भोग आणि ईश्वर ४९८ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
ही मालिका आता आटोपती घ्यावी असा विचार येत आहे. शक्य असेल तिथपर्यंत लिहिणं सुरू ठेवीन. पण या मालिकेला निवृत्ती द्यावी असा विचार येत आहे. निर्णय श्रीमहाराज घेतील.
सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज।
अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः।।१८.६६।।
यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात्।
विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे।।
स्मरण आणि शरण या दोन अलौकिक भावातून, विश्वास, श्रद्धा हा भाव आपोआप प्रकट होऊन, प्राणीमात्रांना त्यांच्या कर्मातून मुक्त होता यावं, यासाठीच वरील दोन श्लोक प्रभुवचन आहे. प्रभुवचन यासाठी की, एक स्वतः भगवंतांनी स्वमुखे कथित केलं आहे, दुसरं व्यासांच्या माध्यमातून मांडलं आहे. पण दोन्ही भगवत् वचन यासाठी की व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे हे देखील सहस्रनामात मांडण्यात आलेलं सत्य आहे.
त्यामुळे दोन्ही वचनं एकत्रीत वाचून, त्यांचा मतितार्थ लावणं गरजेचं आहे. बरं ही वचनं का दिलीत, तर जगतकल्याणार्थ. म्हणजे सर्वसामान्य माणसाला जर भक्तीची, योगाची काहीही अंगं आली नाहीत, जमली नाहीत किंवा लाभली नाहीत तर, एक सरळ उपाय म्हणून, स्वतः परम ईश्वर सांगतात की, फक्त तू स्मरण करता करता शरण ये, ज्यातून तुझ्या सर्व कर्माना मी सामावून घेत, तुला पापमुक्त करीन.
आता पापमुक्तीचा अर्थ दोन तर्हेने लावता येईल. एक म्हणजे पूर्ण पापहरण अर्थात संपूर्ण शुद्धीकरण., त्यासाठी चित्ताची आणि आत्म्याची शुद्धता महत्वाची आणि प्राथमिक आहे. ते साधल्यानंतर आत्मशुद्ध होऊन,जीव मोक्षाच्या मार्गाकडे जाऊ शकतो. परंतु हे कार्य सर्वसामान्यपणे अत्यंत सावकाशपणे होतं. पण हे होईपर्यंत सामान्य जीव इहलोकातच जन्मोजन्मी फिरत राहणार, हे नक्की.
पण याचसाठी दुसरं वचन दिलंय की यस्य स्मरणमात्रेण म्हणजेच ज्याच्या फक्त स्मरणाने जन्माची व संसाराची सर्व बंधनं, दूर होतात आणि प्राणी विमुक्त होतो. याचं कारण शरणात पूर्णतः शरणागती होईल असं नाही. काही अंशी अहं शेष राहिला तरी कार्यभाग साधणार नाही. म्हणून दुसऱ्या वचनानुसार, त्यांच्या फक्त स्मरणाने उरलेला सर्व कार्यभाग साधता येईल. मानसिकदृष्ट्या बघितलं तरी ज्याचं स्मरण मन करतं, त्याला मनात नित्य स्थान प्राप्त होतं आणि मन आपोआप फक्त त्याच्याच विचारात गुंगून जातं, रममाण होतं. शरणागतीचा भाव आपोआप दृढ होत जातो. म्हणून स्मरण आणि शरण, दोन्ही महत्वाचं आहे.
आता या दोन वचनांची गरज काय तर, मनुष्य कितीही शुद्ध सात्विक उंचीवर गेला, तरी भल्याभल्यांना या अहं रोगाने ग्रस्त केलं आहे. त्यामुळे भलेभले, आपल्या तपापासून, साधनेपासून ढळलेले आहेत.किंचितही अहं, माणसाला खाली न्यायला कारण ठरतो. म्हणून त्याठिकाणी स्मरणातून शरण गेल्यास, विनम्रता, विनयशीलता हा भाव मनात दृढ होतो. दुसऱ्या अर्थाने स्मरण करून शरण गेल्यास, मन ईश्वरचरणी पूर्ण लीन होऊन, इच्छित कार्य साधण्यास सहाय्य होतं.
पुढील चिंतन उद्याच्या भागात सुरु ठेवू आणि स्मरण करतच राहू.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१२/०४/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment