Skip to main content

भोग आणि ईश्वर ३६५ लेखमालेची वर्षपूर्ती) 🌷🌹

भोग आणि ईश्वर  ३६५ लेखमालेची वर्षपूर्ती) 🌷🌹 

ही लेखमाला सुरू करून आज ३६५ दिवस अर्थात एक वर्ष पूर्ण झालं. संपूर्ण ३६५ दिवस रोज एक लेख, ही एक विलक्षण अनुभूती होती. संपूर्ण ३६५ दिवस विनाखंड रोज एक लेख लिहून तो पोस्ट करणं, हे एक अद्भुत कार्य, माझे सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी करवून  घेतलं.  इतक्या गहन विषयावर इतक्या सोप्प्या भाषेत लिहिता येणं, हे सद्गुरू प्रेरणेशिवाय अशक्य आहे.  त्याबद्दल मी त्यांचा जन्मोजन्मी ऋणी राहीन. त्याचप्रमाणे वाचकांनी मला प्रोत्साहित करून, लिहितं ठेवलं, त्याबद्दल वाचकांचासुद्धा आजन्म ऋणी राहीन. हे दोन्ही ऋण फिटू नयेत, ही इच्छा आहे, ज्यामुळे पाय जमिनीवर राहतील आणि असंच कार्य हातून होत राहील. 

१ डिसेंबर, २०२० या दिवशी "भोग आणि ईश्वर" या शिर्षकाने मी, ही लेखमाला लिहायला घेतली. ही मालिका इतकी प्रसिद्धी मिळवेल असं, गेल्यावर्षी, लिहायला सुरुवात केली तेंव्हा,  खरच वाटलं नव्हतं. पण या मालिकेचं शीर्षक हा या मालिकेला प्रसिद्ध करण्यात खूप महत्वाचा दुवा ठरला. 

या मालिकेच्या शिर्षकाबद्दल आज विस्ताराने लिहावे असा विचार करून जितकं शक्य आहे, तितकं मांडण्याचा प्रयत्न करीन आणि तद्नंतर आपण पुन्हा लेख ३६४ च्या विषयाकडे आपसूक येऊ. 

माझ्या व्यक्तिगत जीवनातील, इतक्या वर्षांच्या चिंतनातून जी शिदोरी हाती लागली, त्यानुसार, जीवन हे सुख व दुःख अर्थात उपभोग आणि भोग, यांचा संमिश्र फलरूप प्रवास आहे. प्रत्येकाचं आयुष्य, या अश्या मिश्रणातून तयार होतं. काहींना भोग जास्त प्रमाणात भोगावे लागतात आणि उपभोग हे कमी प्रमाणात मिळतात. असा सर्वसामान्य कयास आहे किंवा सकृत दर्शनी तसं अनुमान काढलं जात. 

परंतु माझ्या मताने या दोन्ही संज्ञा व्यक्तिगत समजुतीच्या म्हणजेच individual perceptions चा परिणाम आहे. उदाहरणार्थ एखाद्या अतिश्रीमंत माणसाला दिवसाचे रु.५,००० ते ६,००० कमावणारा मध्यमवर्गीय आणि त्यापेक्षा कमी कमावणारे सर्व गरीब वाटू शकतात. याविरुद्ध एखाद्या झोपडीत राहणाऱ्यांना रु. १,००० ते २,००० मिळकतीवरील सर्व श्रीमंत वाटू शकतात. 

त्याच्या दृष्टीने, रोजची पोटाची भूक भागवून झाली की, उरणारी सर्व कमाई, ही अतिरिक्त झाली. कारण जीवनाच्या विशिष्ट अनुभवांमुळे उद्याच्या पुढील विचार हा त्यांच्या दृष्टीने अशक्य प्राय गोष्ट आहे. आजचा दिवस निघाला की झालं. कारण त्याच्या दृष्टीने, गरज भागवून काही उरणार नसेलच तर त्याचा विचार का करायचा. किंबहुना तसा विचार त्याच्या डोक्यात येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 

याविरुद्ध परिस्थिती श्रीमंतांची आहे. त्यांनी कमावलेलं अतिरिक्त सर्व द्रव्य, अर्थात बुद्धी किंवा अन्य इतर मार्गांनी  कमावलेलं द्रव्य असल्याकारणाने, त्याची हमी वा शाश्वती ही तितकीच असते, याची त्यांना माहिती वा खात्री असते. दुसरं, त्यांच्या मनामध्ये एक विचार नेहमी घोळत असतो की, आज ना उद्या ही गैर वा वाममार्गातून कमावलेली संपत्ती वा द्रव्य, त्याच मार्गाने जाऊही शकतं. म्हणून अश्या अशाश्वत धनसंपत्तीला जास्तीत जास्त सुरक्षित ठेवण्याची चिंता व भय, हे दोन्ही, त्यांच्या डोक्यात व मनात सतत वाहात असते. 

म्हणजेच चिंतेची व्यावहारिक व्याख्या व अर्थबोध हा व्यक्ति परत्वे बदलतो. याला प्रत्येकाची व्यावहारिक व सांपत्तिक स्थिती कारणीभूत असते. आता या व्यावहारिक कर्मातून निर्माण होणारा कर्मफलाचा गुंता, कर्मफलाच्या माध्यमातून सहसा व्यावहारिक पातळीवर सोडवला जातो. म्हणजेच, व्यावहारिक कर्मफलाची पूर्तता किंवा परिमार्जन हे, व्यावहारिक क्षेत्रातच भोगावं लागतं. 

सांसारिक चिंता, प्रश्न, काळज्या या सांसारिक पाशांचं कारण ठरतात. म्हणूनच आपण वाचलं किंवा नक्कीच ऐकलं असेल कि, संतसज्जन, साधू व संसारिक चिंतेपलीकडे गेलेली चैतन्य स्वरूप आत्मे, संसाराची चिंता व मोह सोडा वा त्यागा आणि ईश्वराकडे या असा मन्त्र देतात, तो यासाठीच. कारण त्या सर्व चिंता, कर्म याच प्रकारच्या फलांना जन्म देतात. 

खरतर हा गुंता आणि त्यातून निर्माण झालेले मार्ग, जीवाला त्याच चक्रात बांधून, जन्मोजन्मी, कर्मफल शृंखलेचा दास बनवतात. असा दास असलेला जीव, हेच भोग, चिंता व यातून निर्माण झालेले माया, क्रोध, काम, मद, मत्सर इत्यादींच्या जाळ्यात तोपर्यंत जखडून टाकतात, जोपर्यंत त्याच्या जाणीवा यातून बाहेर पडून, बाहेरचा, त्यागाचा व वैराग्याचा मार्ग धरण्याचा विचार सुरू करत नाहीत. 

यावर अजून आत्मचिंतनाची आवश्यकता आहे, म्हणून उद्याच्या भागात यावर विचार करूया. तोपर्यंत नामाने आत्मबल वृद्धी करून घेण्याचा प्रयत्न करूया. 

श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
३०/११/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...