भोग आणि ईश्वर ४८६ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात्।
विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे।।
कर्माचं फलरूप परिवर्तन, आपल्या भोवती घडणाऱ्या घटना, या सर्वातून मनात जागृत होणारा भाव, हा सर्वस्वी व्यक्तीसापेक्ष आहे.प्रत्येकाचं कर्म हे,त्याच्यासोबत असतं. जिथे एकत्र कर्मफल भोगण्याची वेळ येते वा काळ येतो, तिथे त्या त्या व्यक्ती एकत्र येऊन, तितकाच काळ, एकत्र असतात. त्यांचं नातं कोणतंही असो. पण म्हणजे सर्व काही व्यक्तिगत आणि व्यक्ती सापेक्ष आहे, हे नक्कीच. म्हणजे आनंद, दुःख, क्रोध, कारुण्य, मोह, माया, हेसुद्धा व्यक्तिगत आहे किंवा असणार.
याचं एक साधं प्रातिनिधिक उदाहरण घेऊया. एकच प्रसंग अनेक जणांच्या समोर घडतो, एखादा, त्यावेळी, क्रोधीत होतो, एखादा, सामान्य पणे प्रतिक्रिया देतो, एखादा आपला काही संबंध नसल्याने तिथून काहीच प्रतिक्रिया न देता निघून हातो. म्हणजे एकच प्रसंग तिघांच्या मनात वेगवेगळे भाव निर्माण करतो. याचाच अर्थ प्रत्येक क्षणी घडणाऱ्या प्रत्येक घटनेची दखल घेऊन मन भाव निर्माण करतं. पण हा भाव त्या घटनेने निर्माण झाला असता तर,सर्वांची प्रतिक्रिया एकच झाली असती. म्हणजेच तो भाव घटनेतून वा प्रसंगातून निर्माण न होता, मनाच्या स्थितीवर अवलंबून आहे.
पण तसं होत नाही. म्हणजे आपण आपले भाव, त्या त्या प्रसंगावर आधारित, निर्माण वा व्यक्त करतो, हे नक्कीच. याचाच पुढचा भाग म्हणजे तो भाव निर्माण होणं आणि त्याची प्रतिक्रिया देणं, हेदेखील व्यक्तीसापेक्ष आहे आणि नियंत्रित करता येणं वा येऊ शकणं, हेदेखील. मग आपण ते का करत नाही, याचं कारण आपण जाणत नाही, की हे करता येतं. म्हणजे जाणिवेचा अभाव, हे कारण व्यक्त वा अव्यक्त होण्यामागे आहे किंवा असणार.
त्यामुळे जाणीवा प्रगल्भ करून, मनाला अंतर्मुख करून, प्रत्येक क्षणी हा विचार मनात चिंतला की, मी मुळात प्रतिक्रिया देणं कितपत आवश्यक आहे. असेल तर नकारात्मक का द्यायची, सकारात्मक का नाही देता येणार. या प्रकारच्या चिंतनातून, मनाला त्या त्या प्रसंगात विचार करायची सवय लावून घेता येईल. त्यानंतर ही सवय मनातून आत झिरपत सुप्तमनात गेल्यास, तो विवेकाचा आणि व्यक्तित्वाचा भाग होऊ शकेल. त्यातून अकारण व्यक्तता व आवश्यक असताना अव्यक्तता हे दोन्ही, योग्य पद्धतीने हाताळता येईल.
आता या सर्वाचा मुख्य फायदा म्हणजे चुकीच्या प्रतिक्रिये नंतर, मनात अकारण होणारी न्यूनगंडाची भावना राहणार नाही. चुकीचं बोललं जाणार नाही आणि बोलायचं राहून जाणार नाही.आता हाच विषय पुढे नेऊ.म्हणजे मनातील हे भावविश्व बऱ्याच प्रमाणात नियंत्रित करता येऊ शकतं, असा योग्य निष्कर्ष यातून निघू शकतो.पण असं नियंत्रित राहणं, सर्ववेळ व सर्वकाळ जमू शकतं का.
तर याचं उत्तर नक्कीच हो असं देता येईल. यासाठी मनाला एखादा छंद, नाद वा नियम घालून देणं गरजेचं आहे. यावर, उद्याच्या भागात विस्ताराने चर्चा करूया. पण आपला नित्य नामाचा छंद सुरू ठेवूनच.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
३१/०३/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment