Skip to main content

भोग आणि ईश्वर ४९४

भोग आणि ईश्वर  ४९४ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
  
यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात्।
विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे।। 

स्मरणे म्हणजे एखाद्या गोष्टीला,क्रियेला, व्यक्तीला स्मरणात ठेवणे. म्हणजे विस्मरण होऊ न देणे. यामध्ये बुद्धी, मन आणि या दोन्हीना जोडणारा देह या तिन्हींचा सहभाग अपेक्षित आहे. एखादी गोष्ट विस्मृतीत जाऊ नये किंवा मुद्दाम लक्षात राहावी म्हणून व्यवहारात आपण खास उपाय करतो. आजकाल तर आपण स्मरणात राहण्यासाठी reminders set करतो. अगदी संगणक, भ्रमणध्वनी यामध्ये विशेष सोयी करून घेतो. 

त्यानुसार त्या त्या वेळी आपल्याला यंत्रणेकडून आठवण करून दिली जाते आणि आपण त्या गोष्टी वा ती क्रिया करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जे महत्वाचं आहे ते विसरून जाऊ नये यासाठी आपण विशेष जागरूक असतो. याचं महत्वाचं कारण म्हणजे एकतर ती गोष्ट करण्यात आपला काही लाभ होणार असतो किंवा न करण्यात काही हानी होणार असते. म्हणजे लाभ आणि हानी यांच्याशी आपल्याला काही देणंघेणं असतं, तिथेच आपण जागरूक असतो, असं सर्वसामान्यपणे म्हणता येईल. 

काही लाभ हानी हे व्यावहारिक व प्रापंचिक असतील किंवा काही लाभ हानी मानसिक असतील. पण असतात हे नक्की. मानसिक म्हणजे ज्यावेळी आपण एखादी गोष्ट वा कर्म आपल्याला समाधान आनंद वा शांतता लाभावी यासाठी करतो. म्हणजेच एखादी गोष्ट न केल्याने लाभ नसेल पण न केल्यास आपल्या मनाला रुखरुख किंवा बोच लागून राहील, या भावने पोटी आपण स्मरणात ठेवतो. 

या झाल्या नित्य किंवा प्रासंगिक स्मरणाच्या देह मन व बुद्धी यांच्यासाठीच्या गोष्टी. पण  एक गोष्ट जी खूपच मूळ किंवा बेसिक आहे, जी आपल्या जन्ममरणाचं कार्यकारण आहे, ती करणं, हेच मुळी जन्माचं उद्देश आणि साध्य आहे, तीच गोष्ट वा कर्म करायला आपण जन्मोजन्म वाया घालवतो. ती म्हणजे, ज्या ईश्वराने,  त्याच्या अंशातून आपल्याला निर्माण करून, या भूलोकी धाडलं, त्या ईश्वरी परमंशाला स्मरणं, विसरून जातो. 

बरेचवेळा आपण ईश्वराच्या स्मरणाचा संबंध, आपल्याला येणाऱ्या कडूगोड अनुभवांशी जोडतो. कर्मफल संबंध आणि फलाचा परिपक्व झाल्यानंतर समोर येण्याचा नियम माहीत असूनही आपण त्याचा संबंध अवकृपेशी जोडतो. एखादी, आपल्याला व्हावीशी वाटणारी गोष्ट न होता, दुसरीच न आवडणारी वा नको असलेली गोष्ट घडल्यास, आपण ईश्वरी कोप वा अवकृपा मानतो. जे सर्वथा चूक आहे. 

कारण सर्वात प्रथम, ईश्वर सहसा कर्मफल साखळीत ढवळाढवळ करत नाही. तरीही ईश्वर हा मुळातच सकारात्मकता व सात्विकता यांचं द्योतक आहे. म्हणजे जर एखादी गोष्ट आपल्याला व्हावी असं वाटतं पण झाली नाही, याचा अर्थ न होण्यात आपलंच हित आहे. म्हणूनच आपल्या थोड्याश्या पुण्याईने, निदान ईश्वराने, आपलंच हित होईल वा व्हावं, हे पाहिलं. 

या कृपा अवकृपा यावर आपण उद्या चर्चा करू, तोपर्यंत नाम हेच तारक आहे हे ध्यानात धरून, नाम घेणं, सुरूच ठेवू. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०८/०४/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...