भोग आणि ईश्वर ४५७ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
कोणत्याही वृत्तीचा, प्रवृत्तीचा, स्वभावाचा वा तत्वाचा माणूस असो, चित्तशुद्धी व आत्मशुद्धीचा मार्ग, मनाला शांत करून, त्या मनाला, चिंतन आणि साधना यात गुंतवूनच पुढे जातो. म्हणजेच एका अर्थाने पाहिलं तर व्यक्तीच्या वृत्तीमुळे पुढे जाण्याचा मार्ग बदलत नाही. पण त्यामुळे, मनाला शांत करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयासांना मात्र कमी अधिक वेळ लागू शकतो.
जसं जलतत्वाच्या व्यक्ती, हे सहजी साध्य करून, त्या प्रवाहात पुढे जाऊ शकतात. पण पृथ्वीतत्वाच्या प्रभावा तील व्यक्तींना, महत्प्रयास लागतील, हे करावं की न करावं हे ठरवण्यासाठी. म्हणजे उद्देश ठरवण्यासाठी लागणारं चिंतन, त्यांच्याकडे नसल्यामुळे, त्यांना आधी मनाला, काही विचार स्वीकारायला लावून, ते आत्मसात करावे लागतील व काही विचारांचा त्याग करून, त्यासाठी पूर्वतयारी करावी लागणार.
अग्नीतत्वाने युक्त व्यक्तींना अजून गहन समस्येला तोंड द्यायचं आहे. कारण मनाला शांत करून, अंतर्मुख होण्या साठी अग्नितत्वाचा प्रभाव कमी करून, आकाश तत्वाचा स्वीकार मनाला करावा लागणार. म्हणजे त्यांच्यासाठी संघर्ष मोठा आहे. कारण शीघ्रकोपी वृत्ती बाळगणाऱ्या अश्या व्यक्तींना पार कन्याकुमारी ते हिमाचल असा प्रवास करणं क्रमप्राप्त आहे. कारण आगीवर मात करून त्यातून शीतल जलनिर्मित शांतवृत्ती अंगिकारणं, हा मार्ग कठीण जरूर आहे.
अश्या व्यक्तींना सर्वात प्रथम, क्रोध येईल त्या त्या वेळेला, मनाला समजावण्याची सवय जडवून घ्यावी लागेल. या साठी त्यांना, विचारांच्या गतीवर आधी नियंत्रण आणावं लागेल. म्हणजे बोलण्याआधी एक क्षण थांबलं की आपो आप मन, मनात वा डोक्यात आलेल्या शीघ्र विचारांवर चिंतन करेल. म्हणजे बोलण्याआधी।विचार करायची सवय लागेल. यासाठी सर्वात प्रथम मनाला एक प्रश्न करायची सवय जडवून घ्यायची, माझ्या मनात वा बुद्धीत जो विचार आला आहे, तो बोलून दाखवण्याची खरच गरज आहे का की जरा थांबून बघूया.
यामुळे बोलण्याआधी, मनाला काही क्षण मिळतील, जेणे करून चिंतनाची सवय मनाला जडेल. असा प्रयत्न व स्वतःचा अभ्यास केल्यास, लक्षात येईल किंवा जाणवेल की, अनेक गोष्टी वा विचार हे न बोलता, टाळण्यासारखे असतात. कदाचित ते काळाच्या ओघात, समोरच्या व्यक्तीला समजतील वा स्वतःला सुद्धा जाणवेल की ते विचार अनावश्यक होते. म्हणजे न बोलून व शांत राहून आपण शहाणपणा केला वा करू शकतो.
हा विचारांचा व चिंतनाचा धागा पकडून, मनाला शांत होण्याच्या वाटेकडे, अश्या व्यक्ती, मनाला नेऊ शकतात. किंबहुना फक्त अग्नीतत्व युक्त व्यक्तीच नाहीत तर, सर्वच प्रकारच्या व्यक्तींना, या सल्ल्यानुसार वागून, आपली व समोरच्या व्यक्तीची मनः शांती राखता येईल.
यावर अजूनही चिंतन आवश्यक।आहे, जे उद्या सुरू ठेवू. तो पर्यंत आपण नामाच्या माध्यमातून, मनाला शांत करण्याचा प्रयत्न करत राहूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०२/०३/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment