Skip to main content

भोग आणि ईश्वर २९९

भोग आणि ईश्वर  २९९

काळाच्या लेखातील भगवान श्रीकृष्णांच्या दोन मुद्द्यांवर पुढे चर्चा कारण्याधी आपण संघर्षाच्या, दुःखाच्या आणि भोगांच्या बाबतीत थोडं चिंतन करूया आणि त्यानंतर श्रीकृष्णांच्या मुद्द्याकडे वळूया. 

स्वतःच्या आणि इतरांच्या अनुभवातून, एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते कि, भोगाच्या किंवा दुःखाच्या काळात सर्वात प्रथम पडदा पडतो तो म्हणजे बुद्धीवर आणि संभ्रम निर्माण होतो तो मनात. म्हणून याच काळात सर्वात जास्त चुका किंवा अनिष्ट गोष्टी वा विचार किंवा लहरींचा प्रभाव पडून, चुकीचा मार्ग किंवा गोंधळ होऊन मनाची दुर्बलता वाढण्याचा संभव जास्त असतो. मनाने कणखर असणारी माणसंसुद्धा अश्या काळात थोडीफार दोलायमान होतात. अगदी कणखर, म्हणजे ज्यांना जन्मतः मनाची कणखरता प्राप्त आहे किंवा योगसाधनेने त्यांनी ती प्राप्त केली आहे, त्यांनाच  अश्या काळात अशी संभ्रमावस्था जाणवत नाही. अन्यथा सर्वसामान्य जनांना अश्या काळात नक्कीच तीव्र मानसिक आणि आत्मिक संघर्ष करावाच लागतो. 

या समस्या सामाजिक, आर्थिक, सांसारिक अर्थात व्यक्तिगत, कौटुंबिक किंवा सामूहिक पातळीवरील असतील. पण त्यातून प्रत्येकाला व्यक्तिगत आणि सांसारिक अश्या दोन्ही पातळीवर संघर्ष करावा लागतो. समस्यांशी लढणं हे क्रमप्राप्त असतंच. पण भोग आणि दुःख यांनी मनुष्याचं मन जास्त त्रस्त होतं. विवंचना आर्थिक असतील, वियोगाच्या असतील किंवा मानसिक त्रास देणाऱ्या इतर काहीही असतील, पण त्यातून जाताना मनाची शक्ती खर्च होतेच, पण बरेचवेळा कधीही न भरून निघणारी मानसिक हानी सुद्धा होते. 

अश्या काळात मनाला अनेक पातळ्यांवर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अश्या   काळात कुणी मनःस्थिती सुधारणारे उपाय सांगितले तरी निरुपाय होतो किंवा ऐकून काहीच करावसं वाटत नाही. आयुष्यातील असे बरेच प्रसंग किंवा असा काळ अनेकांनी अनुभवाला असेल. जर सामाजिक वा करोनासारखी सामूहिक हानी करणारी समस्या असेल तर, मनाला थोडंफार समजावता येतं की, निदान मला एकट्याला यातून जावं लागत नाही. यात इतर अनेक जण भरडले जात आहेत याचा आनंद असण्याचा संबंध नाही, पण आपल्याबरोबर अनेकजण यातून होरपळले जात आहेत, हि जाणीव मनाला अजून कमजोर किंवा कमकुवत होण्यापासून वाचवते. अश्या काळात बहुतेक जण सर्व उपाय करतात, जेणेकरून काही भौतिक लाभ झाला नाही तरी मनाची शांती होते. 

पण जर समस्या व्यक्तिगत पातळीवर असेल, तर मनाला उभारी देणं अत्यंत कठीण असतं . कारण अश्या काळात आपण जगापासून वेगळे आहोत आणि आपणच या काळातून जात आहोत, हि भावना मनाला जास्त जाळते. म्हणजेच मूळ समस्येवर बुद्धी, मन काम करतच असतंच, पण अनेक इतर भावभावना या काळात मनाला ग्रस्त  आणि त्रस्त करतात.  म्हणूनच अश्या काळात मन शांत राहील असे उपाय करावे. याचं कारण अश्या काळात आपण समस्येसाठी उपाय करत असतोच आणि त्याचा उचित परिणाम हा प्रारब्धात असलेल्या भोगांनुसार होईल आणि त्याचे चटके सहन करावे लागतीलच. पण त्यातून तावून सुलाखून बाहेर येणं हि प्राथमिक महत्वाची इच्छा मनात असते. प्रारब्धाचा हा फेरा. प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात काढावा लागतो. 

पण प्रत्येकाची त्याकडे बघण्याची शक्ती, दृष्टी, इच्छा, प्रयत्न हे वेगवेगळे असतात. यातही, कर्माची गती आणि त्याची व्याप्ती कशी आहे किंवा आपले पूर्वकर्म किती घोर होते यावर, सर्व अवलंबून आहे किंवा असते. कित्येक जणांच्या बाबतीत हा काळ काही दिवस ते काही वर्षसुद्धा असू शकतो. अशी कित्येक माणसं पाहण्यात आहेत ज्यांना आयुष्यातील अनेक वर्ष या किंवा अश्या प्रकारच्या काळासाठी घालवावी लागतात. काहींच आयुष्य यात नष्ट होतं . म्हणजे याचा परिणाम किंवा व्याप्ती पुढील जन्मातसुद्धा जाते किंवा carry forward होते. अर्थात म्हणजे पुढील जन्मात, जन्मतः समस्यांची सुरवात आणि संघर्षमय जीवन जगण्याचा योग प्राप्त होतो. 

विशेष करून ज्यांनी या जन्मात समस्यांपासून पळ काढून, आत्महत्यासारखे उपाय योजले आहेत, त्याची  पळ काढण्याच्या वृत्तीमुळे या देहातून सुटका होते, हा तात्पुरता उपाय झाला. पण दीर्घकालीन परिणाम म्हणजे पुढील जन्मात घोर काळ जन्मतः मागे लागतो. कारण जरी कर्म देह करत असलं तरी मन बुद्धी यांचा त्याच्याशी संबंध असतोच आणि आत्म्याला ते सर्व पुढील देशासाठी वा जन्मासाठी वाहून न्यावंच लागतं. अशी कित्येक आयुष्य पाहिली आहेत  ज्यांना, अत्यंत दुःखदायक वा कष्टप्रद आयुष्य हे जन्मतः ते मृत्यूपर्यंत वाट्याला येतं . कित्येकांना सुरवातीचा काही काळ हा बरा असतो वा जातो, पण एका ठराविक काळानंतर एखादी घटना, समस्या पूर्ण आयुष्य बदलून टाकते आणि घनघोर बनवते. 

कित्येकांना  स्वतः न केलेल्या चुकांमुळे किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या वर्तन वा कर्मामुळे असं खडतर आयुष्य वाट्याला येतं. अश्यावेळी त्या व्यक्तींच्या मनात साहजिकच एक प्रश्न उत्पन्न होतो किंवा सतत मनाला ग्रासतो कि या जन्मात मी काहीही अनिष्ट, अहितकारक, अघोर, पापकारक कर्म केल्याचं स्मरत नाही, मग माझ्या वाट्याला असं खडतर व भोगदायक आयुष्य का वाट्याला यावं. प्रश्न किंवा व्यथा नैसर्गिक आहे.  विचार केला तर यावर उत्तर नाही आणि विचारांचा मार्ग खुंटतो. अशी आयुष्य पाहिल्यानंतर, कधी कधी आपल्याही मनात, विचार येऊन जातात, देव इतका निर्दयी व निष्ठुर कसा. त्याला,अश्या व्यक्तींची, काहीच दया येत नाही का. कि भाव भक्ती, साधना यातील शक्ती क्षीण आहे कि प्रभावहीन आहे. आपल्याही मनात संदेह आणि दुविधा निर्माण करणाऱ्या अश्या आयुष्यावर,त्यावरील उपायांवर आणि भीष्मांच्या कथेतील श्रीकृष्णांच्या दोन मुद्द्यांवर, आपण पुढच्या भागात चर्चा करूया. तोपर्यंत मन शांत करून एकाग्रता साधण्याचा, नामसारखा उपाय करतच राहूया.  

प्रिंट होऊन पुस्तकं कालच प्राप्त झालेली आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू होईल आणि त्यांना तसं सूचित केलं जाईल. प्रकाशनपूर्व सवलत रु.१४०/- (रु.११०+ रु.३०) २५ सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२५०/- कुरियरसह. यात लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख आहेत. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत.  श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लांबलं. पण लवकरच हे पूर्ण होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२५/०९/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...