भोग आणि ईश्वर १८९
सद्गुरुसेवा, सद्गुरूचिंतन आणि सद्गुरूंनी दिलेला मंत्र, या त्रयीच्या आधारे,प्रत्येक जीव आपल्या आयुष्याची गाडी सुरळीत चालवून या जन्मी मुक्तीच्या वाटेवर बराच पुढे जाऊ शकतो. या तीन नियमांचं पालन केलं तर, आपण अनेक संकटं व भोग यातुन सुखरूप बाहेर पडू शकतो, संसारात अर्थात अधिभौतिकात, तरून जाऊ शकतो आणि अध्यात्मिक मार्गावर उन्नत होऊ शकतो.
हे असं होण्यात कसलीही अडचण खरतर यायला नको. परंतु तरीही हे या सूत्रातील समीकरणानुरूप होत नाही. याचं महत्वाचं कारण या समीकरणात धरलेल्या सूत्रात दोन क्ष आहेत. ते क्ष, जे आपल्याला गृहीत धरून, योजलेले आहेत, ते व्यक्तिसापेक्ष असल्यामुळे, गणिता तील सुत्रांप्रमाणे, हे समीकरण कार्य करत नाही. अर्थातच प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तित्व, स्वभाव, गुणविशेष, प्रारब्ध, संचित यानुसार सदर सूत्रातील क्ष ची किंमत,प्रभाव आणि शक्ती बदलत जाते.
या सूत्राला चालवायला जरुरी ऊर्जा ही आत्मयज्ञातून प्राप्त होणार असल्यामुळे, वाफेवर वा विजेवर चालणाऱ्या इंजिनाप्रमाणे कार्यरत असतं. म्हणजेच जसा इंजिनाचा वेग हा उपलब्ध वाफेच्या वा विजेच्या प्रमाणाशी समान असल्या मुळे, ज्याप्रमाणे पुरेशी वाफ निर्माण होईल वा पुरेशी वीज उपलब्ध होईल, म्हणजेच पुरेशी ऊर्जा प्राप्त होईल, त्यानुसार इंजिन गतिमान राहील आणि नियोजित स्थानी वेळेत पोचेल.
हे दोन क्ष म्हणजे श्रद्धा आणि दृढ विश्वास. हे दोन क्ष, मनःशक्ती व इच्छाशक्ती या ऊर्जेवर अवलंबून आहेत. म्हणजेच सद्गुरुसेवा, सद्गुरुचिंतन व सद्गुरूंनी दिलेला मंत्र या त्रयीला वा समीकरणाला चालवण्यासाठी मनाची आणि इच्छेची शक्ती हीच अंतिमतः कारक आहे. कारक जितका शक्तीवान, तितकीच या सूत्राची किंमत मोजता येईल वा उत्तर काढता येईल. पण हे उत्तर दोनच जण देऊ शकतात. एक म्हणजे तो साधक स्वतः आणि सद्गुरू.
पण याचा अर्थ असा होतो की, गणितातील सूत्राप्रमाणे हे सूत्र कार्य करू शकत नाही. कारण मन आणि इच्छेचं बल हे मनाच्या सक्षमतेवर, आघात, घात, भोग, उपभोग याचा मारा पचवून स्थिर राहण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे आणि मन हे सतत दोलायमान असतं. किंवा मनाची ती नैसर्गिक अवस्थाच आहे. आपण मागे पाहिल्यानुसार मन हे आकाशा सम असल्यामुळे स्थिर राहू शकत नाही. ते प्रत्येक प्रसंग, वेळ, घटना, यानुसार अस्थिरच राहणार किंवा होणार.
मग याला उपाय काय आणि कसा करायचा. उपाय एकच आपलं लक्ष दृढ धरून, त्यावर लक्ष केंद्रित करून, मनाला त्या लक्ष्यावर स्थिर करून साधना करणं. लक्ष आपली आत्मोन्नती, ऊर्जा इच्छाशक्ती व मनःशक्ती आणि दोन क्ष श्रद्धा आणि विश्वास. विश्वास हा मनाला बांधून ठेवतो आणि श्रद्धा मार्गावर संकटं व भोग इत्यादीचा सामना करत साधनेला मार्गस्थ ठेवते.
यात येणाऱ्या वा आलेल्या संकटांच्या मालिका या एक प्रकारे आपली श्रद्धा आणि विश्वास यांची दृढता यांची परीक्षा घेतात, हे ध्यानात ठेवलं की, अश्या संकटांनी मन विचलित होणार नाही. म्हणजेच आपल्या उन्नत्तीचा मार्ग आपल्याच श्रद्धेवर आणि मनाच्या व इच्छेच्या ऊर्जेवर अवलंबून आहे. म्हणजेच अविचल राहून, श्रद्धा स्थिर ठेवून साधना करत राहणं हे आणि हेच आपल्या हातात आहे, हे ध्यानात ठेवलं पाहिजे. म्हणजेच सद्गुरुकृपेचा ओघ, तुमच्याच दृढतेवर आणि साधनेवर अवलंबून आहे. तेवढे सांभाळले तर,बाकीचे सद्गुरू पाहून घेतील. आता या सर्वांवर संचिताचा कितपत परिणाम होतो ते उद्या पाहू.
उद्या पुन्हा भेटूच. तोपर्यंत नाम घ्या दृढ रहा, स्थिर रहा, गुरुकृपा होईल हे नक्की.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत आणि श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ हे लवकरच प्रकाशित होणारं, पुस्तक ज्यांना हवं आहे त्यांनी, खालील व्हाट्सअप्प क्रमांकावर मेसेज करून वा फोन करून संपर्क करावा आणि नोंदणी करून घ्यावी .
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०७/०६/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment