Skip to main content

भोग आणि ईश्वर ४८७

भोग आणि ईश्वर  ४८७  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
  
यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात्।
विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे।। 

कोणतीही चल वा अस्थिर गोष्ट,वस्तू वा शक्ती, नियंत्रित करण्यासाठी, एखादी अचल, स्थिर आणि तितकीच किंवा त्याहून जास्त शक्तीची गरज असते, हे तर वैज्ञानिक सत्य आहे. जसं एखादा ताकदवान वळू वा बैल किंवा घोडा बांधण्यासाठी, तितकाच मजबूत आणि घट्ट रोवलेला, अर्थात स्थिर असलेला खुंटा लागतो, हे तर सत्य आहे.त्याचप्रमाणे अस्थिर,अविवेकी आणि अकस्मात क्षणात  माया मोह, लोभ मत्सर दुःख या अनेक भावात लुप्त होणाऱ्या, वायुगतीने चल असणाऱ्या  मनाला बांधणं, हे महाकर्मकठीण काम आहे. 

भले भले आयुष्य घालवूनही हे जमवू शकतील याची खात्री देणार नाहीत. त्यामुळे अश्या मनाला स्थिर करणं जमेल याची शक्यता नाही. त्यातही आपण हे जाणतो आणि अनुभवतो की, मनात अपार शक्ती आणि ऊर्जा आहे. ते पाऱ्यासमान आहे. म्हणजे नियंत्रित करायला गेल्यावर तितक्याच वेगात व कल्पना तीतपणे कधी निसटून जाईल, हे सांगता येणार नाही. म्हणजे नियंत्रणाच्या नुसत्या कल्पनेने आधीच अस्थिर असलेलं मन, अजूनच अस्थिर होतं. 

आपण अनेकदा असे प्रयत्न केले असतील किंवा करून बघितले असतील, ज्यावेळी आपण शांत बसून, स्थिर राहून, मनाला काहीकाळ स्तब्ध व शांत करण्याचा प्रयत्न केला असेल. पण काही क्षण किंवा क्षणाचा काही भागसुद्धा आपण हे साधू शकत नाही. नक्की अशी कोणती गोष्ट आहे, ज्यामुळे हे अशक्य होतं आणि कोणत्या उपायाने हे साध्य होतं, याचा विचार करूया. आपण पाण्याचा भोवरा पाहिला असेल, ज्यामध्ये सर्व वस्तू फिरत फिरत, त्या भोवऱ्याच्या केंद्रस्थानी अर्थात मध्यभागी जाऊन, अंततः तळाशी जातात. 

अर्थात त्या भोवऱ्याच्या खोलीवर, त्या वस्तू किती आत जाणार हे अवलंबून आहे. जिथे केंद्र निमुळतं होत समाप्त होतं, तिथं ती वस्तू पुन्हा त्या भोवऱ्याबाहेर फेकली जाते, हे साधं गणित. त्या भोवऱ्याच्या वेग व बल यावर, त्या वस्तूचं एकूण भविष्य अवलंबून असतं. म्हणजे ती तशीच बाहेर पडणार की, त्याचं रूप आकार बदलणार. अशीच अजून दोन उदाहरणं घेता येतील. एक म्हणजे वावटळ किंवा चक्रीवादळ, ज्याला आपण म्हणतो. यामध्येसुद्धा अडकलेली वस्तू, भोवऱ्याच्या विरुद्ध दिशेने अर्थात वरून बाहेर फेकली जाते. यातही त्या वस्तूचं भवितव्य वाऱ्याच्या वेगावर आणि वावटळीच्या परिघावर अवलंबून आहे. 

असंच दुसरं उदाहरण म्हणजे कृष्णविवर. कृष्णविवर ही अंतराळात असलेली अशी निर्वात पोकळी आहे, भवरा किंवा वावटळी प्रमाणे, ज्यामध्ये अनेक ग्रह, तारे, संपूर्ण आकाशगंगा अर्थात galaxy गिळून नष्ट करण्याची प्रचंड शक्ती आणि ऊर्जा असते. या तिन्ही उदाहरणात एक समान तत्व आहे, ते म्हणजे आपल्या ताकदीने, ऊर्जेने, बलाने आसपास असलेल्या सर्व वस्तूंची, स्वतःची शक्ती व ऊर्जा संपवून, त्यांना आपल्यात सामावून घ्यायचं. त्यांचं मूळ रूप स्वरूप नष्ट करायचं. 

यातील सर्वात मोठं तत्व म्हणजे त्या वस्तूची गती नियंत्रित करून, वा रोखून, मग त्याला आपल्यात सामावून घ्यायचं. यावरच आधारित एक तत्व, उपाय, जो भगवंतांनी शेवटचा उपाय म्हणून भगवद्गीतेत मांडला. त्याचं दीर्घ चिंतन गेले सात आठ भाग आपण करत आहोत, त्यावर उद्याच्या भागात, या तीन उदाहरणाच्या माध्यमातून, विचार करूया. अर्थात आपलं नाम, नित्यनेमाने घेतच राहूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०१/०४/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...