भोग आणि ईश्वर ४७८ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
Stimulation techniques मध्ये अर्थात मनाला कार्य प्रवृत्त करण्याच्या यादीत अनेक गोष्टी येतात. म्हणजे माणसाला कर्म करायला प्रवृत्त करणाऱ्या, अर्थात प्रेरणा देणाऱ्या, अनेक गोष्टी आहेत. जसं आशा, इच्छा आकांक्षा, अपेक्षा, लालसा, कामना, वासना इत्यादी अनेक प्रेरणा माणसाला कर्म, हित आणि अहित दोन्ही करायला भाग पाडतात. मानवी मानसशास्त्रात अशी तंत्र मुद्दामहून तयार करवून, माणसाला अधिकाधिक कार्यक्षम करण्यासाठी, वापरली जातात, विशेषतः उत्पादन स्रोत म्हणून.
अश्या प्रकारची तंत्र काही प्रमाणात उपायकारक असतात आणि कमी अधिक प्रमाणात चांगला परिणाम सुद्धा घडवतात. पण प्रत्येकवेळी ते सारखाच परिणाम करतील याची शक्यता जवळजवळ शून्य आहे. कारण मानवी मन, देह व बुद्धी यांना, एखाद्या गोष्टीची सवय झाली की, त्याचा परिणाम प्रत्येकवेळी घटत जातो, diminishing value प्रमाणे.
म्हणजे अशी तंत्र किंवा techniques पूर्णतः निर्दोष असू शकत नाहीत. अर्थात त्या बाबतीत म्हणायचं झालंच तर, या ब्रह्मांडा तील, मानव निर्मित, कोणतंही तंत्र पूर्ण निर्दोष असू शकत नाही. याचं कारण, प्रत्येक तंत्राच्या मागे मानवी बुद्धी चातुर्य व कौशल्य आहे, जे व्यक्ति सापेक्ष आहे. पण असं कोणतंही तंत्र वा प्रेरणा जे नैसर्गिक आहे आणि निर्दोष असेल असं म्हणणं धाडसाचं नाही पण अनुभवरहित असेल.
कारण नैसर्गिक प्रेरणा तंत्र, ज्यामध्ये षड्रिपुसुद्धा आले, यात माणूस एकदा गुंतला की, सहसा बाहेर येणं मुश्किल आहे. मग यावर काही विचारच करायची गरज नाही का किंवा यावर काही वेगळं तंत्र वा प्रेरणास्रोत नाही का, जे निर्दोष आणि तरीही उच्च प्रतीची प्रेरणा देऊन, देह बुद्धी मन आणि अंततः आत्मा यांना अत्युत्तम प्रेरणा देऊन कार्यरत ठेवेल. खरंतर याच गोष्टीचा वा मानसिकतेचा विचार करून, प्रभूंनी गीतेत, दोन उत्तम पर्याय दिले आहेत.
पण त्याचा विचार करण्याआधी त्यासाठी लागणारी मानसिकता नक्कीच तयार करावी लागेल. हाच विचार करून प्रभूंनी आधी अर्जुनाला कर्माचं महत्व विषद केलं. कर्म का व किती श्रेष्ठ आहे, हे सांगितल्यावर ते ज्ञान दिलं, ज्यायोगे कर्माचा संबंध किती आणि कसा फक्त देहापुरता आहे, ते समजावलं. कर्म ज्ञान झाल्यावर त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिला, ज्यायोगे त्यांच्या पर्यंत पोचण्याचे अनेक उपाय जसं अष्टांग योग, कुंडलिनी जागृती, शक्तिपात आणि इतर साधनेचे मार्ग व त्याच्या खाचा खोचा सांगितल्या.
हे सर्व झालं, ज्याला त्यासाठी लागणारी उच्च बुद्धिमत्ता आणि ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता आहे,त्यांच्यासाठी. पण या जगात असे अनेक जीव आहेत, जे जन्मजन्मां तरीच्या कर्मफलात गुंतलेले आहेत आणि ज्यांना याबाबत विचार करण्याची पात्रता देहाने व संचिताने प्राप्त झाली नाही. प्राप्त झाली नाही म्हणण्याचं कारण म्हणजे मानव प्रत्येक जन्मात एकेक पायरी पुढे जाईलच असं नाही. काहीजण कदाचित गती व अधोगती या चक्रात राहून, जन्मोजन्मी त्याच पायरीवर असू शकतात.
म्हणून अश्यांसाठी काही विचार वा उपाय नाहीच का. तर अश्यांसाठीच ते दोन उपाय आहेत, ज्यामुळे त्यांना सत्पात्री तर होता येईलच, पण चुकीच्या प्रेरणेने वा stimulation मुळे होणारा आत्मघात नक्कीच टळेल. त्या दोन उपायांबद्दल आपण उद्याच्या भागात विचार करूया. पण नामामार्गी राहून हित साधण्याचा प्रयत्न सुरू ठेवूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२३/०३/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment