Skip to main content

भोग आणि ईश्वर ४८९

भोग आणि ईश्वर  ४८९  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
  
यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात्।
विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे।। 

काल आपण अंतिम आणि तरीही सर्वात श्रेष्ठ असा शरणागती हा उपाय पाहिला. त्यावर पुढे चर्चा करण्या आधी इतर बाबींबद्दल बोलूया. मनाला शरण जाणं ही गोष्ट शिकवावी तेंव्हा लागेल, जेंव्हा त्या मनाला शरण जाण्याची सवयच नसेल. म्हणजे ज्यावेळी  एखादी गोष्ट करण्याची मनाला किंवा देहाला सवय नसेल. कारण सवय नसलेली किंवा अति प्रयासाने प्राप्त कराव्या लागणाऱ्या गोष्टीसाठी मन सहज तयार होत नाही. 

याचं कारण मन हे नेहमी सहज जमणाऱ्या किंवा सवयीच्या असलेल्या कर्मांनाच प्रथम प्राधान्य देतो. त्यानंतर नाईलाजाने किंवा निरुपाय झालाच तर इतर मार्ग शोधण्यासाठी विचार आणि गरजेनुसार कृती करतं. हा मानवी स्वभाव आहे. म्हणजेच मनाची ही वृत्ती आहे किंवा मनातील अहं असेल किंवा अज्ञान असेल की, जी गोष्ट सहज चालीत सहजरीत्या प्राप्त होईल किंवा होते, त्या गोष्टी, कर्म करायची आणि चाकोरी सहसा मोडायची नाही. 

व्यवहारातसुद्धा आपण पाहिलं असेल की, बहुतांश लोकं आजच्या पानावरुन पुढे असं सहजसोप्पं आयुष्य जगतात. फार थोडे चाकोरीबाहेरील आयुष्य जगण्याचा विचार करतात आणि त्यातील काही व्यावहारिक यश प्राप्त करतात. जे तत्व देहाच्या बाबतीत मनाचं आहे, तसंच काहीसं अध्यात्मात अर्थात आत्मो न्नतीबाबत आहे. मनात अनेक गोष्टी योजल्या जातात, अनेक प्रकारचं ज्ञान प्राप्त होतं, परंतु एखादी गोष्ट सहसा, गरज नसेल तर केली जात नाही. 

अगदी एखादं स्तोत्र मंत्र नित्य उपासनेत म्हणणारे थोडेच. पण अनेकदा लोकं अडचण, समस्या, भोग, दुःख वाट्याला आलं की मग त्यासाठी काही उपाय करण्या साठी विचार सुरू करतील आणि समस्येच्या तीव्रतेनुसार त्यासाठी धावपळ आणि एकाहून अनेक उपाय योजना एकाच वेळी करतील. पण कर्माचं गणित आणि श्रेष्ठत्व मान्य आणि माहीत असले तरी, सकारात्मक विचार, उपाय, त्यासाठीची स्तोत्रं मंत्र इत्यादी करण्याचा प्रयत्न आधीपासून करणार नाहीत. 

मनाच्या या अजब वर्तनाला किंवा वृत्तीला अनेकदा परिस्थिती वाकवून, मनाला त्याचा अहं किंवा इगो बाजूला ठेवायला लावून, प्राप्त परिस्थितीला शरण जायला लावू शकते.  म्हणजे जी गोष्ट ज्ञान, जाणीवा साध्य करू शकत नाहीत, ती मनाला त्याचा अहं बाजूला ठेवून, प्रसंगी एखाद्या व्यक्तीलासुद्धा शरण जायला लावण्याचं सामर्थ्य परिस्थितीत आहे. बर ही प्राप्त झालेली परिस्थिती आपल्याच कर्माचा परिपाक आहे, हेदेखील लक्षात येतं. म्हणजे स्वतःच्या कर्माने मनुष्य परिस्थितीला शरण जातो. 

म्हणजे शरण जाणं किंवा लोटांगण घालणं आणि परिस्थितीवश आपली मनोभूमिका किंवा वृत्ती अथवा मानसिकता अथवा अहं बदलणं, हे माणसाला जमतं. यामध्ये प्राप्त परिस्थितीचा त्यातून बाहेर येण्याचा विचार प्रभावी असतो, हे नक्कीच. त्याबद्दल दुमत असायचं कारण नाही. पण जी गोष्ट तात्पुरत्या परिस्थिती मुळे माणसाला नाईलाजास्तव जमते, ती या देहात स्थित आत्म्याच्या उद्धार व उन्नती यासाठी जमू शकत नाही, हा अहं किंवा मायेचा प्रभाव नव्हे तर अजून काय म्हणता येईल. 

शरणागती म्हणजे काय यावर अजूनही विचार व चिंतन करूया, पण उद्याच्या भागात. तोपर्यंत आत्म्याच्या उद्धारक नामाची साधना करत राहूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०३/०४/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...