भोग आणि ईश्वर ४७२ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
काल आपण पाहिलं की, प्रत्येक क्षण हा, मनाच्या ऊर्जा आणि शक्ती त्याचप्रमाणे विचार व विवेक यासाठी किती महत्वाचा आहे. आता हे साधणं हे लिहिण्याइतकं सोप्पं नाही,हे नक्की.पण त्यासाठी सुद्धा,आपल्या धर्म शास्त्राने आणि पूर्वजांनी, अनेक मंत्र, तंत्र इत्यादी लिहून वा आचरणात आणून,त्याचे दाखले देऊन ठेवलेत.
प्रत्येक क्षण हा वेगळा अर्थात भिन्न असतो. म्हणजे वास्तविक एका क्षणाचा दुसऱ्या क्षणाशी काही संबंध नसतो. पण हे सर्व सलग, येत असल्यामुळे आणि त्याच क्षणांप्रमाणे आपले श्वासांच्या देखील मालिका होत असल्यामुळे आपल्याला हे सर्व काळाचं गणित एकसंध वाटतं. पण प्रत्यक्षात ते क्षण व श्वास जोडलेली मालिका आहे.
म्हणजेच प्रत्येक क्षणी आपण वेगळे असतो आणि प्रत्येक क्षणी आपल्याला, मनासाठी आनंद ऊर्जा व शक्ती मिळवत राहणं गरजेचं आहे. म्हणूनच प्रत्येक क्षणी सकारात्मकता टिकवण्या साठी प्रयत्नांची मालिका तयार करणं आवश्यक आहे. त्यासाठी एकतर प्रत्येक क्षणी, एखादी वेगळी गोष्ट वा कर्म, या आनंदा साठी, उर्जेसाठी करायला हवी. पण असं एकच कर्म सलगपणे आणि नित्य करत राहणं कितपत शक्य आहे.
त्याचप्रमाणे असं कोणतं कर्म आहे जे प्रत्येक क्षणाला जोडत जाईल आणि नित्य कर्माची एक मालिका तयार होईल आणि त्याची अखंडता राहील. माझ्यामते असं एकच कर्म आहे जे नित्य करत राहता येईल, प्रत्येक क्षणाला जोडेल, प्रत्येक क्षणाचं वेगळेपण टिकवून ठेवेल, तरीही अखंडता वा सलगता राहील.हातात असलेला प्रत्येक क्षण आणि येणारा प्रत्येक क्षण यामध्ये गुंफला जाईल.
कारण काळ, जात असलेला प्रत्येक क्षण, हा विश्व नियंत्याच्या चरणी अर्पण करतो. स्वतःपाशी काही ठेवत नाही. हे त्या विधाता नामक व्यवस्थेच्या कर्महीन राहण्याच्या गरजेचा एक भाग आहे. कारण त्या विधात्यालासुद्धा कोणत्याही क्षणात गुंतून चालत नाही. गीतेत सांगितलेलं कर्महीन किंवा अकर्मी राहण्या साठीची ती एक आवश्यकता आहे. म्हणून जो क्षण गेला तो ईश्वरचरणी अर्पून, पुढील क्षणात तो काळ आणि विधाता व्यस्त होत जातो आणि अखंडता व प्रत्येक क्षणाची अलगता राहते.
यालाच आधार मानून आणि आलेला प्रत्येक क्षण ईश्वराला अर्पण करून, त्याच ईश्वराला प्रत्येक क्षणी स्मरत आपणही ही अखंडता आणि वेगळेपण एकाचवेळी साधू शकतो. यामध्ये एक महत्वाचं सूत्र म्हणजे गेलेला प्रत्येक क्षण प्रामाणिकपणे ईश्वर स्मरण करत, त्याच्या चरणी अर्पून, पुढील क्षणाकडे आपण जायला मोकळे राहू.
यावर चिंतन करा. उद्या हाच विषय पुढे नेऊ. पण ईश्वर स्मरण करत रहा.,
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१७/०३/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment