भोग आणि ईश्वर ४६४ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
अनेक विषय कालच्या एका लेखात मांडले होते. त्यातील एकेका मुद्द्यावर विस्तृत विवेचन आपण सुरू करू. वृत्ती व प्रवृत्ती यांतून निवृत्ती व्हावी, असा उल्लेख काल आला होता.ही निवृत्ती विषयातून,वासनेतून,संसारातून,मनातील षड्रिपूंच्या अस्तित्वातून अशी सर्वव्यापक निवृत्ती असावी, असा याचा अर्थ आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे, मन निर्विकार आणि निर्विचारी झाल्यानंतरच ते अंतर्मुख होऊन, आत्मशोधास्तव कार्यरत होतं.
कारण सर्व शास्त्र, पुराणं, वेदादी वाङ्मय संत महंत यांच्या सांगण्याचा मतितार्थ वा गुह्यर्थ एकच आहे की, जे शोधायचं आहे, ज्यासाठी हा परमभाग्याचा मानवी देह मिळाला आहे, तो ईश्वराकडे जाण्याचा मार्ग, हा देहात वसलेल्या चैतन्याच्या गाभ्यातून जातो. किंबहुना तोच मार्ग आहे. म्हणून सर्व योग याग, साधनं मनाला आत घेऊन जाण्यासाठीच निर्माण करण्यात आली आहेत.
यातून विधात्याचा स्पष्ट उद्देश व संकेत आहे की, मला प्राप्त करण्याचं सर्व ज्ञान, विज्ञान, गुह्य मार्ग, सर्व विकल्प मी तुझ्या हृदयातील, माझ्या अंशरूप आत्म्याज्योतीमध्ये अणूरूपात समाविष्ट करून पाठवलं आहे. म्हणजे ती एखादी chip, कुपी वा pen drive समान आहे. ज्याला उघडण्याची किल्ली वा किलक किंवा पिन अथवा पासवर्डसुद्धा मी आतच दडवून ठेवला आहे.
ज्याला तो पासवर्ड माहीत करून, त्या pendrive मध्ये वा कुपीत दडवलेलं ज्ञान प्राप्त करून, तो मार्ग जाणून, मजप्रत यायचं असेल तर, त्याला आधी चित्ताची शुद्धता साधणं जरुरी आहे. चित्तशुद्धीतून, आत्मज्ञान, त्यातून साधन आणि सद्गुरु दर्शनयोग जुळवून, त्या आत्म प्रकाशात,आत्मप्रचितीची अनुभूती घेऊन, त्या प्रशस्त मार्गाने माझ्यापर्यंत पोहोचता येईल. पण त्यासाठीच पहिली उत्तम बैठक म्हणजे, मनाची शुद्धी घडवून आणणं.
म्हणून आता लक्षात येत असेल की मनात कोणतंही तत्व प्रभावी असलं तरी, त्याला neutralise करणं का महत्वाचं आहे. कारण त्यामुळे मनातील अविचारी, वृत्ती वा अपप्रवृत्ती शून्य करणं, हा त्यामागचा उद्देश आहे. एकदा ही शून्यवस्था साधली की, पुढे मनाला जागृती ज्ञान व जाणीवा यांच्या समीप नेण्याचा मार्ग सुलभ होतो. ज्याला आपण रस्ता साफ करून घेणं म्हणतो, ते साधणं.
या चित्तशुद्धीच्या मार्गातील पहिला टप्पा आपण साध्य करू शकतो,या तत्वांच्या प्रभावातून मनाला बाहेर काढून तद्नंतर त्या मनाला शांत करून, त्याला साधनेच्या, योगाच्या,कर्माच्या, ज्ञानाच्या वा शरणागतीच्या मार्गा वरून, पुढे घेऊन जाणं, यासाठीच आपल्याला सद्गुरू कृपेची वा आशीर्वादाची जरुरी असते.
ती प्राप्त होण्या साठी काय आवश्यक आहे किंवा काय करणं जरुरीचं आहे, हे उद्याच्या भागात जाणून घेऊ. कारण साधना, योग, कर्म, ज्ञान वा समर्पण भाव यातील कोणत्याही मार्गाने जायचं असेल तरी, सद्गुरू कृपेशिवाय अन्य पर्याय नाही. म्हणून नामाच्या साधनेत राहून, ती।सद्गुरू कृपा योग साधला जाण्याची प्रतीक्षा करत राहूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०९/०३/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment