Skip to main content

भोग आणि ईश्वर ४७१

भोग आणि ईश्वर  ४७१  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

आता या आत्मपरीक्षेत, व्यावहारिक परिक्षेप्रमाणे, काही तयारी,अभ्यास,मार्गदर्शन इत्यादी असतं का. तर नक्कीच असतं. मुख्य तयारी ही मनाची असते किंवा असावी लागते. कारण सर्व कर्माचं प्राक्तन, प्रारब्ध वा संचित जमा होताना, त्याचे भोग किंवा उपभोग, जरी देह भोगतो तरीही, मन हेच मुख्य लक्ष्य किंवा सह भागी साथीदार असतं. यातना किंवा सुख दोन्हीही, देहाप्रमाणे मनाला सुद्धा भोगाव्या लागतात किंवा उपभोगता येतात. 

किंबहुना देहाचे घाव, यातना, जखमा किंवा झीज आणि सुखोप भोग हे देहावर, कालांतराने का होईना, दिसून येतात. पण मनाच्या जखमा, मनातील यातना, दुःख हे दिसतही नाही आणि कालांतराने भरूनही येत नाही. ते विसरण्याचा प्रयत्न करणं, ही एकच गोष्ट माणसाच्या हातात आहे. बर यामध्ये दुःख किंवा दुःखाच्या यातना, सुखाचे दिवस, काही प्रमाणात विसरायला लावतात. पण सुखानंतर दुःखाचे दिवस आले तर, त्या मानसिक यातना किंवा भावना, जास्त तापदायक असतात. 

म्हणजेच सर्वांच्या केंद्रस्थानी, मन हे मुख्य इंद्रिय आहे. त्याचं अजून एक कारण आहे.ते म्हणजे,मृत्यूनंतर आत्म्या सह जो कोष पुढील प्रवासाला निघतो, तो म्हणजे मनो मय कोष. याचं कारण म्हणजे, आत्मा स्वतः, निर्गुण व निराकार आहे आणि स्वतःपाशी कोणत्याही स्मृती वा बंध अथवा त्यांचा माग वा मागोवा ठेवत नाही. कारण मूळ आत्मा हा शुद्ध व तेजोमय आहे आणि राहतो. पण मना तील भाव, त्या आत्म्याला अशुद्धतेने निस्तेज करतं. म्हणूनच आत्म्यासह, त्यासोबत असलेला मनोमय कोष हे सर्व संदर्भ, व्याप, धागे इत्यादी सोबत घेऊन हिंडतो. 

याचं महत्वाचं कारण म्हणजे, कर्माचे बांध वा बॉंडिंग म्हणूया ते मनासोबत पुढे जातात आणि त्याच संबंधावर कर्मफल व्यवस्था कार्य करते.एकप्रकारे ज्याला सॅटेलाईट कनेक्शन  म्हणूया, ते कर्माच्या लहरींचं, मनाच्या माध्यमाशी असतं. म्हणून आत्मा ते आपल्यासह पुढे नेतो. म्हणजेच सर्वकाही शेवटी, मनापाशी येतं. याच कारणास्तव वेगवेगळ्या जन्मात, देह बदलले असले तरीही, विचारप्रवृत्ती, विवेक, वृत्ती, हे त्याचप्रकारे प्रत्येक जन्मात पुढे पुढे जातं, ज्याप्रकारे ते आधीच्या जन्मात मृत्यूसमयाला आहे. याला संदर्भ एका शास्त्रवचनाचा आहे,  अंते मती सा गती 

म्हणूनच मनाची स्थिती, भाव, विवेक, विचार हे सर्व सकारात्मक पद्धतीने नेहमी पुढे पुढे गेले पाहिजेत. त्या मनाला कोणत्याही परिस्थितीत नकारात्मकता ग्रासता कामा नये. विचार उन्नत, उच्च आणि सद्विवेकपूर्णच असावेत. जसजसं वय वाढेल आणि जसजसे आपण मृत्यूकडे जाऊ तसतसे मनातील नकारात्मक, अहंगंडतेचे, द्वेषाचे, मत्सराचे, क्षीणतेचे, मनाच्या कमकुवत पणाचे भाव, विचार सोडून देऊन पुढे जाता आले पाहिजे. 

खरंतर मृत्यू हा कोणत्याही क्षणी येऊन ग्रासू शकतो, ते कोणीही जाणत नाही. म्हणूनच आलेला प्रत्येक क्षणच आपला आहे,ज्यामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक भावात मनाचा खेळ, देह, व बुद्धी  यांना व देह बुद्धी यांचा खेळ मनाला संमोहित करतो. त्यायोगे त्याची झळाळी वा काजळी आत्म्यावर चढून आत्मा  सतेज वा निस्तेज होत असतो. 

जे कदाचित कठीण वाटेल किंवा कठीण असेलच. पण जन्मोजन्मीच्या कर्मफलांच्या भोगण्याचा आणि सुखाच्या उपभोगांच्या काळात मनाचं संतुलन राखण्यासाठीची ऊर्जा व शक्ती वाढवत पुढे गेलं पाहिजे.कारण सरतेशेवटी मृत्यूसमयी जे विचार जसा विवेक वा अविवेक त्यानुसार पुढील जन्मातील मानसिकता हे पक्कं लक्षात ठेवावं. 

या सर्व विचारातून, चिंतनातून लक्षात येईल की, क्षणो क्षणी प्रभू घेत असलेल्या परीक्षेत, क्षणोक्षणी अभ्यास आणि क्षणोक्षणी परीक्षा असा दुहेरी मामला आहे. म्हणजे मनातील अनेक भाव हे निरर्थक आहेत आणि त्यांच्या शिवायही देह व आत्मा राहू शकतात, हे लक्षात येईल. 

विषयाची व्याप्ती मोठी असल्यामुळे आपण हे चिंतन उद्या पुढे सुरू ठेवूया. पण नामाच्या माध्यमातून शुद्ध विचार व विवेक मिळवण्याचा आपला प्रयत्न सुरूच ठेवूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१६/०३/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...