भोग आणि ईश्वर ४८३ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात्।
विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे।।
कालचाच विषय पुढे नेऊया. त्याच्या फक्त स्मरणाने, जन्म आणि संसारातील सर्व बंधनं यांपासून तो विमोचित करतो अर्थात सोडवणूक करतो किंवा मुक्तता करतो. परंतु फक्त स्मरणाने इतक्या गोष्टी कश्या शक्य आहेत, असा एक सर्वसामान्य प्रश्न नक्कीच पडू शकतो. अशी शंका येण्याचं कारण म्हणजे, आपण मर्त्य जगात राहात असल्यामुळे, आपण प्रचितीवर जास्त विसंबून असतो किंवा विश्वास ठेवतो. मर्त्य जगतातील गोष्टींसाठी हे योग्यच आहे. न्यायव्यवस्थासुद्धा पुरावा अर्थात substantiation वर अवलंबून असते, जे योग्य आहे.
आपण एक उदाहरण घेऊया. आपण एखाद्या चांगल्या, सुवासिक फुलाचं वा धुपाचं किंवा अत्तर इत्यादींचं स्मरण केल्यास, आपल्याला, त्या सुगंधाची आठवण येऊन, मनात आपण त्या सुगंधाचा प्रत्यय घेऊ शकतो आणि त्याने मन प्रसन्न होऊन, शुद्ध होतं. म्हणजे हे फक्त स्मरणाने साधलेलं कार्य आहे. किंवा एखाद्या व्यक्तीच्या स्मरणाने, ती व्यक्ती आपल्या मन पटलावर उभी राहते आणि कल्पनेत आपण एखाद्या व्यक्तीला पाहू शकतो व संवाद साधू शकतो. हा स्मरण आणि कल्पना शक्ती यांचा अद्भुत संगम आहे.
ही शक्ती देवाने फक्त मानवाला प्रदान केली आहे. ज्यायोगे मनुष्य या विश्वातील वा विश्वाबाहेरील कोणत्याही गोष्टींचं स्मरण करून वा त्या व्यक्ती, वस्तू इत्यादींना आठवून, कल्पनेत, त्या वस्तूच्या समीप असल्याचा आनंद घेऊ शकतो. म्हणजेच ईश्वराने ही शक्ती मानवाला प्रदान करून, एकप्रकारे मानवाला उपकृत केलं आहे. अर्थात मानव या स्मरण आणि कल्पनाशक्तीचा उपयोग स्वप्नरंजन आणि इतर अनेक अप्रस्तुत आणि अशाश्वत गोष्टी, करण्यासाठी करतो.
म्हणून अनेक अनिष्ट गोष्टीत आणि नकारात्मक व अपवित्र जगात, माणूस नेहमी अडकून, या भूतलावर जन्ममृत्यूसाठी चकरा मारत असतो. पण याच शक्तीचा वापर ईश्वरस्मरण आणि चिंतन यासाठी केल्यास, त्या अद्भुत अगम्य शक्तीचा प्रत्यय स्मरण आणि कल्पना या दोन शक्तींचा उपयोग करून , घेऊ शकतो.
कारण ईश्वर हा इतका परम पवित्र आहे की, नुसत्या स्मरणाने, त्या परमपावन नामाने येणारा अद्भुत परिमळ आणि त्या लहरींचा प्रत्यय व प्रचिती मानव घेऊ शकतो. स्मरण आणि कल्पना या शक्तींची प्रचिती आपण या जगतात अनुभवलेल्या गोष्टींचा पुनःप्रत्यय घेण्यासाठी नक्कीच करून घेतो, घेऊ शकतो.
पण, इथे प्रश्न असा निर्माण होतो की, ज्या शक्तीला आपण कधी पाहिलं नाही, त्या शक्तीला स्मरण आणि कल्पना यांच्या सहाय्याने कसेकाय अनुभवू शकतो. याचं चिंतन, उद्याच्या भागात घेऊ. तोपर्यंत आपण त्या नामाच्या नादाचा आनंद घेऊ, जे त्या शक्तीइतकच शुद्ध आणि पावन आहे.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२८/०३/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment