भोग आणि ईश्वर ५१६ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
या संपूर्ण जगतावर असलेलं मायेचं आच्छादन, अनेक गोष्टी असाध्य करतं किंवा अनेक गोष्टीत बाधा निर्माण करतं. या मायेमुळेच, भ्रम व विस्मृती होते की, हा देह, काही काळा साठीच असून, त्या काळात वा त्या जन्मात, काय साधायचं आहे,याची मुळात कल्पना, जडजीवाच्या मनाला स्पर्षच करत नाही की, आपण का आलोय, याचा आधी शोध घ्यावा. हा प्रश्न पडतच नाही की, मी खरा कोण आहे, आतील आत्मा वा चैतन्य, जो देह चालवतो किंवा देह, ज्यायोगे आत्मा काही साध्य करू शकतो.
मुळात हा प्रश्न न पडण्याचं कारण म्हणजे त्यावाचून काही अडतच नाही. हा प्रश्न आयुष्यात एकदाही न पडलेले अनंत जिवात्मे, करोडो वर्ष, या जगतात, जन्मो जन्मीचं दुःख, भोग, उपभोग, सुख, त्रास, आनंद हे सर्व, अनंत जन्म मागील पानां वरून पुढे असं निष्फळ आयुष्य जगतात. देहात येतात, मायेत गुंततात आणि पुन्हा विदेही होऊन, या जगतात परत परत येण्या साठी पुढील देह मिळण्याची वाट पहात राहतात.
ज्यावेळी आपली बुद्धी चालत नाही, त्यावेळी, आपण आपल्या पेक्षा बुद्धिमान, विचारी जनांची मदत घेतो. अर्थात ज्यांना त्या विषयातील काही समजतं, त्यांना विचारून पुढील मार्गाकडे आपण जातो. अध्यात्म वा आत्म्याच्या उन्नतीसाठी आणि उद्धारासाठी अनेक पवित्र आत्मे, ज्यांच्या जाणीवा प्रगल्भ झाल्या आहेत आणि ज्यांना ईश्वरीकृपेने ज्ञानप्राप्ती झाली आहे, अश्या चैतन्यमय शक्ती, या जगतातच, निर्गुण निराकार अवस्थेत, विहरत असतात.
योग्यवेळी, योग्य कारणास्तव व ईश्वरी आज्ञा पालनार्थ, असे चैतन्यात्मे, या जगतात, देह धारण करून, पुन्हा पुन्हा येऊन, जगतातील अश्या लाखो जीवांच्या उद्धारा साठी ईश्वराचा संदेश पोचवण्याचं कार्य नित्य निरंतर करत असतात आणि करत राहणार. यांच्याच माध्यमा तून, ईश्वर, अश्या जडदेहात असलेल्या अज्ञानी, मायाबद्ध जीवांना तारण्याचा, उन्नतीचा, उद्धाराचा मार्ग कथन करतो. असे पुण्यात्मे आपल्या जीवनात, असा उद्धाराचा मार्ग सांगून, त्यावर चालून, आदर्श निर्माण करून ठेवतात.
कार्यालयीन भाषेत, आपल्या हुद्द्याच्यावर असलेले आणि आपण ज्यांना जबाबदार आहोत, अश्यांना वरिष्ठ मानलं जातं. त्यांच्या आपण स्वाधीन असतो. अध्यात्मिक मार्गात अर्थात जीवाच्या उद्धाराच्या मार्गात, असे पुण्यात्मे हे, आपले वरिष्ठ आहेत. अश्या पुण्यवान वरिष्ठांना आपण नमन करून, आपल्या अध्यात्मिक मार्गातील मार्गदर्शक मानतो. त्यांना आपण सर्वस्व प्रदान करतो. त्यांच्या चरणी आपण स्व आधीन करतो. त्यांच्या आज्ञेला आपण सर्वोच्च मानून, त्यानुसार आपल्यातील ग व स्व त्यांना समर्पित करतो किंवा तसा तो करावा, अशी ईश्वरी अपेक्षा असते.
यालाच अर्पण करणं म्हणतात. यातही अर्पण करणं म्हणण्यात आपला स्व आपण आपल्याकडे राखून ठेवला आहे असं माझं मत आहे. म्हूणूनच अर्पण करण्यापेक्षा अर्पण होणं, म्हणजेच स्वाधीन होणं, स्वतःला त्यांच्या सुपूर्द करणं, हे जास्त योग्य आहे, असं मला वाटतं आणि ईश्वरालासुद्धा तेच अपेक्षित आहे.
या स्वाधीन होण्यात आणि स्व सुपूर्द करण्याबद्दल आपण अजून विस्ताराने, उद्याच्या भागात, चिंतन करूया, तोपर्यंत नामाच्या स्वाधीन स्वतःला करण्याचा प्रयत्न करत राहूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
३०/०४/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment