भोग आणि ईश्वर ५१२ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
आता एक गोष्ट समजली असेल की, मृत्यूआधीची कोणतीही गोष्ट वा कर्म, पुढील जन्मात आठवत नाही, हे विधात्याने जडजीवावर किती उपकार केले आहेत. त्यातून एक निष्कर्ष नक्की काढता येईल,की विधात्याच्या या व्यवस्थेचा सरळसरळ अर्थ असा आहे, जेणेकरून या भूलोकी,जडदेहात वावरताना, आधीच्या कोणत्याही कर्माचा कोणताही लेखाजोखा मर्त्य मानवाने लक्षात ठेवण्याची गरज नाही.ते कार्य कर्मफल तत्वाला अनुसरून, आपलं कर्म आणि त्यासाठीची विधात्याची विश्वरूप व्यवस्था लक्षात ठेवेल.
बरं ही व्यवस्था आजपर्यंत कधी ढासळली किंवा त्यात कधी बाधा आली वा न्यून आलं, असं एकही उदाहरण नाही. यातून अजून एक निघणारा निष्कर्ष म्हणजे, ही कर्माच्या फलांची व्यवस्था संचित रुपात प्रारब्धात मांडून, ईश्वराने तेसुद्धा काम चोख केलंय. म्हणजे मानवाला काही लक्षात राहो वा न राहो, ईश्वरी कर्मफल संचित व्यवस्थेत,एका क्षणाचासुद्धा, कोणताही अडथळा येत नाही. म्हणजे आपण मनात, बुद्धीत जी विचारांची यादी किंवा षड्रिपुंची बीजं रुजवून वाढवतो, ती निरर्थक ठरतात. याच संचितात या जन्मात आपण केलेली कर्मसुद्धा भर घालतात आणि पक्व होऊन फलरूप झालेली कर्म वजा होतात.
कारण मी माझी कर्म, लक्षात ठेवायचं जरी ठरवलं, तरी त्यांची परिणती वा परिणाम, भविष्यात कधी समोर येईल, हे विश्व नियंता सोडून कोणीही जाणत नाही. म्हणजेच अश्याप्रकारे लक्षात वा लिहून ठेवण्याला काहीही अर्थ उरत नाही. बरं लिहून लिहून आपण सहसा तेच लिहू, ज्याबाबत आपला इतरांशी संबंध येतो किंवा कायिक वा वाचिक कर्म आपण नोंदवून ठेवू शकतो. पण प्रत्येक क्षणाला, जे आपण मानसिक कर्म करतो, त्याची नोंद ठेवू शकणं हे मानवी मेंदूला अशक्य आहे.
विधात्याच्या व्यवस्थेत ती सोय आहे. आपल्या काया वाचा बुद्धी व मन या चारही माध्यमातून घडणारी सर्व कर्म आपल्या लहरी, प्रक्षेपित करतात आणि विधात्याची व्यवस्था, त्या लहरींवर आधारित आहे. त्यामुळे प्रत्येक कर्माची नोंद जर ईश्वरी व्यवस्था ठेवते आणि त्यानुसार, प्रत्येक कर्माच्या उचित फलप्राप्तीकाली ते फल त्या त्या व्यक्तीच्या पदरात , ही ईश्वरी व्यवस्था नेऊन ठेवते. मग अश्या स्थितित मानव हा या व्यवस्थेतील फक्त एक कर्म करता ठरतो.
बाकी सर्व ईश्वराधीन म्हणण्यापेक्षा कर्माधीन आहे. पुन्हा एकदा एका निष्कर्षाला आपण आलो, तो म्हणजे माणूस हा फक्त कर्माचा धनी आहे, पण त्या कर्माच्या प्राप्तीवर त्याचा कोणताही अधिकार नाही. म्हणजे असं की, फल तर प्राप्त होईल, हे निश्चित, पण त्याचा निश्चित काळ वा वेळ , हे मानवी व्यवस्थे बाहेर आहे. म्हणजेच यातून शेवटचा निष्कर्ष हा निघतो की, माणसाने फक्त आणि फक्त कर्म करत राहायचं.
एकवार कर्म हातून घडून गेलं की, त्याच्या परिणामांची जबाबदारी बाळगायची गरजच नाही, हाच ईश्वर, संत महंत, ऋषीमुनी, थोर तपस्वी, साधू साधक आणि पुण्यात्मे यांनी सांगून सांगून आपले जन्म त्याकरता वाहिले. म्हणजे उत्तम जीवनाची, दोषपूर्ण आचरणाची व मनःशांती प्राप्तीची गुरुकिल्ली किंवा सिद्धमंत्र हाच म्हणता येईल की कर्म कर आणि विसरून जा.
आता यातून काय निष्कर्ष निघतो, त्यावर उद्याच्या भागात चिंतन करूया. तोपर्यंत नामाचच चिंतन करूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२६/०४/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment