भोग आणि ईश्वर ३८७
श्रीब्रह्मदेव आपलं कथन करत होते आणि सभा शांत चित्ताने, मन एकाग्र करून, त्याचं श्रवण करत होती. श्रीब्रह्मदेव पुढे म्हणाले
राजसी आणि तामसी शक्तींचा प्रभाव, अर्थातच हळूहळू वाढत जाईल. संपूर्ण भूतलावर त्या तामसी राजसी व भोगी शक्ती माया मोहाचं धुकं तयार करतील. याचं कारण आधीच्या तीनही युगात सात्विक व पुण्यवान जिवात्मे आपला प्रभाव समस्त सृष्टीवर पाडून, तामसी शक्तींना प्रभावहीन करण्यात यशस्वी असतील.
पण काळाच्या ओघात, कर्माच्या गतीने आणि पुण्य प्रभावाने हे सर्व सात्विक आत्मे आपल्या निजधामाला प्राप्त होऊन, सप्तस्वर्गाचा आनंद उपभोगत असतील. त्यामुळे भूतलावर हीन व दीन असे दोनच गुण जन सामान्यांमध्ये प्रभावित असतील. हीन म्हणजे तामसी, असुर शक्ती प्रभावित, माया मोह काम व क्रोध यांच्यामुळे मत्त झालेले, दूषित आत्मे असतील.
तामस हा गुण जो आधीच्या युगात सात्विक गुणाने दबावाखाली असलेला त्रिगुणातीत एक गुण,आपला प्रभाव या युगात पूर्णपणे दाखवेल. म्हणजे असं की, तुरटीच्या प्रभावाने तळाशी गेलेला साका, पात्रातील जलाची पातळी जशी कमी कमी होत जाईल, तसतसा पुन्हा प्रभावी भासेल. त्याप्रमाणे आधीच्या तीनही युगात सात्विक तेजाने तामसाचा खाली बसलेला साका वा गाळ, हे सर्व सात्विक आत्मे भूलोकातून वरच्या लोकांत गेल्यामुळे, पृष्ठभागावर येऊन आपला खेळ दाखवेल.
त्यांचा प्रभाव रोखण्यासाठी तुलनेने सात्विकता कमी पडेल.त्यामुळे या अजूनच तामसी होत जाणाऱ्या काळात अनेकजण यात मायेने, लोभाने, मोहाने, भयाने, बुद्धि भ्रमाने, साशंकतेने अश्या सर्व प्रकारच्या नकारात्मक तेच्या प्रभावाने, ओढले जातील. याचा प्रभाव कमी करण्यासाठी, काही काही अंतराने पुण्यात्मे भूतलावर थोड्या थोड्या काळाने येऊन, तामसाचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न जरूर करतील.
त्याचा परिणाम म्हणून कलीचा प्रभाव नक्कीच नियंत्रणात राहण्यास मदत होईल. परंतु या काळात पुण्यप्राप्तीच्या अनेक वाटा किंवा मार्ग निष्प्रभ झालेले असल्यामुळे, पुण्य जोडण्या साठी व तामसाच्या प्रभावापासून बचावासाठी ईश्वराचं स्मरण, भजन, नामसंकीर्तन हा एकच उत्तम मार्ग असेल. हा मार्ग हळु वार भासत असल्यामुळे कदाचित परिणामकारक वाटणार नाही.
पण मुंगी ज्याप्रमाणे एक एक साखरेचा दाणा गोळा करत, अनेक पट साखर जमा करते किंवा थेंब थेंब जल साठत गेल्यास जरी ते संख्येने कमी भासले तरी, कालांतराने ते एखाद्या जल प्रवाहाचे स्वरूप धारण करते, त्याप्रमाणे हळूहळू पण सातत्याने केलेले ईश्वरस्मरण, काळाच्या उदरात आपला प्रभाव जमा करत जाईल. ज्याप्रमाणे प्रत्येक श्वास हा संख्येने एक असला तरी एकामागून एक अश्या येणाऱ्या श्वासांच्या मालिकेने जीवन सुरू राहते, त्याचप्रमाणे हे जगतपित्याचे, श्वासां प्रमाणे, अखंड केलेले स्मरण प्राणीमात्राला कलीच्या तामसी, क्रूर आणि नीचतम प्रभावापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न जरूर करेल.
श्रीब्रह्मदेवांच्या या प्रवचनावर अजून चिंतन करूया, पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे अखंड स्मरण सुरूच ठेवू, तेच तारक असेल.
श्रीब्रह्मदेवांच्या विस्तृत कथनाचं चिंतन आपण उद्या करूया. तोपर्यंत नामाचं चिंतन सुरूच ठेवूया, त्यामध्ये खंड नको. सद्गुरू आज्ञा तेच सांगते.
श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल.
भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. पेमेंटसाठी नं. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.
आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२२/१२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment