भोग आणि ईश्वर ५०७ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
मोह लोभ द्वेष क्रोध हे सर्व काही मर्यादेत असल्यास,त्या जीवनात आनंद निर्माण करतात. यातील सर्व रिपू या साठी आहेत की, यांच्या प्रभावात आलेला मनुष्य, आपलं संतुलन कधी हरवून बसेल ते सांगता येणार नाही. पण यांचा सत्कार्या साठी किंवा सद् हेतूने उपयोग, काही कारणास्तव करता येऊ शकतो. पण ही मर्यादा पाळणं किंवा त्याचं उल्लंघन होऊ न देणं, हे समजायला आणि जमायला तेवढाच निग्रह आणि स्वनियंत्रण अत्यंत महत्वाचं आहे.
उदाहरणार्थ शत्रूंशी वागताना किंवा त्यांच्याशी युद्ध प्रसंगात त्या शत्रूबद्दल क्रोध आणि द्वेष असावा,ज्यायोगे आपल्या सैनिकांना त्वेषाने त्या शत्रूवर तुटून पडता येईल आणि शत्रूचा निःपात करता येईल. पण हा क्रोध व द्वेष इतकाच असावा की, तो आपल्या नियंत्रणात असेल. म्हणजेच मर्यादा हा या जगतात सुखाचं जीवन जगण्याचा मूलमंत्र आहे.याचा प्रत्यय सद्यस्थितीत आपल्याला येतो आहेच.
विशेषतः इंटरनेट, समाज माध्यमं, त्यावर वावर, अनेक फसव्या साईट्स वगैरेंचा येणारा अनुभव या सर्वात आणि आताच्या धकाधकीच्या जीवनात एकूणच वागण्यातील, बोलण्यातील, खाण्यातील, जगण्यातील, संबंधातील वावरात मर्यादा पालन हा एक कटाक्षाचा भाग असला पाहिजे. यातून कटुतेचे, संघर्षाचे प्रसंग टाळता येतीलच, पण जीवनाचा आनंद द्विगुणित होईल.
हा झाला प्रापंचिक भाग. पण अध्यात्मिक वाटेवर, भोगा तून वा उपभोगातून ईश्वराकडे जाण्याच्या मार्गावर, या मर्यादा पालनाचं महत्व नक्कीच लाभदायक आहे. विशेषतः मनाला आवर घालण्याची सवय लावून घेण्या साठी, त्याद्वारे मनावर मर्यादित लगाम घालून, आत्मोद्धार व आत्मोन्नतीसाठी, या मर्यादा पालनाचा निश्चित लाभ होऊ शकेल. मनाला एकाग्र करण्याच्या प्रयत्नात आपल्या व्यक्तित्वात मर्यादा पालनाचा लाभ बहुअंगांनी होऊ शकेल.
कारण मनाला जर प्रत्येक गोष्टीत मर्यादा पालनाची सवय जडलेली असेल तर, साधनेतील प्रगतीसाठी आवश्यक नेट आणि ठामपणा, हा या मर्यादा पालनासह ओघानेच येतो. एका ठराविक जागी, ठराविक वेळ, काही काळ स्थिर राहून साधना करण्यासाठी मनाला काही प्रमाणात बंधनात बांधणं आवश्यक असतं. असं नियंत्रण जर जीवनाचा भाग असेल तर, मन एकाच भावात रममाण न होता,प्रत्येक भावात आपल्या मर्यादेत राहून, मनाला त्या स्थितीत अडकवून न ठेवता, काळ व वेळ याप्रमाणे वागण्याची सवय जडेल.
वैराग्यवृत्ती येण्यासाठी कुठे थांबावं हे आधी ज्ञात होणं आणि त्यानुसार मनाला खरच तशी सवय लावून घेणं, हे महत्वाचं आहे किंवा ही या वैराग्याची पहिली पायरी आहे, असं समजायला हरकत नाही. वैराग्यवृत्ती परमार्थाचा आणि ज्ञान व चिंतन यांचा पाया आहे. एखाद्या विषयातील, विषयवस्तूत, मनाचा भाव न अडकणं आणि तिथे मन न रेंगाळता प्रवाही राहून, कुठेही न गुंतता साधनेत वा लक्ष्यात ते मन केंद्रित करून, साधनेतील वा लक्ष्यावरील ध्यान विचलित न होऊ देणं म्हणजे वैराग्यवृत्ती.
वैराग्यावर अजून चिंतन आवश्यक आहे, ते उद्याच्या भागात पाहूया. पण तोपर्यंत आपल्या साधनेवर लक्ष केंद्रित करत राहणं आवश्यक आहे.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२१/०४/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment