Skip to main content

ज्ञानेश्वरी ओवी भावार्थ २

ज्ञानेश्वरी ओवी भावार्थ २ 

श्रीगणेशाय नमः !!
श्रीज्ञानेश्वर माऊली नमोनमः !!
श्रीसद्गुरुमाऊली नमोस्तुते  !! 

सांडीं हें मूर्खपण । उठीं घे धनुष्यबाण ।
संग्रामीं हें कवण । कारुण्य तुझें ? ॥ २.१८ ॥ 

हृदयाचें ढिलेपण । एथ निकयासी नव्हे कारण ।
हें संग्रामीं पतन जाण । क्षत्रियांसीं ॥ २.२८ ॥ 

श्रीमद्भागवद्गीतेतील, ज्या मूळ ओवीवरून माऊलींनी वरील ओवी घेतली आहे ती खालीलप्रमाणे 

क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते ।
क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप ॥२.३॥ 

गीता भगवंतांनी प्राप्त परिस्थितीत अर्जुनाला युद्धप्रसंगी ऐकवून, युद्धासाठी तयार करवून घेतलं आणि युद्ध पार पडलं. मुळात भगवतगीता ही जीवनातील अनेक पातळी वर, अनेक प्रसंगी, अनेक ठिकाणी, नित्य उपयोगाची आहे. परंतु तिच्याकडे पाहण्याचा जनेतरांचा दृष्टिकोन, हजारो वर्षांच्या कालखंडात संकुचित झाला होता. एक उच्च अध्यात्मिक प्रबोधन, इतकाच श्रीमद्भगवद्गीता बघण्याचा दूषित दृष्टिकोन तयार झाला होता. त्याला छेद देऊन, अध्यात्म ते व्यवहार अश्या सर्व पातळीवर गीतेचा उपयोग आहे व तसा तो व्हावा, हे जाणून, भगवंत स्वतः, त्याच गीतेवर दीर्घ विश्लेषणात्मक भाष्य करण्यासाठी याच भूमीवर अवतीर्ण झाले. 

वेदातून सार काढून ते गीतेत अर्जुननिमित्ताने मांडून, त्याचा विस्तार, म्हणावा तितका, न झाल्याचे व ज्यांच्या साठी ही समस्त गीता मांडली, त्या जनांना याचा लाभ मिळत नसल्याचे पाहून, प्रचंड करुणा दाटलेली विश्व माऊली, भगवान श्रीमहाविष्णू, श्रीज्ञानदेव या देहात, मराठी सारस्वतांच्या प्रांतात एकटी प्रकट झाली. एकटी यासाठी की आधीच्या जन्मातील माता रुक्मिणी सोबत नाही. 

त्याचं माझ्या मताने कारण म्हणजे श्रीराम व श्रीकृष्ण या दोन्ही जन्मात, धर्मपत्नी अनुक्रमे देवी जानकी अर्थात वैदेही आणि देवी रुक्मिणी अर्थात भीमकी या विदेह कन्या असल्याकारणाने, या प्रांताचा दोन्ही अवतारांवर असलेला उपकारात्मक हक्क, काही प्रमाणात उतवरून ठेवण्यासाठी हा चैतन्यरूप अवतार, महाराष्ट्र भूमीत, प्रभूंना घ्यावासा वाटला असावा. कारण प्रभू कोणतीही गोष्ट अकारण, अहेतुक व अतार्किक कधीही करत नाहीत, हे सुद्धा प्रभूंचंच ब्रीदवचन आहे. 

माऊलींनी प्राकृतात श्रीमद्भागवद्गीता भावार्थ रुपात मांडताना अनेक प्रकारची व्यवधानं, समीकरणं जपली. काही नवीन मांडली तर काही जुनी मोडीत काढली. पण अर्जुनाला झालेला विषाद हा अचानक उद्भवलेला आणि धक्कादायक दिसत असला तरीही, प्रत्यक्ष श्रीयोगेश्वर याबाबत जाणून असावेत, असा भास, संपूर्ण गीता वाचताना जाणवतो. मुळातच फक्त अर्जुनाला उपदेशात्मक ज्ञान प्रदान करताना, जगतकल्याण हेतू मनात धरून होते, हे त्याचं पहिलं कारण वाटतं. 

जगतकल्याण हेतू प्रित्यर्थ हा अनमोल खजिना, जगताला उद्देशून, पण अर्जुनाला संबोधत भगवंतांनी स्वमुखे उच्चारला, हे दुसरं कारण. तिसरं, हा सर्व युद्धपट, संजयामार्फत धृतराष्ट्रसुद्धा जाणत व अप्रत्यक्षपणे पाहात आहे, हे पार्थसारथी जाणून होते, हे तिसरं कारण. श्रीव्यासमुनींनी त्या दीर्घ उपदेशात्मक रसामृताचं, संपूर्ण विवेचन व विवरण, महाभारत या ग्रंथात नोंदवून, जगताला उपलब्ध होईल, याची दक्षता घेतली हे चौथं कारण. पण हे कारण जास्त संयुक्तिक आहे, कारण श्रीविष्णु सहस्रनामानुसार, "व्यासाय विष्णुरूपाय, व्यासरूपाय विष्णवे". त्यामुळे भगवंत हेदेखील जाणून होते की, हे सर्व संबोधन, प्रबोधन आपल्यालाच उतरवून जगापुढे मांडायचं आहे. 

अश्याप्रकारे युद्धभूमीवर विषादस्थितीत असलेल्या अर्जुनाला, आपल्या सर्वात जवळच्या सख्याला, परममित्राला, उपदेश करतानासुद्धा, भगवंतांना, या विश्वात्मक ज्ञानप्रदानाची कल्पना होती, म्हणूनच त्यांनी प्रबोधन करतानासुद्धा, management principles, guidelines, standards, या सर्वांची उत्तम मांडणी करत, एखाद्याला आपला मुद्दा कसा पटवून द्यावा याबद्दलचं convinsing power and ability यासह अनेक नवीन परिमाणं जन्माला घातली. 

माऊलींनी अर्थात भगवान श्रीकृष्णांनी,  तीच गीता प्राकृतात मांडताना, अनेक नवीन परिमाणं उदयास आणली. माऊलींचं सर्वात मोठं योगदान म्हणजे कोणताही मुद्दा वा श्लोक पटवून देताना मांडलेले दृष्टांत, हे माऊलींचं सर्वात मोठं गुणवैशिष्ट्य आहे. श्रीकृष्ण अवतारात, सख्याला मुद्दा पटवून देताना, भगवंत म्हणून आणि हृदयस्थ सखा म्हणून असलेली आपली भूमिका, श्रीज्ञानदेव रुपात, माऊली म्हणून आपल्या लेकरांना तीच गीता समजावून सांगताना जी मार्दवयुक्त,  प्रेमयुक्त, मातेच्या भूमिकेत सहजी जाऊन, तीच गोष्ट वा तत्व वेगळ्या शैलीत लीलया सांगतात आणि ते सांगताना त्यांच्या शब्दांना मायेचा असलेला स्पर्श शब्दाशब्दात जाणवतो, भावतो आणि बुद्धिपेक्षा हृदयात जाऊन पोचतो. 

उद्या यावर पुन्हा विवेचन पुढे सुरू ठेवा. 

क्रमशः 

श्रीरामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी !!
श्रीज्ञानेश्वर महाराज की जय! श्रीतुकाराम महाराज की जय !!
सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय !! 

©® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
२५/११/२०२१

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...