भोग आणि ईश्वर ४६७ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
खरंतर हा शक्तीचा आघात वा शक्तिपात ज्याला म्हटलं जातं, तो अनेक मार्गांनी व अनेक प्रकारांनी होतो, किंवा होऊ शकतो, हे मागे आपण जाणलंच. त्याचे मार्ग भिन्न आहेत, पद्धती वेग वेगळ्या आहेत आणि प्रकार अनेक आहेत. तरीही सर्वांचा अंतिम उद्देश आहे, त्या अणूरूप आत्म्याच्या केंद्रकातील गाभा अर्थात केंद्रक भेदून, ते विश्वमय ज्ञान बाहेर काढून, त्यातून आत्मजागृती, आत्म प्रचिती घडवून, त्या देहातील आत्मतत्वाला, त्याच्या हिताच्या अंतिम मार्गावर स्थापित करणं.
पण या सर्वात, कोणत्याही मार्गाने, मुख्य प्रक्रिया ही, मूलाधार चक्रात स्थापित असलेली , कुंडलिनी शक्ती, जागृत करून, तिला हृदयमार्गातून, सहस्त्रार चक्रात नेऊन स्थिर करणं किंवा पोचवणं. यात मुख्य क्रिया आत्मतत्वात अणूरूपात असलेलं ज्ञानकवच भेदून, ते जागृत झालेलं आत्मतत्त्व सहस्त्रार चक्राशी संलग्न करणं. हा अंतिम उद्देश सर्व मार्गांचा आणि प्रकारांचा आहे आणि असतो.
तो साधण्यासाठी, मनाला निवृत्तीप्रत नेऊन, मग त्याला आत आत्मतत्वात वळवणं गरजेचं आहे. मन निर्विकल्प, निराकार व निवृत्त अर्थात वृत्तीरहीत झाल्याशिवाय, संसाराशी किंवा जगता तील मायेशी त्याचा संबंध तुटणार नाही. एकदा मायेच्या पाशातून जीव मुक्त झाला की, मूलाधार चक्रात सर्पाकार वेटोळं करून बसलेली, शक्ती जागृत होते.
मन निवृत्त होऊन शांत झाल्यावरच, त्यातून अपेक्षित शुद्ध सात्विक लहरी निर्माण होणार नाहीत. याच लहरींच्या माध्यमा तून मुलाधारावर आघात होणार नाही. हा आघात झाल्यावरच आतील शक्ती जागृत होते. या आघाताचे प्रकार अनेकानेक आहेत. प्रत्यक्ष कुंडलिनी जागृती हा प्रयत्नपूर्वक, योगाच्या माध्यमातून, जाणीव पूर्वक घडवून आणलेला योग आहे. पण तो जितका सहज वा सोपा वाटतो किंवा दाखवला जातो, तसा सहज घडणारा प्रकार नाही.
या कुंडलिनी जागृतीवर स्वामी विवेकानंद यांनी, त्यांच्या राज योग या पुस्तकामध्ये, विवेचन केलं आहे. यात स्वामींनी, याचं विस्तृत वर्णन, प्रक्रिया, सिद्धता, यातील धोके, चकवे, हे सर्व मांडलं आहे. हा क्लिष्ट, अनेक व्यवधानं पाळावी लागणारा, अनेक चुका संभावणारा आणि अनेक धोक्याची वळणं असलेला राजमार्ग आहे. म्हणूनच स्वामीजींनी त्याला राजयोग म्हटलं आहे, ते त्याला प्राप्त कराव्या लागणाऱ्या, कष्टप्रदतेमुळे. म्हणून हा प्रकार, अगदी अत्युत्तम आणि अत्युच्च पातळीवरील योगगुरू किंवा सद्गुरूआज्ञा झाली तरच, साध्य करण्याचा प्रयत्न करावा.
यावर अजूनही चिंतन अपेक्षित आहे, कारण विषय व त्यातील प्रत्येक मुद्दा महत्वाचा आणि दीर्घ चिंतनाचा असल्यामुळे उद्याच्या भागात पुढे सुरू ठेवूया. तोपर्यंत सर्वसंमत नामजप सुरूच ठेवूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१२/०३/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment