततची साखळी झाली पाहिजे. कारण एक कर्तव्य संपल्यावर वा कर्म सरल्या वर, पुढे काहीच नाही, हे अशक्य आहे.  म्हणजेच प्रत्येक क्षणाला कर्मार्पण, स्मरण व शरण अशी ही एकंदरीत साखळी असायला हवी. 

म्हणजेच भगवंतांनी स्वतः सांगितलेलं वचन व व्यासांच्या माध्यमातून मांडलेला श्लोक हे परस्पर पूरक आहेत. याचंच अजून चिंतन उद्याच्या भागात करूया. तोपर्यंत नामातून स्मरण व शरण दोन्ही सध्या करूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
११/०४/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...