भोग आणि ईश्वर ३९५
सत्ययुगातील परिस्थितीबाबत आपण लेख क्र ३९३ मध्ये बोललो,त्या लेखाचा पुढील भाग आज पाहूया. सत्ययुगा तील परिस्थिती, नंतरच्या प्रत्येक युगात हळूहळू बदलत गेली. मानवी मनाचा विचार करता,साधनेची आवश्यकता आणि आजूबाजूची परिस्थिती यांचं प्रमाण हे मनाबाबत व्यस्त आहे. सत्ययुगात माणसं ही बहुतांशी पापभिरू, दैववादी,साधी व सरळ असल्या मुळे आणि राज्यव्यवस्था उत्तम असल्यामुळे आणीबाणीचे किंवा युद्धाचे प्रसंग हे सर्वसामान्य जीवांपर्यंत फारसे जाऊ दिले जात नसत.
परकीय संकटं झेलायला व शत्रूशी समरात दोन हात करायला राजा आणि सैन्य हे सक्षम होते आणि त्यांच्या कर्तृत्वावर जन सामान्यांचा असलेला विश्वास सार्थ होता. सूर असुर आणि मानव यांचं, निश्चित ओळखता येणारं वेगळं अस्तित्व होतं. त्यामुळे आपला हितकारक कोण व हितशत्रू कोण हे जनांना ज्ञात होतं. या सर्व गोष्टींमुळे रोजच्या जीवनात , देवांच्या किंवा राजाच्या सहाय्यची आवश्यकता कमी जरूरीची वाटे.
याच व्यवस्थेत, प्रत्येक युगात, प्रत्येक टप्प्यात होत गेलेल्या स्थित्यंतरातून, सामान्यांच्या जीवनाची वाटचाल अभय स्थितीकडून भयग्रस्ततेकडे होत गेली. हा बदल, त्या त्या काळाच्या मोजमापावर बघितला तर सूक्ष्म होता.पण आज पाहिलं तर प्रत्येक युगाच्या शेवटी, व्यवस्था अजूनच बिकट होत गेलेली जाणवेल. जीवन शाश्वततेकडून अशाश्वततेकडे कसं सरकत गेलं, हे काळाच्या व्यासावर पडताळून पाहिलं तर व्यापक नजरेतून समजू शकेल.
याच परिस्थितीतील बदलातून हळूहळू प्रार्थना, अर्चना, याचना या भक्तिमार्गाशी जोडल्या गेल्या. संकटांची गती व आवृत्ती वाढत गेली, त्याच प्रमाणात, अशक्य व दुष्कर गोष्टींबाबत, आपल्या आयुष्यात, विश्व चालकाच्या सोबत असण्याची गरज, वृद्धिंगत होत गेली. कदाचित काळाचा हा आलेख, विधात्याच्या आखणीनुसारच असल्यामुळे, भक्तिमार्ग, ईश्वराचं आपल्या सोबत अस्तित्व असावं याची गरज भासू लागली. याच बदलां बरोबर राजा, राज्यव्यवस्था, कुरघोडी, राजकारण आणि त्याप्रमाणे राजांच्या चरित्राची घसरण, सामान्यांच्या भयात वाढ करत गेली.
ईश्वराचे संकेत व प्रतिसाद हा लहरीस्वरूपात नित्य ब्रह्मांडात विहरत आहेच. पण जीवन जसजसं अशाश्वत होत गेलं, सामान्य माणसाची ईश्वर आराधना, या भीतीयुक्त वातावरणात वाढत गेली आणि त्यामागची कारणमीमांसा अहेतुक भक्तीकडून सहेतुक भक्तीकडे सरकत गेली. कदाचित हे जाणूनच ईश्वरीय आराधनेचे मार्ग व त्या मार्गांची सुलभता वाढत गेली. ही काळाची गती असेल किंवा काळाच्या बदलाला ईश्वरीय प्रतिसाद असेल.
पण आराधना साधना व भक्ती घोर मार्गाकडून सुलभ सहज मार्गाकडे झाली हे नक्की. त्यातूनच ऋषीमुनी संत महंत यांनी सहजसाध्य अश्या स्मरण भक्तीला वा नाम स्मरणाला, या युगासाठी प्राधान्य दिलं. ईश्वरानेसुद्धा आपली प्रतिक्रिया व संकेत व्यवस्था सुलभ केली.
यामागचं मला जाणवलेलं लॉजिक किंवा तर्क असा आहे की,
कोणत्याही कार्यालयीन व्यवस्थेत संस्थेचा प्रमुख वा उच्च पदावरील व्यक्ती, हे काही अपवादात्मक परिस्थितीत उपलब्ध असतात. अन्यथा त्या व्यक्तीच्या हाताखालील कर्मचारी व अधिकारी कायमस्वरूपी उपलब्ध असतात. त्याचप्रमाणे सत्ययुग ते कलियुग या प्रवासात ईश्वराला आपल्या उपलब्धीची व्यवस्था बदलावी लागली असू शकेल. म्हणूनच कलियुगात ईश्वराच्या प्राप्तीची, त्याच्या कृपेस पात्र असण्याची साधना वा भक्ती, सहजसाध्य करण्याची व्यवस्था, हा ईश्वरी कृपेचा भाग असावा.
जसं कार्यालयीन कामात आणीबाणीच्या वेळी किंवा इमर्जन्सी असताना प्रमुख वा उच्चपदस्थ केंव्हाही उपलब्ध असतात. कलियुगाची परिस्थिती ही त्या इमर्जन्सीसारखी बिकटतेकडे जाणारी असल्यामुळे विश्वप्रमुखाला, आपण सहज व सामान्यांना उपलब्ध होण्यासाठीची सहजसाध्य व्यवस्था, घडवावी लागली आणि त्यासाठी कलियुगाच्या प्रारंभाआधी गीताज्ञान सांगून, संत महंत व्यवस्थेतून हे जगापुढे स्वतः ईश्वर मांडत असावा. हा संकेत ओळखून जास्तीतजास्त सामान्य जनांनी भक्तीतून ईश्वराला आराधित करावे,पण ते विश्व कल्याणासाठी.
का ते उद्याच्या चिंतनात पाहू. नाम मुखाने घेत राहू.
श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल.
भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. पेमेंटसाठी नं. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.
आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
३०/१२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment