भोग आणि ईश्वर ४६२ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
आपल्यातील बलवान व सहाय्यक अर्थात supportive तत्व जाणल्यानंतर, त्यावर नियंत्रण मिळवून,किंवा त्याला योग्य दिशेने वळवून किंवा त्याजागी योग्य त्या तत्वाला प्रोत्साहित करून मनाला शांत करणं, हे प्राथमिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून, विस्तृत व दीर्घ चिंतन आपण, गेल्या काही भागात, करत आहोत. त्यात, स्वतःबद्दल जाणण्या साठी, सर्व तत्वांची माहिती, त्यातील आपल्यावर मुख्यतः व दुय्यमपणे प्रभाव टाकणारी तत्त्वं, याचा आपण परामर्ष घेतला.
त्यानंतर आपण कोणत्या श्रेणीत येतो व त्यानुसार आपण मनःशांतीसाठी काय करायला हवं, हे ठरवू शकतो. पण इथे एक प्रश्न उपस्थित राहू शकतो. तो म्हणजे जरी हे जाणलं तरी प्रत्यक्षात ते साधणं कितपत सोपं वा किती कठीण आहे, हे ईश्वर जाणे. पण इथे एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे.
एखाद्या गोष्टींचं ज्ञान प्राप्त झालं वा जाणीव जागृत झाली की, कोणतीही गोष्ट पन्नास टक्के साध्य व्हायला हरकत नाही. कारण जाणिवेने मनाला अज्ञानातून ज्ञानाकडे नेलं जातं. एकदा ज्ञान प्राप्त झालं की, आपला त्या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो वा बदलून जाऊ शकतो. तो लगेच बदलेल असं म्हणता येणार नाही. पण निदान काय चुकत आहे, याची जाणीव नक्की होईल.
आणि एकदा चूक लक्षात आली की, बरोबर वा योग्य काय, हे जाणवतं किंवा जाणवलं पाहिजे. ज्ञान आणि जाणिवांची जागृती ही यासाठीच ईश्वराने, मानवाला दिलेली अमूल्य देणगी आहे. म्हणजे जिथे जागृती झाली, तिथे अयोग्य मार्गाकडून योग्य मार्गाकडे त्या व्यक्तीने वाटचाल सुरू केली पाहिजे,अशी विधात्याची, हे जाणिवांचं भान देण्यामागे, इच्छा आहे.
जागृती ही नित्य घडत जाणारी प्रक्रिया आहे. ईश्वराची, मानवा वर इतकी असीम कृपा आहे की, एकाच गोष्टीची वा अज्ञानाची जाणीव, ईश्वर अनेकवेळा करवून देतो. आपण याला संकेत असं संबोधू शकतो किंवा संबोधतो. त्यातून ज्ञान देऊन व जाणिवांची जागृत घडवून आणून, ईश्वर, मनातील ज्ञानमय कोषांवर वा केंद्रां वर आघात वा प्रहार घडवून आणतो.
हा एकप्रकारे शक्तीप्रहार किंवा आघात म्हणता येईल. आपण अनुभव घेतला असेल तर, आठवून पहा, एखाद्या गोष्टीची जाणीव झाली किंवा एखादी कल्पना आली की, आपल्याला बरेचदा लक्षात येतं, अरे इतकी सोपी वा योग्य कल्पना किंवा ज्ञान मला, याआधी कसं, सुचलं नाही.
त्यावेळी मनात एकप्रकारे कमी किंवा जास्त प्रमाणात धक्का जाणवतो. हा शक्तीप्रहार झाला. म्हणजे अचानक बाहेरून किंवा आतील ज्ञानजागृतीच्या मांध्यमातून, जाणिवेच्या एखाद्या केंद्राला बसलेला कमी वा अधिक प्रमाणातील किंवा सौम्य मध्यम वा मोठा धक्का. हे असे छोटे वा मोठे धक्के म्हणजे पात अर्थात आघात असतात. यातून त्या त्या जाणिवांची बंद असलेली केंद्रे उघडली जातात.
या नवीन विषयावर सखोल चिंतन उद्याच्या भागात आपण करूया. पण नाममयी राहूनच.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०७/०३/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment