भोग आणि ईश्वर ४६५ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
वास्तविक आत्म्याची शुद्धता जितकी अधिक, तितकी, साधनेची ईश्वराप्रत पोचण्याची गती किंवा लहरींची त्या सर्वशक्तिमान परमांशाप्रत जाण्याची शाश्वती अधिक. खरं पाहिलं तर, ईश्वर किंवा ती शक्ती अंशरूपात या देहातच आहे. तो अंश हा अणूसम असल्यामुळे, अणूचा सिद्धांत, जो मानवाने विसाव्या शतकात शोधून काढल्यानंतर आपण जाणलं की, अणुचं विघटन केल्याशिवाय त्यातील शक्ती आपण प्राप्त करू शकत नाही.
किंवा त्या शक्तीप्रत आपण पोचू शकत नाही. पण हा अणू ईश्वरीय अंश असल्यामुळे, आपल्याला त्याच्या प्रत जावं लागेल. म्हणजेच या आत्मरूपातील अणूचं विघटन करणं महत्वाचं ठरतं. सर्व योगयाग ही अष्टांग साधनं, नामजप इत्यादी सर्व त्या अणुचं विघटन करण्यासाठीची पूर्वप्रक्रिया आहे, असं म्हटल्यास ते योग्य ठरेल. परंतु इतक्या गूढ आणि गुह्य स्थानी अर्थात हृदयस्थ असलेल्या अणूरूप आत्म्याच्या शक्तिकेंद्रापर्यंत अर्थात गाभ्यापर्यंत पोचून, त्याचं विघटन करून, त्यातून ईश्वरीय ज्ञान प्राप्त करण्यासाठी उत्तम सात्विक शुद्ध स्वरूपातील चित्ताची आवश्यकता असते.
या चित्तशुद्धीसाठी अनेक मार्ग योजण्यात वा सांगण्यात आले आहेत. त्यातील कोणत्याही मार्गाचा अवलंब करून शुद्ध चित्ताच्या माध्यमातून, शुद्ध तत्वाच्या आत्म्याच्या गाभ्यापर्यंत पोचण्यासाठी, अनेक जन्मांची पुण्याई एकत्र यावी लागते. अंतःकरणाच्या शुद्ध स्वरूपाला प्राप्त झालेला जीव, पुढील मार्गक्रमण ईश्वराच्या कृपेने, सद्गुरुंच्या मार्गदर्शनाने करतो.
म्हणजे सद्गुरू प्राप्तीचा योग हादेखील ईश्वरी कृपेचाच परिणाम आहे, हे नक्की समजा.कारण ज्या जीवांना, त्यांच्या प्रारब्ध योगातील, पुण्यसंचय परिणामरूपात, या ज्ञानाच्या प्राप्तीचा अधिकार मिळतो, त्यांना, ती शक्ती, या देहातील आत्मशक्तीला जागृत करण्याचा मार्ग, स्वतः मिळवून देते. प्रत्यक्ष शक्य नसेल त्यावेळी, सद्गुरूंची भेट घडवून, त्यांच्या कृपाप्रसादाच्या माध्यमातून, ही सुलभता, स्वतः ईश्वर साधून देतो.
यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, जीवाने, स्वतः वाटचाल करत असलेल्या मार्गावर, दृढतेने, निश्चयाने, आत्मविश्वासाने चालत राहिलं पाहिजे. ते करत असताना, आपल्या मनातील, एक एक विषय, वासना, अवगुण वृतींचा पसारा यांना बांध घालून, नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत राहीलं पाहिजे. कारण जोपर्यंत देह आहे, तोपर्यंत विषय वासना अप्रस्तुत भाव, दुःख, सुख, वेदना हे सर्व येतच राहणार.
त्यात जीव गुरफटत राहणार. यामध्ये सर्वात महत्वाचं सूत्र जे ध्यानात धरावं लागेल ते म्हणजे देह प्रारब्धाने प्राप्त भोग व उपभोग घेतच राहणार. त्याचा तो धर्म आहे आणि ते टाळणं ईश्वराला देखील अशक्य आहे. प्रश्न जटिल तेंव्हा होतो, जेंव्हा मन व वृत्ती त्यात गुंतून, अकारण पुढील कर्मबंधनं तयार करून, कर्मफलाचा गुंता निर्माण करतात.
म्हणून भोग भोगून संपवावे आणि उपभोग घेऊनसुद्धा निर्मोही आणि निर्विकल्प राहावे. यापुढील चिंतन उद्याच्या भागात सुरू ठेवू. पण तोपर्यंत सद्गुरू कृपेने प्राप्त नाम घेत राहून, चित्तशुद्धी साधण्याचा प्रयत्न करत राहू.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१०/०३/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment