भोग आणि ईश्वर ३४८
कालच्या चिंतनावरून, कर्माची बंधनं म्हणणं, जास्त संयुक्तिक ठरेल, अस मला वाटतं. कर्म करण्याचं स्वातंत्र्य म्हणणं हे व्यावहारिक होणार नाही, तर त्यात अपरिहार्यता जास्त आहे. म्हणूनच श्रीमद्भगवद्गीतेत स्वतः श्रीयोगेश्वर श्रीकृष्ण म्हणतात त्याप्रमाणे, कर्म न करता कोणताही जीव या जगात राहू शकत नाही. पण म्हणून ते परावलंबित्व अपरिहार्यता म्हणून स्वीकारून, त्याला नाईलाजाने सामोरे जाण्यापेक्षा, त्याला जीवन जगण्याचा एक उन्नत मार्ग समजून व स्वीकारून पुढे पुढे जाणं हा एक उत्तम मंत्र आहे.
कारण कर्महीन राहू न शकणं, हे नाईलाजाने स्वीकारण्या पेक्षा त्यातून आत्मोन्नती व आत्मोद्धार साधता आला तर त्यासाठी प्रयत्न करून, पुढील जन्मांसाठीची व्यवस्था करता आली, तर त्याचा विचार प्रत्येक क्षण करत जावा. कारण पहिली गोष्ट काही करायचं हे प्रत्येक क्षण आहेच, म्हणजे अपरिहार्यता म्हणूया. त्याच कर्मातून पुढची फलनिष्पत्ती होणार आहे. म्हणजे अस्वीकारार्ह अपरिहार्यता. त्यामुळे आज सकर्म करणं हे आपल्याला अपरिहार्य आहे.
मनाचं एक वैशिष्ट्य आहे की, अस्वीकृत काम जर मनाकडून करून घेण्याचा प्रयत्न केला गेला तर, मन त्यात निरुत्साहाने सहभागी होतं. जर मन, एखाद्या कर्मात, मनापासून भाग घेत नसेल, त्यावेळी, त्या कर्माचं किंवा त्या कार्याचं महत्व कमी होतं. दुसरं अस की, प्रयत्न नीट झाले नाहीत, तर त्याचे परिणाम किंवा त्याची फलनिष्पत्ती ही, जी असेल ती स्वीकारून पुढे जाणं, क्रमप्राप्त होतं.
तिसरं म्हणजे मनापासून न केलेल्या किंवा मनापासून केलेल्या, अश्या दोन्ही कर्मांची जबाबदारी आपलीच असते. त्यामुळे, कर्म करताना त्यात आपलं मन पूर्ण ओतून, त्याद्वारे घडलेलं कर्म हे समाधान तर देईलच, पण त्याची फलनिष्पत्ती ही मनासारखी होण्याचा संभव जास्त असतो. म्हणून जर कर्महीन राहायचं नाही आणि कर्म करायचंच आहे तर ते मनापासून करावं.
तिसरं असं की, मन जिथे मनापासून कार्य करतं, तिथे त्यामागे, मनाची इच्छा आणि त्यामागे त्या इच्छेचं पाठबळ अर्थात इच्छाशक्ती सुद्धा कार्य करते. किंबहुना मुख्य सहभाग हा या शक्तीचा व त्यामागील शक्तिकेंद्राचा असतो. म्हणून कर्म करायचं तर पूर्ण मनापासून आणि पूर्ण इच्छाशक्तीनेच करायचं. आता कर्म जर करायचं आणि त्या कर्माची अपरिहार्यता स्वीकारून कर्म करायचं तर, असं कर्म हे, त्या मार्गात येणारे भोग, उपभोग यांच्या समिश्रणातून मार्ग काढत करायचं आहे.
मनाची शक्ती कर्मापाठी लावून आणि प्राप्त परिस्थिती, संचिता तील भोग व उपभोग, मनाची भावावस्था या सर्वांना स्वीकारून, पण मनाच्या शक्तीवर कोणताही परिणाम होऊ न देता किंवा कमीतकमी परिणाम होऊ देऊन, ते कर्म करणं, हे खूप मोठं कसब आहे. हे साधता येणं हा खूप मोठा योग आहे.
या योगाला साधताना आणि जीवनात सर्व कर्म मनाने व मनापासून करताना सुद्धा, एक गोष्ट लक्षात येईल की, प्रत्येक कर्म केल्यावर त्याचं फल वा परिणाम कधी कुठे व कोणत्या परिस्थितीत प्राप्त होईल हे सांगता येणं, मानवालातरी अशक्य आहे. मग काय करावं किंवा काय केलं पाहिजे, यावर उद्याच्या भागात चिंतन करूया. तोपर्यंत कर्माच्या मार्गावर नामाचा एक एक दीपक लावून पुढे जात राहूया.
श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल.
भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. पेमेंटसाठी नं. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.
आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१३/११/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment