Skip to main content

भोग आणि ईश्वर ३०१

भोग आणि ईश्वर  ३०१ 

कालच्या उदाहरणाला पुढे नेऊ आणि आपलं चिंतन पुढे सुरू करूया. मुळात त्या चेंडूला वेगवेगळ्या कोनातून समोर भिंतीवर फेकणे आणि त्या चेंडूचा वेगवेगळ्या कोनातून परतावा होणे, याचा अन्वयार्थ लावू. चेंडू सरळ फेकला की तो आपल्याकडे सरळ येणे, हे याच जन्मा तील कर्माचं फलित याच जन्मात मिळून, त्या कर्माचा हिशोब पूर्ण होणे. म्हणजे काही कर्मे निश्चितच याच जन्मात घडून, याच जन्मात आपलं फलित देऊन शांत होतात. याच चेंडूच्या उदाहरणावरील विवेचन पुढे सुरू ठेवू, पुढच्या भागात. 

कारण भगवतदगीतेत सांगितल्याप्रमाणे, प्रत्येक कर्म, आपलं कार्य पूर्ण झाल्याशिवाय शांत होत नाही, किंवा मोक्षास जात नाही. म्हणजे कर्मालासुद्धा मोक्ष असतो तर. असा एक प्रश्न यातून डोकावेल. त्याचं उत्तर, हो असं देता येईल. कर्माचा मोक्ष म्हणजे कर्माचं फलित देऊन शांत होणं. नियम तोच for every action...... आता काही कर्म असतात जी त्वरित किंवा याच जन्मात जन्मून याच जन्मात मोक्षाप्रत जातात. पण त्याची प्रचिती कशी घ्यायची. 

इथे  आपण व्यावहारिक कर्मांच्याबाबत विचार करूया. कारण त्यांचं फलित हे बहुदा त्वरित किंवा याच जन्मात सहसा फलप्रद होतं. मुळात कर्म ही आपण एखाद्याशी केलेला व्यवहार आहे. तो शब्दांचा असेल, हावभाव किंवा चेहऱ्यावरील काही प्रकटी करण असेल, नोकरी धंदा यांसारखी नित्याची कर्म असतील, शारीरिक किंवा मानसिक व्यवहार असेल, सांसारिक नित्य कर्म असतील किंवा यासारखे अनेक व्यवहार असतील. त्यांचं पक्व होऊन फल देणं हे काही संसारिक व्यावहारिक नियमांनी बद्ध असतं. 

असे नियम कदाचित माणसाने बांधलेल्या संस्था, कायदे, व्यवस्था यांच्या चौकटीतील असतील, तर ते त्या त्या नियमां नुसार फल देतील. उदाहरणार्थ एखाद्या संस्थेतून कर्ज घेतलं आणि ते फेडलं नाही, तर त्याचे परिणाम ठराविक काळानंतर आपल्याला भोगावे लागतील, वसुली, पोलीसकेस, फौजदारी, सुनावणी आणि शिक्षा यारूपात. यातून काही काळ  सुटका वा ढिलाई एखाद्याच्या पुण्याईवर होऊ शकेल. यात एखादा उपलब्ध पैश्याच्या किंवा आपल्या समाजातील वजनाच्या आधारा वर सुटका करून घेईल. पण तीसुद्धा एकप्रकारे त्याची पुण्याईच आहे, की तो त्यासाठी सक्षम आहे. 

दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर, नोकरीत ठराविक काळ सहसा आठवडा किंवा महिनाभर काम केल्यानंतर पगार यास्वरूपात त्या कर्माचा परतावा प्राप्त होतो. पुन्हा यात पूर्व पुण्याई कार्य करतेच. जसं एखाद्याला नोकरीत चांगलं वातावरण मिळतं, पगार वेळेवर मिळतो, बॉस उत्तम असतो, योग्यवेळी योग्य प्रसंगांना रजा मिळते आणि सर्व सुविधांसह नोकरी सुखकारक असते. 

याउलट एखाद्याचं असू शकेल,प्रत्येक नोकरीत त्रास तोच, आयुष्यभर कुठेही स्वस्थता नाही, हातात आलेले पैसे टिकत नाहीत, सतत नोकरीची, कामाची आणि नोकरी टिकण्याची चिंता सतावत असते. या दोन उदाहरणांच्या मध्ये एखाद्याचं आयुष्य मिश्रफल देणारं असू शकेल. पण हे सर्व आपल्या संचितातील जमा पुंजी वा देणी यांचा परिणाम आहे किंवा असतो. ज्याचं संचित जे घेऊन तो तो व्यक्ती आला असेल, त्याला त्याप्रमाणे फलित प्राप्त होतं, हा सरळसाधा नियम विधात्याने बांधून सृष्टी निर्माण केली आहे आणि ती त्याप्रमाणे कार्यरत राहणार, हे नक्की. 

आता याच सांसारिक वा व्यावहारिक संबंधातून आपण सरते शेवटी व्यक्तींशी संबंध ठेवतो किंवा व्यक्तींच्याच संबंधात येतो. म्हणजे दोन भिन्न जन्माच्या व्यक्ती एकत्र येऊन जगातील सांसारिक संबंध प्रस्थापित होऊन, त्यातून कर्म निर्माण होतात. याच कर्माचं फलित भोगून संपण्यासाठी मनुष्य आयुष्य आणि अनेक जन्म व्यतीत करतो. याच कार्यकारण भावाने पूर्ण जगत व्याप्त आहे आणि ब्रह्मांडातील प्रत्येक जीव, अर्थात सजीव वा निर्जीव, आयुष्य काढतो. 

श्रीकृष्णांनी भीष्मांना सांगितलेला पहिला मुद्दा म्हणजे कर्मफल सोयीने भोगणं. आपण आतापर्यंत पाहिलेला व्यवहार व कार्यकारण भावाचा नियम हा सर्वसामान्य जीवांना लागू होतो. भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे भीष्मांच्या पहिल्या जन्मातील एका कर्माचं फल शंभर जन्म फलित न होता अपूर्णवस्थेत होतं. याचं महत्वाचं कारण म्हणजे भीष्म त्यांच्या सर्वांच्या सर्व शंभर जन्मात राजे होते. त्यांच्या प्रत्येक जन्मात, ती एक चूक सोडली तर त्यांनी सर्व कर्म पुण्यकारक, उपकारक व मोक्षकारक केली होती. त्याच कर्माचा परिपाक म्हणून हा शेवटचा जन्म अविस्मरणीय व वंदनीय होता. 

त्यांच्या धार्मिक वृत्तीवरील प्रतिज्ञेचा पडदा आणि आपल्या प्रतिज्ञेसाठी अधर्माशी वचनाबद्धता आणि युद्धातील अधर्माच्या बाजूने त्यांचा सहभाग, हा त्या एका चुकीमुळे, बुद्धीवर पडलेला मायेचा पडदा होता. ज्यामुळे भीष्म बुद्धिमान, चतुर, कुशल प्रशासक, राजकारणी असूनही बुद्धी एकाच संकल्पात आणि संकल्पासाठी बद्ध झाली, चुकीचे निर्णय घेती झाली. या सर्वात, सर्व जाणत असूनही, भगवंत देखील काही करू शकले नाहीत. कारण भीष्म मायेचा पडदा दूर करू शकले नाहीत. 

यावरील विवेचन अजूनही अपूर्ण आहे. ते आपण पुढल्या भागात बघूया, पण नामाची साथ घेऊनच. 

प्रिंट होऊन पुस्तकं कालच प्राप्त झालेली आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू होईल आणि त्यांना तसं सूचित केलं जाईल. प्रकाशनपूर्व सवलत रु.१४०/- (रु.११०+ रु.३०) २५ सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२५०/- कुरियरसह. यात लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख आहेत.  

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत.  श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लांबलं. पण लवकरच हे पूर्ण होईल.  

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२७/०९/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...