भोग आणि ईश्वर ४९२ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात्।
विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे।।
काल म्हटल्याप्रमाणे, शरणागती म्हणजे, उत्तर शून्य धरूनच सर्व गणित सोडवायचं असतं. म्हणजे शून्य उत्तर गृहीत धरून, ते शून्य उत्तर प्राप्त करण्यासाठी,कर्मफल, अपेक्षा इच्छा, आकांक्षा, भावभावना, म्हणजेच जिथे जिथे मनाची गुंतवणूक होऊ शकेल वा होण्याची शक्यता आहे, ते सर्व सोडून देणं. मनाची गुंतवणूक म्हणजे काय हे जाणून घेण्याआधी, शून्य म्हणजे काय याचा विचार करूया.
शून्य म्हणजे जिथून आलो, ते स्थान वा स्थिती. ती स्थिती वा ते स्थान म्हणजे, ईश्वरी परम अंशात अर्थात महा शून्यात विलीन होणं. ज्याला मुक्त होणं सुद्धा म्हटलं जातं. पण हे शून्य प्राप्त करण्यासाठी, या शून्यात डोकावून बघावं लागेल. या शून्यात आत्मतत्त्व शुद्ध स्वरूपात अस्तित्वात आहे. याचाच अर्थ आधी आत्म्याची शुद्धता प्राप्त करून, मग मोक्ष वा मुक्तीचा विचार करावा लागेल. आत्मशुद्ध होण्यायासाठी, मन बुद्धी यांना शुद्ध करणं गरजेचं आहे.
चित्तशुद्धीचे अनेक मार्ग आहेत आणि त्या प्रत्येक मार्गाचं स्वतःचं महत्व आहे. पण या सर्व मार्गात तोच मार्ग सर्व श्रेष्ठ म्हणता येईल,जो सहजपणे सर्व साध्य करू शकेल. यासाठी मनातील सर्व किंतु परंतु, आक्षेप, शंकाकुशंका, काळज्या चिंता इत्यादी सर्वांना दूर करणं आवश्यक आहे. कारण हा सर्व कचरा व त्याज्य वस्तूंचा,मनावर असलेला भार आहे. आपण घर स्वच्छ करतानासुद्धा प्रथम घरा तील कचरा, नको असलेल्या वस्तू, हे सर्व काढून टाकतो. नन्तर घर धुवून घेतो.
त्याचप्रमाणे मनातील सर्व त्याज्य भावभावना, नकारात्मक विचार, द्वेष मत्सर क्रोध चिंता यासारख्या भावनांचा पूर्ण त्याग महत्वाचा आहे. ते साधण्यासाठी अनेक साधनं भगवंताने योजली आहेत. त्यातील काही सहजसोप्पी तर काही योगयाग यांसारखी कठीण आहेत. यासर्व मार्गात मनाचं संतुलन राखून, मनाला नियंत्रित करून,मनाची शुद्धता साध्य करावी लागते. पण हे नित्य सातत्याने साध्य करता येईलच, याची शाश्वती बदलत जाणाऱ्या काळात आणि कलियुगाच्या प्रभावात देता येणार नाही.
आधीच जन्मोजन्मीच्या संचिताने ग्रस्त व त्रस्त जीव कलि युगातील पाप प्रभावात, आपला जीव, प्रपंच आणि इतर सर्व व्यवधानं सांभाळता सांभाळता मेटाकुटीला येतो. त्यातच आत्मोन्नतीसाठी प्रयत्न करण्याचं भान जीवाला येईपर्यंत आयुष्याची इतिश्री होण्याची वेळ येते. सर्व आयुष्य प्रपंचासाठी दिल्यानंतर, वेळ मिळाला, आयुष्य शिल्लक राहिलं आणि देह साथ देत असेल तर जीव काही विचार, स्वतःच्या मनाचा व आत्म्याचा करू शकेल.
या सर्वात अनेक गोष्टी करायच्या राहतात. त्यातच अनेक वलयांनी, प्रलोभनांनी मायेने मोहाने अनेक चुकीची कर्म व कर्मातील चुका, मन हे बुद्धी व देह या माध्यमातून करून घेतं. मनाची गुंतवणूक ज्या ठिकाणी असायला हवी तिथे ती असत नाही. पण तेच मन भलत्याच कर्मात रत असल्यामुळे, ही गुंतवणूक चुकीच्या ठिकाणी होते आणि त्यातून घडणारी व घडलेली कर्म चुकीचीच फलप्राप्ती घडवून आणतात.
मग यासाठी कलियुगातील सर्वात प्रभावी मार्ग कोणता, यावर उद्याच्या भागात चिंतन करूया. तोपर्यंत नामात मनाची जितकी गुंतवणूक करता येईल, तितकी करण्याचा प्रयत्न करूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०६/०४/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment