भोग आणि ईश्वर २९६
वास्तविक ज्ञान येणं किंवा ज्ञानी होणं हे लौकिकार्थाने वेगळं आणि आध्यात्मिक अर्थाने वेगळं आहे. व्यावहारिक किंवा सांसारिक अर्थाने ज्ञानी म्हणजे लिहिता, वाचता व नोकरी धंदा करून पोट भरू शकणारा. पण अध्यात्मिक वा पारमार्थिक अर्थाने ज्ञान म्हणजे आत्म्याबद्दलचं, आत्मोन्नती व आत्मउद्धारा साठी प्राप्त झालेलं ज्ञान. मग हे ज्ञान येतं वा मिळतं कुठून, हा एक सर्वसामान्य प्रश्न आहे, त्याचा जरा परामर्ष घेऊया.
वास्तविक अर्थाने हे ज्ञान आतच अंतरात्म्यात वास करून असतं.
जीवात्मा ज्यावेळी मूळ ईश्वरापासून विलग होऊन, जडदेह धारण करण्यासाठी ब्रह्मांडात दाखल होतो, त्यावेळी तो चैतन्य रूपात किंवा अवस्थेत असतो. जोपर्यंत तो जडदेही दाखल होत नाही, तोपर्यंत तो हे जाणत असतो की,मी कुठून आलो आणि मला कुठे परत जायचं. पण जडदेह धारण करून, उदरातून या जगतात दाखल होताच, त्या सर्व ज्ञानाचं हळूहळू विस्मरण होऊन
जीव या जगतात आणि जगताच्या व्यवस्थेत गुंतला जातो.
मूळ चैतन्यस्वरूपात प्राप्त झालेलं किंवा ईश्वराकडून विभक्त होताना असलेलं ज्ञान लुप्त होतं का आणि होतं तर कुठे जातं, हा एक प्रश्न मनात येणं सहाजिक आहे. हे ज्ञान लुप्त होतं म्हणजे ते झाकोळलं जातं. त्यावर जडदेहातील कर्माची, कर्मफलाची पुटं किंवा काजळी प्रत्येक जन्मात चढत जाते. प्राणिजन्मांत हे ज्ञान पूर्ण लुप्त असतं, कारण त्या देहात फक्त चार संवेदनांची केंद्रे जागृत असतात. भूक, भय निद्रा आणि मैथुन. लक्ष लक्ष प्राणिजन्मातून प्रगती करत करत जीव मानवाच्या देहात येतो. इथे त्याला सर्व जाणिवांची, संवेदनांची प्राप्ती होते. पण त्यांची वाढ व जाणीव ही मूलतः प्राप्त संस्कारा तून होते.
हे संस्कार अनेक मनुष्य जन्मातून घडत गेल्यामुळे, दाट किंवा गडद असतात. आपण विचार करूया की, बरेच महिन्यात किंवा वर्षात न साफ केलेला एखादा कपडा वा भांडं,जर स्वच्छ करायचं म्हटलं तर काय आणि किती त्रास होईल, तसाच त्रास हा आत्मा शुद्ध करताना व त्यावरून जन्मोजन्मीचे संस्कार व अनिष्ट गोष्टींची घाण वा काजळी काढताना होतो. ही प्रक्रिया अनेक अंगांनी घडत असते. अनेक प्रकारची माध्यमं त्यासाठी योजली व वापरली जातात.
ही प्रक्रिया नित्य प्रत्येक जीवाच्याबाबत सुरू असतेच. पण त्यात पुन्हा पुन्हा कर्मांची, प्रतिक्रियांची भर पडत जाते आणि काजळी साफ न होता अजून गडद होत जाते. उपभोग हे या काजळीला गडद करतात, कारण बहुतांशी ते माया व मोह यांना कार्याला लावतात. म्हणजेच अश्या उपभोगाच्या काळात, देह हा, अहं गर्व द्वेष निंदा मत्सर स्पर्धा या सर्व खेळातून, जातो आणि आत्म्यावरील काजळीला अजून गडद वेष्टनं चढत जातात.
आता भोगांचा काळ हा मुख्यतः ही काजळी काढून आत्मतेज प्रकाशित करण्यासाठी आहे किंवा असतो. अश्या काळात ईश्वर चिंतनातून मन बुद्धी कलुषित व भ्रमित होण्यापासून वाचणं आणि हा काळ फक्त लख्ख होण्यासाठी आहे, हे जाणणं, यासाठी आहे किंवा असतो. या सर्व शुद्धी प्रक्रिया आहेत. कारण भोगांचा काळ म्हणजे गतकर्मातील त्याज्य, चुकीच्या व अनिष्ट कर्मांच्या फलातून मुक्त होऊन पुढे जाण्याचा काळ आहे.
एखादं उदाहरण घेऊ म्हणजे मुद्दा अजून स्पष्ट होईल. आपण भांडी घासताना, आधी त्या भांड्याला पाणी लावून, त्याला ओलं करतो, नन्तर त्या भांड्याला साबण वा पावडर किंवा तत्सम माध्यम वापरून, घासतो. त्यानंतर त्या भांड्याला पून्हा पाण्यातून धुवून लावलेला साबण वा पावडर आणि त्यासोबत निघून आलेला मळ, घाण, पुटं किंवा काजळी धुवून स्वच्छ करतो. ही एवढी सर्व प्रक्रिया झाली की, भांडं स्वच्छ होतं. जर पहिल्या प्रयत्नात भांडं स्वच्छ झालं नाही तर पुन्हा एकदा तीच प्रक्रिया करतो. म्हणजे पावडर, घासणं आणि पाण्याने धुणं.
आता आपल्या आयुष्याशी याचा संबंध जोडू. प्रत्येक आत्मा या शुद्धी प्रक्रियेतून जात असतो. उपभोगांचा व सुखाचा काळ म्हणजे त्या प्रक्रिये आधीची जलशुद्धी. भोग दुःख, दैन्य, काळजी चिंता यांचा काळ म्हणजे पावडर लावून घासणीने घासून भांड्यावरील घाण,पुटं काढण्याचा काळ, त्यासाठी भोग व दुःख हे पावडर किंवा साबणासम माध्यम म्हणून काम करतात. तो काळ म्हणजे, घर्षण किंवा शुद्धीकरण प्रक्रिया आहे. त्यानंतर आलेला सुखाचा काळ म्हणजे घासण्यानंतरची जलशुद्धी प्रक्रिया. म्हणजे भोगांच्या काळात घासून निघालेली, जन्मोजन्मीची काजळी भोगानंतरच्या शुद्धी प्रक्रियेत पूर्ण निघावी हा उद्देश असतो.
आता या सर्व गोष्टींचा कसा आणि काय मतितार्थ घ्यावा आणि आधीच्या भागातील जाणिवांच्या चिंतानाशी त्याचा काय व कसा संबंध आहे, हे उद्याच्या भागात बघूया.
प्रिंट होऊन पुस्तकं कालच प्राप्त झालेली आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू होईल आणि त्यांना तसं सूचित केलं जाईल. प्रकाशनपूर्व सवलत रु.१४०/- (रु.११०+ रु.३०) २५ सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र रु.२५०/- कुरियरसह. यात लेख क्र ६८ ते १३६ पर्यंत लेख आहेत.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लांबलं. पण लवकरच हे पूर्ण होईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२२/०९/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
Comments
Post a Comment