भोग आणि ईश्वर २७८
विवेक म्हणजे सारासार, तार्किक विचार. ज्याला साधक बाधक विचार असंही म्हणता येईल. म्हणजेच पूर्ण शुद्धीत आत्मसंयम स्थितीत मनाने केलेला विचार. मनाला सारासार, विवेक यांची सवय तेंव्हाच लागेल, ज्यावेळी विचार करण्याची पद्धती संपूर्णपणे वा आमूलाग्र त्या दृष्टीने कार्यरत होईल. म्हणजेच, एखाद्या गोष्टी अथवा प्रसंगापूरते आपण विवेकाने वागत असूही शकतो. पण ज्यावेळी संपूर्ण व्यक्तित्व हे, त्या दिशेने विचार करायला लागेल, त्यावेळी विवेक खऱ्या अर्थाने जागृत झाला असे म्हणता येईल.
मुळात मनाला अश्याप्रकारे शांतपणे विचार करण्याची सवय जडवून घेणं महत्वाचं आहे. कोणत्याही प्रसंगात धीराने वागणारी माणसं, कधीही खचत नाहीत वा डगमगत नाहीत, किंवा एखाद्या प्रसंगात अतिउत्साही सुद्धा होत नाहीत, एखाद्या स्तुतीने भारावून जात नाहीत वा कोणी बोल लावले म्हणून निराश वा हताश किंवा हतोत्साहित होत नाहीत. अशी लोकं इतरांनासुद्धा हाच धीर देऊन, त्यांनाही विवेकाने विचार करण्याकरता प्रोत्साहित करून मार्गदर्शन करतात.
अश्या व्यक्तींच्या वागण्यात व विचारात खोली किंवा depth किंवा गहराई असते. म्हणजेच ज्याचं वागणं वा बोलणं उथळ नसतं आणि चारही अंगांचा विचार करून घेतलेले निर्णय हे त्यांचं वैशिष्ट्य असतं. पण अश्या प्रकारची सवय मनाला जडवून घ्यायला, मन आधी शांत करणं जरुरीचं आहे. कारण मन जितकं शांत तितकीच त्याची खोली व रुंदी जास्त.
खरतर मागेच आपण पाहिलं आहे की मन हे अवकाशा समान आहे. म्हणजेच अवकाशाचे गुणधर्म त्याला लागू पडतात. याचा अर्थ उथळ मन म्हणजे पावसाळ्यात आकाश जमिनीवर उतरलेला काळ. त्यावेळी आकाश खाली उतरून आलेलं असल्यामुळे वातावरणाची खोली खूप कमी असते. त्याचप्रमाणे ढग उतरून आल्यामुळे, बाष्पसुद्धा अधिक जमा झालेलं असतं. अश्या वातावरणाला कुंद वातावरण म्हणता येईल.
अशांत मन हे या वातावरणाप्रमाणे असतं. म्हणूनच अश्या ढगाळ वातावरणात पाऊस लगेच येतो, त्याप्रमाणे अश्या मनःस्थितीतील व्यक्ती, कोणत्याही क्षुल्लक गोष्टीने चिडण्याची शक्यता वा खात्री अधिक असते. कारण अश्या मनःस्थितीत पाऊस लगेच पडतो. म्हणजेच बरसण्याची प्रक्रिया त्वरेने होते. ज्यावेळी अश्या व्यक्ती आपल्याला दिसतील वा भेटतील, त्यावेळी हे जरूर समजून जा की, वातावरण उथळ आहे आणि विचार व आचार यांची खोली खूपच कमी आहे.
या विरुद्ध हिवाळ्यातील वातावरण, धुकं, गारवा, थंडपणा यामुळे, उत्साह असला तरी कृतिशून्यता किंवा निष्क्रियता असते. म्हणजे पावसाळ्याच्या विरुद्ध वातावरण. अश्या मनाच्या व्यक्ती, उत्साह दाखवतील, पण कृतिशून्यतेमुळे फार काही घडेल असं शक्य नाही. अश्या व्यक्ती कदाचित प्रोत्साहित करतीलही, पण त्यांचा सहभाग हा गृहीत धरू नये. इथे देखील विचारांची खोली कमी असू शकते. कधीकधी विचारांना पुरेशी खोली असूनही, निष्क्रियता ही त्या विचारांच्या खोलीला प्रत्यक्ष कृतीत उतरू देत नाही. म्हणजेच, खोली असूनही, विचारांचं प्रकटीकरण हे खूप कमी असतं. आपण ज्याला अव्यक्तता म्हणतो, ती स्थिती.
यातील, पुढचा प्रकार उद्या पाहूया. तोपर्यंत नामाच्या साधनेने, विचारांची खोली वाढेल प्रयत्न, त्यामुळे करत रहा.
भाग २ ची नोंदणी आजच सुरू केली आहे. ३० ऑगस्ट रोजी पुस्तक प्रकाशित होईल आणि त्यानंतर लगेच कुरियर होईल. प्रकाशनपूर्व सवलत रु.१४०/- (रु.११०+ रु.३०). 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र रु.२५०/- कुरियरसह. यात लेख क्र ६८ ते १३६ पर्यंत लेख आहेत.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लांबलं. पण लवकरच हे पूर्ण होईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०४/०९/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment