भोग आणि ईश्वर ५११ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
कालचाच विषय पुढे नेऊया. वास्तविक कर्मातून निवृत्ती ही आपल्याला भगवंताने एका वरदानाच्या स्वरूपात बहाल केली आहे. म्हणजे कसं तर, जन्ममरण शृंखला तयार करून. म्हणजे एका जन्मातून अर्थात त्या देहातून मुक्ती देऊन किंवा मुक्त करून पुढे कर्मफलानुसार नवीन।देह देऊन, मागील जन्मांच्या विस्मृतीचं वरदान दिलं आहे. विचार करा, जर जन्ममरण नसतं किंवा जन्ममरणोपरांत विस्मृती नसती तर, काय काय अघटित, आक्रीत घडलं असतं देवच जाणे.
याचसाठी मृत्यू पुन्हा जन्म यामधून आत्मा फिरत राहून, आधीच्या जन्मांतील कर्माचा विसर पडून, नवीन जन्मात नवीन कर्म व पुन्हा त्याची नवीन कर्मसाखळी, असा एक अद्भुत खेळ विधात्याने रचला. आता यातून काही गोष्टी अपरिहार्य आहेत, हे नक्कीच. जसं संचित, फल प्रारब्ध यातून सुटका नाही. म्हणजे कर्म विसरली तरी त्यांची फलं आपला पाठलाग करतातच. पण आधीचे भोग भोगताना आपण जसा खूप विचारमंथन करतो, की हे माझ्या वाट्याला का.
पण, तसा विचार दैवयोगाने, उपभोग, सुखप्राप्ती झाली तरी त्यावेळी, त्याचा विचार करत नाही, किंवा तसा विचारही मनाला स्पर्शून जात नाही. याचं खूप महत्वाचं कारण म्हणजे माणसाचा अहं, जो त्याला आपले गुण (असलेले व नसलेले) धरायला शिकवतो, पण दुर्गुण व दोष आणि चुका मात्र आठवू सुद्धा देत नाही.
याच तर्काने, आपण दुःखप्राप्ती झाली, भोग नशिबी आलं, की हमखास देव दैव, खडतर नशीब, घोर अन्याय, याबद्दल भर भरून बोलतो.त्यावेळी आपल्याला आपल्या कर्माची, कर्म फलाची आठवण वा त्यांचा संबंध ध्यानात येत नाही. पण ज्यावेळी सुखप्राप्ती होते, चांगले दिवस येतात, त्यावेळी, आपण लगेच त्याचा संबंध आपल्याला चांगल्या प्रकारे जोडता येतो. जसं मी कष्ट केले, त्रास सहन केला, चांगली कर्म केली म्हणून मला आज हे दिवस दिसत आहेत.
म्हणजेच कर्मफल संबंध असतो, हे आपण जाणतो. तसा संबंध असल्यामुळे फलरूपात तो आपल्या सुखाच्या दिवसांच्या स्वरूपात प्राप्त झाला, हे जाणून, आपण समाधान पावतो. म्हणजेच हा मनाचा कमकुवतपणा आहे, ज्यामुळे आपण सुखात तर कर्मफल संबंध जोडू शकतो. पण दुःखात, काळजीत आपण तसा संबंध जोडायला धजावत नाही.
पण असा संबंध जोडण्याची गरज वा आवश्यकता लागूच नये , याचसाठी कर्म व फल या काळजीतून मुक्त होण्या साठीच, कर्माच्या फलातून निवृत्ती साधण्याचा प्रयत्न सुरू करूया. ही निवृत्ती तर्काने, ज्ञानाने, जाणिवांच्या जागृतीने आपण मनाला समजावू शकतो. कारण आधी म्हटल्याप्रमाणे,ईश्वराने,तशी सवय एका जन्मातून दुसऱ्या जन्मात जाताना, आत्म्याला, विस्मृतीच्या रुपात लावून दिली आहे.
आधीची कर्मच न आठवल्यामुळे, आपली जन्माआधीच्या कर्मात आसक्ती राहातच नाही. म्हणजेच एकप्रकारे विरक्तीच साधली जाते. हेच तत्व वा हाच तर्क प्रत्येक कर्माला लावून, त्याच्या फलातून मनाला निवृत्त करता येईल. पण हे कठीण कार्य साधता कसं येईल, हे उद्याच्या भागात पाहूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२५/०४/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment