भोग आणि ईश्वर ५१४ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
खरंतर आपल्यापेक्षा वयाने, मानाने, कर्तृत्वाने मोठ्या व्यक्तीं समोर नतमस्तक व्हायला, त्यांच्या पाया पडायला, त्यांचा आशीर्वाद घेण्यात एकप्रकारे वेगळाच आनंद मिळतो. यात शास्त्रीयदृष्ट्या महत्वाची गोष्ट म्हणजे नमस्कारानंतर त्यांच्या मनातून निघालेल्या, सकारात्मक उच्च प्रतीच्या लहरी, आपल्या देह व मन याभोवती एक तर्हेचं सुरक्षा कवच निर्माण करतात.
या सुरक्षा कवचाचा लाभ आपल्या मनातील सकारात्मकता टिकून, त्यात वृद्धी होण्यात होतो. म्हणून अश्या ज्येष्ठ व श्रेष्ठ व्यक्ती ज्या सकारात्मक विचारांनी भरलेल्या असतात, त्यांचा आशीर्वाद हा कायम लाभदायक ठरतो. यात कोणतीही अतिशयोक्ती वा अवास्तव काहीच नाही. हे जर वैज्ञानिक आधारावर सत्य।आहे की, आपल्या मनातून बाहेर पडणाऱ्या लहरींचा वातावरणावर इष्ट व अनिष्ट परिणाम होत असतो. जसा तो वातावरण प्रदूषित करणाऱ्या घटकांचासुद्धा होतो.
आपण कधी अनुभव घेतला असेल की, सर्व सकारात्मक माणसं जमलेली असताना, त्यात जर एखादा नकारात्मक वा अनिष्ट विचारांचा असेल तर, त्या एकट्याच्या नकारात्मक विचारांचा परिणाम एकत्रित सकारात्मक विचारात ऊर्जा व शक्ती कमी असेल तर, त्यापेक्षा परिणामकारक ठरतं. पण अश्या ठिकाणी पूर्ण सकारात्मक व ऊर्जाबलवान व्यक्ती असेल, तर त्या नकारात्मक लहरींचा परिणाम कमी किंवा नष्ट होतो.
याचं कारण त्या सशक्त सकारात्मक ऊर्जा असलेल्या व्यक्तीचं चित्त पूर्ण शुद्ध असतं. म्हणूनच अश्या सकारात्मक व्यक्तींनी दिलेल्या आशिर्वादात ती ऊर्जा व ते बल असते. आता ही गोष्ट जर देहधारी माणसाच्या बाबत आहे, तर जो या जगताचा पालनकर्ता आणि कर्ता हर्ता आहे, त्याच्या परमपावन निर्गुण निराकार, माया रहित, वृत्तीरहीत, शुद्ध अंतःकरणातून किती शुद्ध भावलहरी निघत असतील.
असा हा परम ईश्वर आपल्या सर्व लेकरांवर पुत्रवत प्रेम करतो. त्याच्या चरणी मस्तक टेकवून, आपण आपलं मन, मनातील सर्व भाव, सर्व चुका, अपराध, प्रमाद, घडणाऱ्या सर्व घटना सांगून, आपल्या मनातील किल्मि, न्यून, अपराधी भाव मोकळेपणाने मांडले, तर तो दयाळू ईश्वर नक्की आपल्यावर पुत्रवत माया करून, आपल्याला प्राप्त परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी सहाय्य करेलच, पण त्या परिस्थितीशी झगडून, त्यातून आपल्याच कर्मांनी बाहेर पडण्यासाठी नक्कीच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहाय्यता करेल.
म्हणून शरण जाण्याची मानसिकता आपण एकदा तयार करून, फक्त आपलं मन मोकळं केलं की, विधाता आपल्यावर कृपेचा वर्षाव केल्याशिवाय राहणार नाही. हाच विषय उद्याच्या भागात, अजून पुढे नेऊया आणि तोपर्यंत नामाचं गाठोडं सोबत नेण्या साठी नामस्मरण करतच राहूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२८/०४/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment