ज्ञानेश्वरी भावार्थ ८
अध्याय ६ ओवी १३७
देवकीया उदरीं वाहिला । यशोदा सायासें पाळिला ।
कीं शेखीं उपेगा गेला । पांडवांसी ॥६-१३७॥
या अध्यायात या टप्प्यावर माऊली अर्जुनाचं गुणगान करण्यात मग्न आहेत. माऊली स्वतः म्हणतात सुद्धा की, मला आता का कुणास ठाऊक पण भगवंतापेक्षा, गीते पेक्षा किंवा त्या युद्ध प्रसंगात भगवंतांनी गीता कथन केलं, यापेक्षाही, भगवंताच्या या परम भक्ताचं कौतुक आणि प्रेम जास्त वाटतं. हे म्हणणारे स्वतः माऊली कृष्णवतार मानले जातात.
मला याचं कारण असं वाटतं, की कृष्णवतारात गीता सांगताना, कदाचित अर्जुनाचं वाटणारं कौतुक किंवा अर्जुनाबद्दल वाटणारा जिव्हाळा व प्रेम तो स्नेह, प्रसंगो पात अर्थात प्रसंगाच्या गंभीर्यामुळे, भगवंत व्यक्त करू शकले नसावेत. अर्जुनाबद्दल असलेला हा भाव अव्यक्त राहिला आणि भगवान श्रीकृष्ण यांचं हे अव्यक्त प्रेम, व्यक्त करण्याची आतुर इच्छा, अनावर झाल्यामुळे, माऊली अवतारात, त्याच श्रीकृष्णाने,सहाव्या अवतारात, अनेक श्लोकात, ते प्रेम ते कौतुक, तो अव्यक्त भाव मनसोक्त व्यक्त केलाय. अर्जुनाचं विशेष कौतुक माऊली व्यक्त करताना सांगतात
तैसा अर्जुनचि विशेषें स्तवावा । ऐसें आवडलें मज जीवा ।
जे तो त्रिभुवनींचिया दैवां । एकायतनु जाहला ॥६-१३०॥
मला अर्जुनाचं कौतुक यासाठी वाटतं की, त्याच्यासाठी विश्वाचा परम आत्मा, त्रिभुवनाचा स्वामी, मानवी अवतार घेता झालाय, हे विशेष प्रेम अर्जुनाला लाभलं याचा एक प्रकारे हेवा आणि कौतुक माऊलींना वाटतंय.
श्रीकृष्णाची मानसिकता सांगताना माऊली एका श्लोकात सांगतात सुद्धा की,
जयाचिया आवडीचेनि पांगें । अमूर्तुही मूर्ती आवगें ।
पूर्णाहि परी लागे । अवस्था जयाची ॥६-१३१॥
म्हणजे हा भगवंत स्वतः परिपूर्ण आहे, म्हणजे वेद पुराणं शास्त्र सांगत असतात की, ईश्वर स्वयं पूर्ण आहे, विश्वाच्या उत्पत्ती आधी आणि कल्पांतीसुद्धा तो निराकार निर्गुणा वस्थेत पूर्ण होता आणि आहे. पण या परिपूर्ण अवस्थे तील भगवंतांनासुद्धा, अर्जुनावरील प्रेमाखातर, त्यांच्या वरील स्नेहामुळे, जडदेही येऊन, आपल्या भक्ताला मानवी रुपात, डोळे भरून पाहण्याची इच्छा झाली. ती अनिवार ओढ, त्यांनी श्रीकृष्णरुपी देह धारण करून, पूर्ण केली.
पण तरीही ती इच्छा इतकी अतृप्त राहिली की, श्रीकृष्ण अवतार समाप्तीनंतर जवळजवळ चार हजार वर्षांनी विश्वमाऊली ही, ज्ञानेश्वर माऊलींच्या अवतारात, प्राकृतात, त्या अर्जुनाचं कौतुक करताना सहाव्या अध्यायात रममाण झाली आहे. म्हणूनच १३७व्या श्लोकात माऊली संगतातकी,
देवकीया उदरीं वाहिला । यशोदा सायासें पाळिला ।
कीं शेखीं उपेगा गेला । पांडवांसी ॥६-१३७॥
भगवंत देवकीच्या उदरात नऊ मास राहिले, तो गर्भवास त्यांनी सहन केला. यशोदा मातेच्या हातून कोडकौतुक करून आपलं बालपण साजरं आणि साजिरं केलं. यशोदा मातेनेसुद्धा, मोठ्या कष्टाने त्याला वाढवलं. पण हा परमात्मा, पांडवांच्यासाठी, त्यांना उपयोगी येण्या साठी, त्यांचं क्षेमकुशल पाहण्यासाठी, त्यांच्याच माध्यमा तून, विश्वाला आकार , ज्ञान व विश्वरूप दर्शन देण्यासाठी आयुष्यभर झटला, तो निव्वळ अर्जुन या आपल्याच परमभक्तावरील, युगानुयुगे असलेल्या प्रेमामुळे, जिव्हाळ्यामुळे.
हे विशेष प्रेम, हा स्नेह लाभलेला अर्जुन, मला विश्वात्मक ईश्वरा पेक्षासुद्धा विशेष कौतुकास्पद वाटतो, असंच माऊलींना सांगायचं आहे. त्यासाठी त्यांनी सहाव्या अध्यायाचा मनसोक्त उपयोग करून, हे ओसंडून जाणारं, भगवंतांचं प्रेम माऊली रूपात येऊन, अव्यक्त होतं ते, देहरूपात ज्ञानेश्वरीरूपात व्यक्त केलं, असं मला वाटतं.
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
२३/०४/२०२२
Comments
Post a Comment