भोग आणि ईश्वर ५०३ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
आपण जास्त गोंधळात तेंव्हा पडतो, जेंव्हा आपण विरोधा भासाचा अनुभव घेतो.म्हणजे आपण चांगलं कर्म करणारी, सन्मार्गी माणसं, दीर्घकाळ भोग भोगताना आणि वाईट विचारांची आणि वाईट मार्गातील व्यक्ती सुखासीन आयुष्य जगताना दिसतात. हे दोन्ही विरोधा भास आपण सद्यस्थितीत पाहतो,अनुभवतो आणि आश्चर्यचकित होतो. याचं कारण आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकली वा वाचली आहे की, चांगलं वागलेल्याचे परिणाम चांगले होतात.
किंवा चांगल्या कर्माची फळं चांगली मिळतात. पण याबद्दल पूर्ण ज्ञान आपल्याला दिलं जात नाही की, सर्व कर्मांची फळं ही भोगावीच लागतात आणि त्यातून सुटका होत नाही. त्यामुळे आपण करत असलेली सर्व कर्म, आधीच्या केलेल्या कर्मांच्या क्रमात कधी व कितवी आहेत. त्यांच्या फलरूप होण्याचा क्रम कसा आहे आणि ती कधी व कशी आपल्याला भोगावी लागणार हे कोणालाही सांगता येणार नाही.
यामध्ये संचितातील ठेव किती आहे व ती जमा कर्मांची आहे की खर्चाच्या बाकीतील आहे, हे विधाता सोडून कोणीही जाणत नाही. इतक्या सर्व गोंधळात आपलं वर्तमानातील कर्म आणि त्या कर्माची फलीतं, यांची त्यात भर पडणार असतेच. आपली या सर्वात मोठी चूक ती जाणिवांची आणि समजुतीची. यासाठी मुळातच आपण करत असलेली पहिली चूक म्हणजे सध्याचं कर्म आणि सध्याचं फल यांचा संबंध न लावता, त्यांचं वस्तुनिष्ठ विश्लेषण करणं.
म्हणजे आपण मुळात जर जन्मापासून सन्मार्गी असलो ( हा आपला दृष्टिकोन झाला), तरीही संचितातील कोणत्या कर्माचं फलित, कधी समोर येईल ते माहीत नाही. मुळात आपलं गतजन्मापर्यंत संचितात उत्तम कर्म आहे की अधो कर्म आहे, हेच माहीत नसलेले आहोत, म्हणजे अजाण आहोत.
म्हणजे कर्मनिष्ठ राहणं हे आपलं धोरण सुरूच ठेवणं, हा एक उपाय करतच राहिला पाहिजे. दुसरं समोर आलेले भोग हे आपल्याच एखाद्या पूर्वकर्माचं फल आहे आणि ते ज्याअर्थी आपल्या समोर आलेलं आहे, त्याअर्थी ते आपलंच कर्मरूप फलित आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण दुसऱ्याच्या कर्माचं फल कधीही आपल्याकडे येत नाही किंवा आपल्या कर्माचं फलित दुसऱ्याकडे जात नाही.
विधात्याचा या व्यवस्थेवर पूर्ण आणि ठाम विश्वास असलाच पाहिजे किंवा ठेवलाच पाहिजे. कारण विधात्याच्या व्यवस्थेत एका क्षणाचीसुद्धा चूक होत नाही, होणार नाही. कर्माचं घडणं आणि फलांचं प्राप्त होणं,हे कोणत्या क्रमात होतील, हे आपणच लिहून ठेवलेलं आहे आणि ते त्या त्या क्रमानेच होणार. आपल्या आताच्या वागणुकीवर आपलं भविष्यातील प्राप्त फल अवलंबून आहे. पण ते कधी येईल, आज सांगता येणार नाही.
म्हणून आज भोग वा दुःखं आहे म्हणून, त्या रागावर किंवा निराशेपोटी आपण, सद्य कर्म बिघडवू नये. कारण त्याने भविष्यात घडणारं चांगलं फल, आपणच आपल्या हाताने दूर सारत आहोत, हे ध्यानात ठेवावं. म्हणून दुःखं व भोग प्राप्तीनंतर सुदधा, कर्माचा आलेख व पत खाली येता कामा नये. यातील मायेचा खेळ उद्या पाहू, तोपर्यंत आपलं नामरूप कर्म करतच राहूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१७/०४/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment