भोग आणि ईश्वर २३४
आज एक पोस्ट वाचली आणि त्यावर कोणीतरी केलेली टिप्पणी वाचली, म्हणून त्यावर लिहावंसं वाटलं. मुद्दा असा होता, आज बऱ्याच भागात आलेल्या पूरपरिस्थिती बाबत एक , दोन पोस्ट्स वाचल्या, ज्यात पोस्टकर्त्याने उद्भवलेल्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करून त्यात अडकलेल्या लोकांचं देव रक्षण करो, अशी सदिच्छा व्यक्त केली होती.
यावर खूप जणांनी अनुमोदन देऊन, आपलीही सदिच्छा त्यामध्ये व्यक्त केली होती. यात काहीही आक्षेपार्ह असण्याचं कारण नाही. संवेदनशील मानवी मनाची ती सहज प्रतिक्रिया व तशाच स्वभावाच्या अनेकांनी त्याला प्रतिसाद दिला होता. मुळात दुसऱ्याच्या संकटांना संवेदन शील राहून, मदत करता येत नसेल तर दुरून निदान त्यांच्या सुरक्षेची, स्वास्थ्याची कामना करणं, हा सहज मानवी स्वभाव आहे.
एखादया घटनेला वा प्रसंगाला सामोरे जाण्याची वेळ ज्यांच्यावर येते, त्यांची मनःस्थिती ही, त्या परिस्थितीतून गेलेल्या व्यक्तींनाच समजू वा जाणवू शकते. किंवा ज्या व्यक्ती ती स्थिती पाहून सद्गतीत होतात, त्यांनाच ते समजू शकतं. मग संवेदनशील मन, त्या भावना व्यक्त करून, त्या परिस्थितीत सापडलेल्या वा अडकलेल्या व्यक्तींच्या प्रति, हळहळ व्यक्त करून, त्यांना या संकटातून बाहेर येण्यासाठी, लवकर मदत मिळो आणि त्यातून त्यांना देव कमी त्रासात बाहेर काढून, लवकर सावरायला मदत करो. हा एक सार्वत्रिक भाव त्यात असतो.
याला मराठीत आपण सहृद व्यक्ती वा सहृदय व्यक्तित्व म्हणतो. ज्याला दुसऱ्यांच्या भावनांची कदर असते, कणव असते किंवा दुसरा संकटात असताना आपण त्याला मदत करू शकत नाही, पण निदान प्रार्थना व सहानुभूती पूर्ण भावना व्यक्त करून, आपली मनःस्थिती व्यक्त करू शकतो. दुसऱ्याला लवकर सहाय्य मिळावं यासाठी व्यक्तिगत व सामाजिक पातळीवर, एकप्रकारे केलेली प्रार्थना असते. यात कर्मगती, तरंगलहरी व इच्छाशक्तीची ताकद ओळखणारी व या जगताचा आधार जाणणारी व्यक्ती, त्या अमानवीय शक्तीला एकप्रकारे प्रार्थनाच करते.
त्या प्रार्थनेतून आपल्या भावना आणि सदर व्यक्ती वा वस्ती वा संपूर्ण शहरात अडकलेल्या लोकांना लवकर सहाय्य उपलब्ध होऊन, त्यांची लवकर सुटका होवो, हा सद्भाव त्यामागे असतो. हे खूप नैसर्गिक आणि सहज आहे. कोणतीही वासनारहित, प्रेमळ व कोमल हृदयी व्यक्ती , याचप्रमाणे विचार व्यक्त करेल. यावर देवभोळ्या व देव न मानणाऱ्या व्यक्तींच्या प्रतिक्रियांमध्ये फक्त प्रार्थनेत फरक असेल. पण भाव सहृदच असले पाहिजेत.
यावर एकाने कॉमेंट केली की, देव जर संकटातून सुटका करू शकला असता तर त्याने हे संकट आणलंच का. मुळात कर्मसिद्धांत हा व्यक्तिप्रमाणे संपूर्ण समाजाला सुदधा लागू होतो. अन्यथा सामाजिक संकटं, आपत्ती, युद्ध, दंगली इत्यादी सार्वजनिकरित्या आल्या नसत्या. कारण कुरुक्षेत्रात स्वतः भगवंतांनी उभे राहून, युद्ध कर, अशी आज्ञा, अर्जुनासह पांडवसैन्याला दिलीच नसती. म्हणजेच सार्वजनिकरित्या उद्भवणाऱ्या गोष्टी, या सामूहिक कर्माचं फलित असतं. ते मानवी कर्माचं एकत्रित फल असतं.
याशिवाय पंचमहाभूतांमधील प्रत्येकाची शक्ती अपूर्व आहे. त्यांच्याशी छेडछाड मानव अनेक वर्षांपासून करत आहे. पर्जन्य, वारा, अग्नी, आकाश यांसह पृथ्वी ही ती वरुणाची पांच रुपं, जी मर्यादेत असतील तर मानवी जीवनात स्वर्ग निर्माण होईल. पण मर्यादेपुढे ते गेले, तर होत्याचं नव्हतं करण्याची ताकद, त्यांच्यात आहे, हे निर्विवाद.
पण त्यांना नियंत्रणात ठेवणं हे , त्यांचा निर्माता म्हणून, नक्कीच विश्वापलीकडे असलेल्या, शक्तीच्या हातात आहे. मग त्याला निसर्ग म्हणा किंवा ईश्वर म्हणा, आहे तो एकच. त्या पांच शक्तीना सादर वंदन करून, त्यापुढे नत मस्तक होऊनच त्या रौद्ररूप धारण करू शिकणाऱ्या पांचही रूपाना वा स्वरूपांना आपण शरण जाऊ शकतो.
खरतर यांच्या निर्मितीची योजना विश्वचालकाने का केली असेल, यावर उद्या चर्चा करून हा विषय अजून विस्तृत पणे जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. पण तोपर्यंत आपण नाम घेत राहू, प्रार्थना करत राहू व संकटात अडकलेले लवकर बाहेर पडून सावरू देत, ही सद् इच्छा व्यक्त करू. ईश्वरी शक्ती याकामी त्यांना सहाय्य करो.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२२/०७/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment