भोग आणि ईश्वर ४६३ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
जाणीवा व त्यांची जागृती यासाठी एखादा सौम्य किंवा मोठा धक्का जरुरी असतो. याचं कारण म्हणजे मुळात ज्ञान आतच साठवलेलं आहे. ते अनेक जन्म व अनेक शतकं, आत्म्याच्या कोषात बद्ध आहे.आपण हे जाणतोच की,एखादा डब्बा अनेक वर्षे किंवा बराच काळ बंद असेल आणि तो उघडायचा असेल तर त्याला विशिष्ट कोनातून, विशिष्ट शक्ती लावून, त्या झाकणा वर प्रहार करणं जरुरी असतं. त्यानंतरच त्या डब्ब्याचं झाकण उघडू शकतं.
अगदी हीच प्रक्रिया, अनेकदा सहजपणे किंवा ज्ञान जागृतीच्या काळात, विशेषतः घडवून आणली जाते वा घडते. ही प्रक्रिया, आतून ज्ञानजागृतीच्या माध्यमातून घडते किंवा बाहेरून सद्गुरू कृपेच्या, साधनेच्या द्वारे घडवून आणली जाते. म्हणजे यामध्ये मुळात बाहेरून काही ज्ञान घातलं जातं आणि मग ते जाणिवांना समजतं, अशातला भाग नाही. ते आतच बद्ध असतं. फक्त ते बंद असल्यामुळे विशिष्ट प्रकारे आघात करून, त्या ज्ञानकेंद्राचं अग्र भेदून वा छेदून उघडलं जातं.
यामध्ये साधनेची व सद्गुरुकृपेची अमूल्य मदत होते. किंबहुना त्याच माध्यमातून हा पात वा आघात वा प्रहार घडवून आणला जातो. म्हणजे मुळात आतच बंद असलेल्या ज्ञानरुप जाणिवांची केंद्रे,उघडली जाऊन, अज्ञानाचा पडदा उघडला जाऊन सात्विक जाणिवांचा स्वच्छ प्रकाश, ज्याला आत्मप्रकाश किंवा आत्म प्रचिती अथवा आत्मज्ञान म्हणता येईल, ते लख्ख प्रकाशमय रुपात, मनःचक्षूंसमोर दिसायला लागतं.
अश्या आत्मज्ञानाला उद्देशुनच माऊली अरे अरे ज्ञाना झालासी पावन,तुझे तुज ज्ञान कळों आले, असं म्हणतात. हा आघात व्यक्तीच्या साधनेच्या काळात, योग्यवेळी होतो. या आघाताचे वा पाताचे अनेक प्रकार आहेत. अष्टांग योगाच्या यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी या आठही माध्यमातून हा ज्ञानरुप प्रकाश बाहेर येतो. कुंडलिनी जागृतीच्या माध्यमातून एखाद्या अणुस्फोटासम हे विश्वरूप चैतन्यमय ज्ञान प्राप्त होते(यावर पुढे विस्तृत चर्चा येईलच).
मानवाला ईश्वरासमीप नेताना, प्रारब्धातील योग आणि साधनेतील आत्मप्रगती, यातून, हे योग घडून येतात. यामध्ये स्थळकाळ, वय लिंगभेद, जातपात, धर्मभेद यापैकी कशाचाही अडसर होत नाही वा संबंध आड येत नाही.अष्टांग योगा व्यतिरिक्त ईश्वरीय साधनेच्या कोणत्याही मार्गाने किंवा कर्म वा ज्ञान यापैकी अन्य कोणत्याही मार्गाने अथवा भगवंतांनी श्रीमद्भगवद्गीतेत म्हटलं आहे त्याप्रमाणे, फक्त सर्व भाव अर्पण करून, शरणागत होऊन सुद्धा हा योग साधू शकतो.
याला बंधन कसलंही नाही. मात्र मनाची, वृत्ती व प्रवृत्ती यातून, निवृत्ती होणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण हा आघात वा प्रहार किंवा पात प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कोणत्याजन्मी, कधी व कसा होईल, हा एक अद्भुत आणि विलक्षण योग ईश्वर व सद्गुरुच जाणू शकतात. पण यामध्ये सर्वात उत्तम आणि अत्युच्च योग म्हणजे सद्गुरुकृपेने, घडून येणारी ज्ञानप्राप्ती वा आत्मप्रचिती.
याच विषयावर आणि या ज्ञानप्राप्ती व प्रचिती योगावर उद्या चर्चा पुढे सुरू ठेवू, पण तोपर्यंत नामाच्या माध्यमा तून सद्गुरु कृपेप्रत जाण्यास आपण सिद्ध होण्याचा प्रयत्न करतच राहूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०८/०३/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment