Skip to main content

भोग आणि ईश्वर २९२

भोग आणि ईश्वर  २९२ 

मुळात कोणताही काळ वा कोणतीही स्थिती किंवा परिस्थिती असो. मन सर्व स्वीकारायला किंवा त्याप्रमाणे बदलून वागायला तयार असणं, हीच एक पुण्यकारक गोष्ट आहे, असं माझं मत आहे. कारण आयुष्य हे बदलांचं आणि स्थित्यंतरांचं आहे किंवा सर्वसामान्यपणे असतं. पण आपली मनःस्थिती व मनःस्वास्थ्य हे अनेक गोष्टींचा परिपाक असतो. किंबहुना मनःस्थिती  ही एखाद्या अन्नपदार्थाप्रमाणे असते. 

म्हणजे त्यात मुख्य घटक जो असतो, त्याच्या स्वतःच्या चवीला अनेक इतर उपघटक व तेल मसाले यांच्या प्रमाणानुसार चव येते. जो उपघटक किंवा मसाला तीव्र असतो आणि  या जंजाळात आपला प्रभाव पाडण्यात यशस्वी होतो, त्याच्या प्रभावानुसार पदार्थाला चव येत जाते. कधीकधी एखादा उपघटक आपला प्रभाव, पदार्थ मुरल्यावर दाखवतो वा चाखायला देतो. म्हणजे सरते शेवटी पदार्थ तयार करणारी व्यक्ती, अर्थात सुगरण म्हणूया,  त्यातील घटकांचं प्रमाण, अपेक्षित चवीनुसार ठरवते आणि त्यानुसार घटकांचं व मसाल्याचं मिश्रण करते. 

यातील मुख्य घटक म्हणजे मन, अन्नपदार्थ म्हणजे मनःस्थिती, उपघटक आणि मसाले म्हणजे घडणाऱ्या घटना, कर्मफल इत्यादी आणि ती सुगरण म्हणजे आपण. आता यातून पुन्हा काही शक्यता लक्षात येतात. तयार होणारा अन्नपदार्थ हा सुगरण म्हणजेच आपण कसे घटक घालतो किंवा कसे मिश्रण तयार करतो यावर अवलंबून आहे. हे उपघटक घालणं म्हणजे कर्म करत जाणं. या कर्माच्या बेरीज व वजाबाकीतून, फल व भविष्यातील घटना घडणार आहेत. 

म्हणजे कर्मानुसार त्या मनःस्थितीचं घडणं होणार आहे. पण यामुळे तयार होणारा पदार्थ अर्थात मनःस्थिती कशी असेल. कारण ती मनःस्थिती मागील घटनांचं, वर्तमाना तील कर्म व मागील कर्मफलांची प्राप्ती यांवर अवलंबून असली तरी, खरी सुगरण ज्याप्रमाणे, योग्य वेळेत, वासा वरून जाणून, पदार्थाची चव बिघडणारं नाही, किंवा बिघडली तरी त्याचा तोल कसा राखायचा याची योग्य ती काळजी घेते. त्याप्रमाणे एखादा मनाचा ताळमेळ राखणारा आणि विवेकी व्यक्तित्वाचा माणूस, योग्य वेळेत आपल्या मनःस्थितीला समजून, त्या मनःस्थितीचा तोल बिघडणारं नाही, याची काळजी घेईल. 

यात सुद्धा दोन प्रकार असतात, एक म्हणजे पदार्थ अपेक्षेप्रमाणे उत्तम झाल्यास, आनंदी होऊन, उल्हसित होणारी आणि दुसरी मिळालेल्या प्रतिसादाला स्वीकारून पुढे जाणारी. पहिल्या प्रकारात अतिउत्साही आणि प्रतिक्रियेनुसार मनःस्थिती तयार होणारे लोक येतात. हे लोकं घटना, फलित, यानुसार समोर आलेलं  पाहून, त्वरित उल्हसित किंवा हतोत्साहित होतात आणि मनःस्थिती व मनःस्वास्थ्य बिघडवून घेतात. म्हणजेच चव बिघडवून घेतात. पण काही व्यक्तित्व अशी समतोल असतात, जे तयार झालेला पदार्थ बिघडूनसुद्धा, अश्या बिघडलेल्या पदार्थामुळे निराश व उत्तम पदार्थामुळे अति उल्हसित  न होता, कायम पुढचाच विचार करतात व करत राहतात. 

अश्या व्यक्ती, बिघडलेल्या वा फार उत्तम नसलेल्या आयुष्यातून सुद्धा आपल्या मनाचा तोल राखत पुढे मार्ग काढत जातात. मला स्वतःला अश्याच समतोल आणि संतुलित मनाच्या, विचारांच्या व्यक्ती आवडतात. कारण, आपण भूतकाळात काय कर्म केलं, हे ज्ञात नसल्यामुळे, पुढे काय होईल याची चिंता चिंतन वा विचार न करता, आजचं आपलं कर्म, जे आपल्या हातात आहे, कसं योग्य होईल, याचाच विचार करतात. समतोल आणि संतुलित मन म्हणजे काय आणि अश्या मनःस्थितीला पोचण्या साठी काय करावं, यावर उद्या विचार करूया. पण तोपर्यंत आपण जी नामाची कास धरली आहे, ती सोडू नका. 

प्रिंट होऊन पुस्तकं कालच प्राप्त झालेली आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू होईल आणि त्यांना तसं सूचित केलं जाईल. प्रकाशनपूर्व सवलत रु.१४०/- (रु.११०+ रु.३०)२५ सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२५०/- कुरियरसह. यात लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख आहेत. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत.  श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लांबलं. पण लवकरच हे पूर्ण होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१८/०९/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...