Skip to main content

भोग आणि ईश्वर ४६३

भोग आणि ईश्वर  ४६३  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

जाणीवा व त्यांची जागृती यासाठी एखादा सौम्य किंवा मोठा धक्का जरुरी असतो. याचं कारण म्हणजे मुळात ज्ञान आतच साठवलेलं आहे. ते अनेक जन्म व अनेक शतकं, आत्म्याच्या कोषात बद्ध आहे.आपण हे जाणतोच की,एखादा डब्बा अनेक वर्षे किंवा बराच काळ बंद असेल आणि तो उघडायचा असेल तर त्याला विशिष्ट कोनातून, विशिष्ट शक्ती लावून, त्या झाकणा वर प्रहार करणं जरुरी असतं. त्यानंतरच त्या डब्ब्याचं झाकण उघडू शकतं. 

अगदी हीच प्रक्रिया, अनेकदा सहजपणे किंवा ज्ञान जागृतीच्या काळात, विशेषतः घडवून आणली जाते वा घडते. ही प्रक्रिया, आतून ज्ञानजागृतीच्या माध्यमातून घडते किंवा बाहेरून सद्गुरू कृपेच्या, साधनेच्या द्वारे घडवून आणली जाते. म्हणजे यामध्ये मुळात बाहेरून काही ज्ञान घातलं जातं आणि मग ते जाणिवांना समजतं, अशातला भाग नाही. ते आतच बद्ध असतं. फक्त ते बंद असल्यामुळे विशिष्ट प्रकारे आघात करून, त्या ज्ञानकेंद्राचं अग्र भेदून वा छेदून  उघडलं जातं. 

यामध्ये साधनेची व सद्गुरुकृपेची अमूल्य मदत होते. किंबहुना त्याच माध्यमातून हा पात वा आघात वा प्रहार घडवून आणला जातो. म्हणजे मुळात आतच बंद असलेल्या ज्ञानरुप जाणिवांची केंद्रे,उघडली जाऊन, अज्ञानाचा पडदा उघडला जाऊन सात्विक जाणिवांचा स्वच्छ प्रकाश, ज्याला आत्मप्रकाश किंवा आत्म प्रचिती अथवा आत्मज्ञान म्हणता येईल, ते लख्ख प्रकाशमय रुपात, मनःचक्षूंसमोर दिसायला लागतं. 

अश्या आत्मज्ञानाला उद्देशुनच माऊली अरे अरे ज्ञाना झालासी पावन,तुझे तुज ज्ञान कळों आले, असं म्हणतात. हा आघात व्यक्तीच्या साधनेच्या काळात, योग्यवेळी होतो. या आघाताचे वा पाताचे अनेक प्रकार आहेत. अष्टांग योगाच्या यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी या आठही माध्यमातून हा ज्ञानरुप प्रकाश बाहेर येतो. कुंडलिनी जागृतीच्या माध्यमातून एखाद्या अणुस्फोटासम हे विश्वरूप चैतन्यमय ज्ञान प्राप्त होते(यावर पुढे विस्तृत चर्चा येईलच). 

मानवाला ईश्वरासमीप नेताना, प्रारब्धातील योग आणि साधनेतील आत्मप्रगती, यातून, हे योग घडून येतात.  यामध्ये स्थळकाळ, वय लिंगभेद, जातपात, धर्मभेद यापैकी कशाचाही अडसर होत नाही वा संबंध आड येत नाही.अष्टांग योगा व्यतिरिक्त ईश्वरीय साधनेच्या कोणत्याही मार्गाने किंवा कर्म वा ज्ञान यापैकी अन्य कोणत्याही मार्गाने अथवा भगवंतांनी श्रीमद्भगवद्गीतेत म्हटलं आहे त्याप्रमाणे, फक्त सर्व भाव अर्पण करून, शरणागत होऊन सुद्धा हा योग साधू शकतो. 

याला बंधन कसलंही नाही. मात्र मनाची, वृत्ती व प्रवृत्ती यातून, निवृत्ती होणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण हा आघात वा प्रहार किंवा पात प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कोणत्याजन्मी, कधी व कसा होईल, हा एक अद्भुत आणि विलक्षण योग ईश्वर व सद्गुरुच जाणू शकतात. पण यामध्ये सर्वात उत्तम आणि अत्युच्च योग म्हणजे सद्गुरुकृपेने, घडून येणारी ज्ञानप्राप्ती वा आत्मप्रचिती. 

याच विषयावर आणि या ज्ञानप्राप्ती व प्रचिती योगावर उद्या चर्चा पुढे सुरू ठेवू, पण तोपर्यंत नामाच्या माध्यमा तून सद्गुरु कृपेप्रत जाण्यास आपण सिद्ध होण्याचा प्रयत्न करतच राहूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०८/०३/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...