भोग आणि ईश्वर २८४
काल आपण मनातील शक्तिकेंद्रांविषयी माहिती घेतली. शरीराने दिलेला प्रतिसाद हा कान, डोळे आणि बुद्धी आदी ज्ञानेंद्रियांनी नोंदलेल्या बाह्य जगातील घटनांचं, मनातील सर्वात संवेदनशील शक्तीकेंद्राने केलेलं आकलन आणि त्या आकलना नुसार मनाकडून बुद्धीमार्गे देहाला दिला गेलेला प्रतिसाद असतो. तो आदेश स्वरूपात मेंदूकडून, एकदा देहाकडे प्रसारित केला गेला की, देह, जो एक स्क्रीन आहे आतून आलेल्या संदेशाला दृकश्राव्य स्वरूपात प्रक्षेपित करणारा, त्या संदेशाला क्रियात्मक रुपात प्रक्षेपित करतो.
थोडं जड जाईल कळायला पण हेच सत्य आहे. कारण, आपण मागे पाहिलं त्याप्रमाणे, संपूर्ण मानवी देह हे एक यंत्र आहे, ज्यामध्ये अनेक स्वयंचलित व्यवस्था, विधात्याने स्थापित करून दिल्या आहेत. त्या त्या व्यवस्थेला ते ते कार्य दिलं आहे आणि त्याचं कर्म स्वरूपात प्रक्षेपण, अर्थात क्रिया किंवा प्रतिक्रिया या रुपात, देह वा देहाची इंद्रिये आणि अवयव, आज्ञेनुसार, पार पाडतात. ही सर्व व्यवस्था बुद्धी व मन या दोन नियंत्रकांवर चालते.
ही दोन नियंत्रके, त्यांना प्रत्येक घटनेचं झालेलं आकलन व त्यानुसार करावयाची क्रिया किंवा द्यावयाची प्रतिक्रिया, या स्वरूपात कार्य करतात. या दोन्ही नियंत्रकांना लागणारी ऊर्जा अन्न पाणी याद्वारे मेंदू आणि बुद्धीला, तर ज्ञानाच्या स्वरूपात मनाला प्राप्त होते. देहाशी निगडित भूक व तहान या व्यवस्थेमुळे मेंदूला पुरेशी ऊर्जा प्राप्त होते. पण मनाची भूक ही ज्ञानाने पूर्ण होते किंवा ज्ञान ही मनाची गरज आणि ऊर्जास्त्रोत आहे. अन्य, बाह्य जगातील गोष्टीं मनात अज्ञान निर्माण करतात. ज्यायोगे मनात नको त्या वासना कामना इच्छा द्वेष मत्सर क्रोध इत्यादी निर्माण होतात.
अर्थात या अज्ञानामुळे मनावर एकप्रकारची काजळी निर्माण होते. मनाला चांगलं वाईट यात फरक लक्षात येत नाही. कारण त्या जाणिवांची शक्तिकेंद्रे झाकोळली जातात. ज्यामुळे त्यांचं कार्य शिथिल होतं. या चुकीच्या शक्तिकेंद्रांना अज्ञानामुळे नकारात्मकता विकार काम क्रोध यामार्गाने अनिष्ट ऊर्जा मिळत जाते. ज्यामुळे चुकीच्या क्रिया व प्रतिक्रिया निर्माण होतात आणि देहाकडून, त्याप्रमाणेच कार्य करून घेतलं जातं. हा अंधःकार अनेक जन्माच्या कर्माचा व त्या कर्मफलाची परिणती वा परिणाम असतो.
माणूस याच चक्रात जन्मोजन्मी फिरत राहतो. केलेल्या चुकांचं परिमार्जन न केलं गेल्यामुळे, कर्म-फल-कर्म असा गुंता त्या अधःकारातून व अज्ञानातून निर्माण होतो आणि भोग व उपभोग यांचा खेळ सुरू होतो. म्हणजेच मनुष्य मनातील चुकीची शक्तिकेंद्र आयुष्यभर पोसतो. त्याचा परिणाम आयुष्यभर देह व मन दोघानाही भोगावा लागतो.
देहातील आजाराचं ज्याप्रमाणे योग्य निदान केलं नाही तर, देहाचा आजार वा रोग , देह पोखरून टाकतो. त्याप्रमाणे मनातील हा अंधकाराचा व अज्ञानाचा आजार, मनातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करून, त्याजागी, नकारात्मक ऊर्जा भरत जातो. याच अज्ञानातून, मनात चुकीच्या जाणीवा जाग्या राहतात आणि योग्य जाणीवा निद्रिस्त राहतात.
ज्यामुळे ज्ञानेंद्रियांनी ग्रहण करून, बुद्धी व मन या नियंत्रकांना पोचवलेल्या संदेशांचं, चुकीचं वाचन होऊन, गैरअर्थाने वा चुकीच्या आकलनाने, छोट्या छोट्या घटनेचे, चुकीचे अर्थ लावले जाऊन, चुकीचा प्रतिसाद दिला जातो आणि याची साखळी तयार होते. या अज्ञानामुळे पोसलेल्या चुकीच्या शक्तिकेंद्रांना मिळणारी ऊर्जा बंद करून, योग्य त्या शक्तिकेंद्रांना तीच ऊर्जा पुरवून, त्यांना उद्दीपित कसं करायचं, यावर उद्या चर्चा करूया, पण नामात राहूनच.
भाग २ ची नोंदणी आजच सुरू केली आहे. ३० ऑगस्ट रोजी पुस्तक प्रकाशित होईल आणि त्यानंतर लगेच कुरियर होईल. प्रकाशनपूर्व सवलत रु.१४०/- (रु.११०+ रु.३०). 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र रु.२५०/- कुरियरसह. यात लेख क्र ६८ ते १३६ पर्यंत लेख आहेत.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लांबलं. पण लवकरच हे पूर्ण होईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१०/०९/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment