Skip to main content

भोग आणि ईश्वर ४७९

भोग आणि ईश्वर  ४७९   (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

काल सांगितल्याप्रमाणे आपण त्या गोष्टीवर विचार करूया, जो सर्वसामान्य जनांसाठी भगवंतांनी माय माऊली म्हणून तो उपाय सांगितला आहे, ज्यायोगे कोणत्याही प्रेरणेने कर्मरत असलेल्या जनांना आपल्या अध्यात्मिक, आत्मिक उन्नती व वृद्धीसाठी कार्यरत राहता येईल. किंबहुना त्यांना आपलं कोणतंही कर्म आणि कर्मफल न टाकतासुद्धा ईश्वरभक्तीचा हक्काचा मार्ग चोखळता येईल. 

हे श्रीमदभगवद्गीतेत विस्ताराने,  ज्ञानी आणि जिज्ञासू असलेल्या अर्जुनाला उद्देशून सांगण्याचं प्रयोजनच हे आहे की, सर्वसामान्य जन जे जन्मानुजन्मे कर्मफल आणि जन्ममृत्युच्या साखळीत अडकून, अज्ञानवश त्यातून बाहेर येऊ शकत नाहीत. करुणा सागर ईश्वराला हे नक्कीच त्रासदायक होत असेल की, चुकीच्या कर्मात रत राहून, वासनेच्या मायेच्या अंधःकारात अडकून, दीन पतित आणि अज्ञानी राहून, मनुष्यदेहात प्राण्यांचेच भोग भोगून पुन्हा पुन्हा त्याच वाटेवर, हे जीव फिरत राहतात. 

म्हणून स्वमुखे भगवंतांनी वेद शास्त्र पुराणं यांचं सार, या भूमीवर उतरून, मानवी देह धारण करून, सांगितलं. जेणेकरून मोक्ष मुक्ती आणि आत्मोन्नती हा कुणा ज्ञानी कर्मी आणि मोजक्याच लोकांचा अधिकार राहणार नाही. या ज्ञानालासुद्धा भाषेच्या मर्यादेची शृंखला आड आल्या नंतर, स्वतः पुन्हा ज्ञानेश्वर माऊली रुपात जन्म घेऊन, संस्कृतातील, गीतारुप उच्च ज्ञान, प्राकृतात आणून पुन्हा सर्वसामान्य जीवांची मोक्षाची शतकानुशतके झालेली वंचना नष्ट करण्याचा प्रयत्न केला. 

त्या वरही, या दोन सहजसाध्य व सोप्प्या मार्गाने जाणाऱ्या व जाऊ इच्छिणाऱ्या जनांना, स्वतः भगवंत वचन देतात की, या मार्गाने जाणाऱ्यांना भगवंत स्वतः साहाय्य करतीलच. त्यातील एक उपाय म्हणजे नित्य कर्म करत असताना, अगदी कर्मात चुका करत असताना देखील जो सर्वात सहजसाध्य असं भगवंत नामाचं नित्य स्मरण करतो आणि त्या स्मरणात आपली नित्य कर्म करतो, त्याला त्या कर्मातील दोष बाध्य न होता, त्याच्या कर्माचे चांगले वा वाईट परिणाम भगवंत पाहून घेतात. 

याचसाठी भगवंत सांगतात की, कर्म करताना नित्य माझं स्मरण करणाऱ्या जीवांच्या हिताची, क्षेमाची चिंता मी स्वये वाहतो. त्यासाठी जीवाला मात्र कर्म करताना, त्यात आपले सर्व भाव,त्या कर्मात अर्पित करत करत भगवंताचं नाम घेत  किंवा भगवंताच स्मरण करत, आपल्या देहाने संचितात प्राप्त भोग भोगत आणि उपभोग घेत मार्ग क्रमण करायचं आहे. यामध्ये देहाचं मुख्य कर्म व कर्तव्य जे असेल ते करून, मनाने ईश्वराला स्मरत राहणं हा , ईश्वराला अपेक्षित असलेला मुख्य उद्देश आहे. 

या सहजसोप्या आणि भगवंत कथित मार्गाचा अवलंब करून अनेक जीव आपल्या उन्नतीचा मार्ग सुलभ करत जावेत अश्या उद्देशाने ईश्वराने कथन केलेला हा मार्ग, इतका सहज असूनही जीव का त्या मार्गाचा अवलंब करत नाही, याचा विचार उद्याच्या भागात करून, आपण दुसरा उपाय उद्या पाहूया. तरीही नामाचा आपला मार्ग चालतच राहूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२४/०३/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...