भोग आणि ईश्वर ५०९ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
विरक्ती म्हणजे अनासक्ती. पण अनासक्ती ऐच्छिक आणि अनैच्छिक दोन प्रकारची असते.परिस्थिती व जबाबदारी मुळे, लादली गेल्यामुळे जर अनासक्ती आली असेल तर, त्या अनासक्तीला अनैच्छिक अनासक्ती म्हणावं लागेल. म्हणजे एखादी गोष्ट, वस्तू मला हवी आहे, पण परिस्थिती मुळे मला माझी ती इच्छा मारून, जगावं लागतं.
म्हणजे मग खरी विरक्ती कशात आहे किंवा कशाला म्हणता येईल. मुळात खरी विरक्ती यायला आणि आसक्ती जायला, माणसाला खऱ्या ज्ञानाची गरज आहे.खरं ज्ञान म्हणजे लौकिक जगताचं ज्ञान सोडून पारलौकिक जगताचं, विश्वाच्या नियंत्याचं, कर्माचं, कर्मफलाचं, आत्मतत्वाचं, देहाच्या प्राप्तीचं आणि मानव जन्माचं. हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर, जीवनाकडे, गरजांकडे, इच्छांकडे, आसक्तीकडे बघण्याचा मानवी दृष्टिकोन बदलून जातो.
ज्याचा सदर दृष्टिकोन बदलला आहे, त्याला खऱ्या गरजा व खरी आसक्ती, खरी इच्छा व वासना यांमधला फरक ज्ञात होतो. त्या ज्ञानाने, चर्मचक्षूंच्या पलीकडे असलेल्या, मनःचक्षुना दृष्टी प्राप्त होते किंवा असलेली उघडली जाते. माणूस अंतर्मुख होऊन, माझ्यातील खरा मी शोधतो. म्हणजेच या देहात वसलेल्या आत्म्याचा शोध घेतो. असा मनुष्य भावाच्या पलीकडे गेलेला असतो.म्हणजे लौकिका तील भाव नष्ट होत जातात आणि ईश्वराच्या ओढीचे भाव त्याजागी प्रकट व्हायला लागतात.
कोहमची जागा हळूहळू सोहम घेतं. यातून अनैच्छिक अनासक्ती खऱ्या ज्ञानाने ऐच्छिक अनासक्तीत परिवर्तित होते. इच्छा आणि गरजा या देहापलीकडे केंव्हाच गेलेल्या असतात. जीवनातील, देहातील व मनातील वासना मोह लोभ मद मत्सर क्रोध व काम यांना हळूहळू विराम मिळत जातो. या शत्रूंना ओळखून त्यांना नामोहरम न करता, त्यांना ज्ञानाच्या माध्यमातून समजावून, मनाला शांत करत, वासनेच्या पलीकडे जाणं, असा मनुष्य जाणतो.
म्हणूनच आसक्तीरहित, वासनारहीत, निरहंकारी तरीही सशक्त जीवन जगण्याचा आनंद, विरक्तीतून प्राप्त होतो. असक्ती विरहित वृत्ती म्हणजे विरक्ती. जाणीवा ज्ञान यांच्या प्रगल्भतेमुळे गरजेची अनिवार्यता, देहाच्या नव्हे तर आत्म्याच्या कसोटीवर पडताळून पहायला मानवी मन शिक्षित होतं. किंबहुना प्रत्येक गरजेत, त्या गरजेची आवश्यकता, अत्यावश्यकता व अनावश्यकता, यांचा शोध घेऊन, त्यावर ठरवणं की, खरच देह मागतोय की आत्मा, हे तपासून मग निर्णय घेणं.
सोस, हव्यास, लोभ यापेक्षा देह या वास्तुशिवाय चालेल की नाही, याचा शोध घेऊन अनावश्यक गरजा कमी करत बंद करुन घेणं. अश्या प्रकारे आलेली विरक्ती, ही ऐच्छिक अनासक्तीतून येते, जी खरी सकारात्मक असते. अशी विरक्ती ही वैराग्याची पहिली पायरी आहे. म्हणजे ऐच्छिक अनासक्ती ते विरक्ती, हे ध्यानात आलं असेल तर, विरक्ती ते वैराग्य याबद्दल उद्याच्या भागात विचार करूया. तोपर्यंत नामाने जे साधले जाते, ते नाम घेऊनच साध्य करूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२३/०४/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment