ज्ञानेश्वरी ओवी भावार्थ. १
श्रीज्ञानेश्वर माऊली नमोनमः
श्रीसद्गुरुमाऊली नमोस्तुते
सांडीं हें मूर्खपण । उठीं घे धनुष्यबाण ।
संग्रामीं हें कवण । कारुण्य तुझें ? ॥ २.१८ ॥
माझे स्नेही श्रीनितीन भानुशाली यांच्याशी परवा चर्चा करताना, त्यांच्या बोलण्यात या ओवीचा उल्लेख आला. श्रीज्ञानेश्वरीतील दुसऱ्या अध्यायातील ही अठरावी ओवी आहे. अर्जुनविषादयोग पहिल्या अध्यायात आल्या नंतर,दुसऱ्या सांख्ययोग या अध्यायात ही ओवी आपल्या समोर येते. याचा भावार्थ माझ्या आकलना नुसार मांडण्याचा प्रयत्न करतो.
भगवंतांनी द्वापारयुगामध्ये, युगांत होताना, झालेल्या महाभारत युद्धामध्ये, अचानकपणे हताश व निराश झालेल्या अर्जुनाला समजावून सांगून, युद्धाला पुन्हा सज्ज करण्यासाठी वेद शास्त्र यांचं सार काढून, त्याला अमृतपान करवून, त्या ज्ञानरसाच्या पेल्यातून, युद्धासाठी पुनः उभं केलं.
खरंतर हे महदकार्य होतं. कारण युद्धआधीच, हताश व निराश झालेल्या योध्याला पुनः उभा करून, त्याला कर्तव्याची जाणीव देऊन, शस्त्रसज्ज होण्यासाठी तयार करताना, वास्तविक मोजकं आणि मर्यादित ज्ञान देऊन, किंवा योगामायेने त्याची बुद्धी पालटून, भगवंतांना युद्धाचं कार्य संपन्न करून घेता आलं असतं.
पण या एका घटनेतून, अर्जुनासह समस्त विश्वाला एक कायम स्वरूपी मार्ग,दिशादर्शक तक्ता, मनाला नित्य वळण देत,भरकटू न देणारा दीपस्तंभ उभा करून दिला. म्हणजेच अर्जुनाच्या आडून विश्वाच्या कायमस्वरूपी कल्याणाची व्यवस्था लावून दिली. त्यामुळे अश्या ज्ञान युक्त, दीपस्तंभ असलेल्या, ज्ञानाला सामान्यातल्या सर्वसामान्य मानवापर्यंत पोचवता यावं वा तिथपर्यंत हे ज्ञान पोचवलं जावं, यासाठी असलेलं हे ज्ञान, वैश्विक करण्यासाठी पुन्हा एकवार, भगवान श्रीकृष्ण यांना देहधारण करून, अवतीर्ण व्हावं लागलं.
अवघं एकवीस वर्षाचं हालअपेष्टा, अपमानयुक्त जीवन जगूनही, देवभाषा संस्कृतातील हे ब्रह्मज्ञान, फक्त विश्वा प्रत जावं, या उद्देशाने, छोटसा पण प्रचंड चैतन्यमय आयुष्य जगून, विश्वपिता असल्याचं आपलं ब्रीद सार्थ करून दाखवलं. तेदेखील अश्या काळात, ज्यावेळी ज्ञानाची कवाडं संकुचित वृत्तीने फक्त आपल्याकडे ठेवून, भक्तिमय जीवनाचा सामान्यांचा अधिकार पायदळी तुडवणाऱ्या,समाजातील विषवल्ली, कोणताही आततायी पणा, उन्माद न दाखवता, सहज सुलभ भाषेत हेच ज्ञान मांडून, समूळ नष्ट करून, समाधिस्थ होऊन, निर्गमन करते झाले.
वाङ्मयीन, अध्यात्मिक, शास्त्रीय, वैज्ञानिक, ज्ञानयुक्त अश्या विविध पातळीवर अलौकिक असणाऱ्या सार्थ श्रीज्ञानेश्वरी ग्रंथात, माऊलींनी जगाला दिलेलं ज्ञान गीतेइतकच अद्वितीय आणि परब्रम्ह स्वरूप आहे. त्यातीलच एका ओवीचा भावार्थ आपण पुढील भागात, यथामती, यथाभक्ती जाणून घेण्याचा, प्रयत्न करूया.
श्रीरामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी !!
श्रीज्ञानेश्वर महाराज की जय! श्रीतुकाराम महाराज की जय !!
सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय !!
©® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
२४/११/२०२१
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment