Skip to main content

ज्ञानेश्वरीतील चवथ्या अध्यायातील दोन ओव्याचा भावार्थ !!!

ज्ञानेश्वरीतील चवथ्या अध्यायातील दोन ओव्याचा भावार्थ !!! 

अथवा नावें हन जो रिगे।तो थडियेचें रुख जातां देखे वेगें ।तेचि साचोकारें जों पाहों लागे । तंव रुख म्हणे अचळ ॥४. ९७॥ 

आणि उदोअस्तुचेनि प्रमाणें । जैसें न चालतां सूर्याचें चालणें ।तैसें नैष्कर्म्यत्व जाणें । कर्मींचि असतां ॥४. ९९॥ 

ज्ञानेश्वरीच्या चवथ्या अध्यायात ओवी क्र ९७ आणि ९८ मध्ये खूप मोठं वैज्ञानिक सत्य माऊली सांगून गेले आहेत. हे वैज्ञानिक सत्य पाश्चात्य विज्ञानाला सतराव्या वा अठराव्या शतकात सापडलं आणि मांडता आलं. किंवा विज्ञान त्यापाशी अठराव्या शतकात पोचलं. 

विज्ञानात दोन प्रकार आहेत. एक प्रकार शोध आणि दुसरा प्रकार म्हणजे संशोधन. संशोधन अर्थात जे अस्तित्वात नाही, ते संशोधनाने जगाला देणं. ज्याला इंग्रजीत इन्व्हेन्शन म्हणतात ते. शोध म्हणजे जी गोष्ट अस्तित्वात आहे, पण जी जगाला माहीत नाही. याला इंग्रजीत डिस्कव्हरी म्हणतात. 

या दुसऱ्या प्रकारात पुन्हा दोन उपप्रकार येतात. एक म्हणजे कदाचित बहुसंख्य लोकांना माहीत नाहीत अश्या गोष्टी शोधणं आणि दुसरं म्हणजे  काही ठराविक भागा तील लोकांना माहीत नाहीत अशा गोष्टी त्यांच्यापुढे मांडणं. दुसऱ्या प्रकारात पाश्चिमात्य जगतातील अनेक शोध येतात. उदाहरणार्थ पृथ्वी गोल आहे, सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते. 

वास्तविक या दुसऱ्या प्रकारातील अनेक गोष्टी पाश्चात्य जगतात संपूर्णतः अज्ञानाच्या अंधःकारावर अवलंबून होत्या. उदाहरणार्थ पृथ्वी ही चपटी आहे, हा समज अठराव्या शतकापर्यंत पाश्चात्य जगतात सर्वमान्य होता. याला सर्वप्रथम छेद देण्याच्या प्रयत्न केलेल्या गॅलिलिओला अनेक प्रकारे छळण्यात आलं होतं. 

अश्या स्थितीत पाश्चात्य, अठराव्या शतकापर्यंत  पृथ्वी बाहेरील जगताबाबत  अनभिज्ञ असताना, त्या आधी पाचशे ते सहाशे वर्ष आधी, बाराव्या शतकात, संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींनी आपल्या भावार्थ दीपिका, या श्रीमद्भगवद्गीते वरील सार्थ टिका ग्रंथात, चवथ्या अध्यायात, कर्म अकर्म यावर भाष्य करताना, दृष्टांत सांगून, वरील दोन ओव्या मांडून, सनातन भारतीय ज्ञान हे, विज्ञानाच्या पातळीवर, किती उच्च स्थानी, युगानुयुगां पासून होतं, याचीच साक्ष आणि प्रचिती दिली आहे. 

पहिल्या ओवीत माऊली सांगतात की, नावेत बसलेलं असताना आपल्याला किनाऱ्यावरील झाडं पळताना दिसतात, पण वास्तविक परिस्थिती, त्यापेक्षा विपरीत असते. पण नाव पळत असते आणि आपला देह, नावेच्या वेगाशी सुसंगत झालेला असल्यामुळे, आपण स्थिर असून, किनाऱ्यावरील  झाडं मागे जात आहेत, हा भास होतो. हा सुसंगतीचा सिद्धांतसुद्धा पाश्चात्य जगतात खूप उशिरा मांडला गेला. 

त्याला अनुसरून, पुढील ओवीत, पाश्चात्य विज्ञानातील संशोधनाच्या अनेक शतके आधी, हे सहजी सांगतात की, त्याचप्रमाणे, वास्तविक सूर्य अचल असूनही आपल्याला आपल्या विशिष्ट स्थानामुळे, आपण स्थिर आहोत आणि सूर्य फिरत आहे असा भास होतो. न चालताची सूर्याचे चालणे, या ओवीतल्या एका ओळीत, सर्व वैज्ञानिक सत्य, माऊली अगदी घरची माहीत असलेलीच गोष्ट सांगावी, त्याप्रमाणे सांगतात. 

विश्वात पाश्चात्य जगत, ज्याला विज्ञान विज्ञान म्हणून अमाप महत्व देतं, ती गोष्ट विश्वाचीच माऊली, अत्यंत सहज व जाता जाता सांगावी, तितकी सहज बाब म्हणून, सांगून जाते. म्हणजे आपण एखादी गोष्ट सहज म्हणून सांगतो आणि लहान मुलं मात्र,त्याला खूप गहन रहस्याचा उलगडा म्हणून समजतं, तसाच हा प्रकार मला स्वतःला वाटतो. विश्वात ज्ञान व विज्ञान या दोन्हीबाबत मागासलेले असलेल्या पाश्चात्यांना, जे शोध म्हणून अप्रूप वाटतं, त्यातील अनेक शोध हे या भूमीत युगांपासून ज्ञात होते, हेच यातून सिद्ध होतं. 

म्हणजेच हजारो वर्षांपूर्वी आमच्याकडे असलेलं ज्ञान, कुणीतरी आपल्यालाच सांगावं, तसा प्रकार आता  झाला आहे. आता यावर कुणी म्हणतील की, तुम्हीच तुमच्या ज्ञानाला किंमत दिली नाहीत, तर ते काय करणार. असो, हा वेगळ्या लेखाचा विषय आहे. 

पण माऊलींनी मांडलेल्या या वैज्ञानिक सत्याकडे डोळेझाक करता येणार नाही. या दोन साध्या दृष्टांताने पृथ्वी, सूर्य यातील वैज्ञानिक नातं, खगोलशास्त्र हे सर्व कोणतीही, दुर्बीण, यान, दूरसंचार व्यवस्था अस्तित्वात नसताना, सत्य आणि भास हे दोन्ही स्पष्ट करून, मांडले. 

असो, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या कृपेने व प्रेरणेने आणि मित्रवर्य श्री नितिन भानुशाली यांच्या संपर्काने,  सध्या श्रीज्ञानेश्वरी अर्थात श्रीभावार्थदीपिका अभ्यासाला घेतली आहे. भोग आणि ईश्वर याचा पुढील प्रवास कुठे घेऊन जाईल, हे आताच सांगणं कठीण आहे. बाकी श्रीमहाराज सर्वज्ञ आहेत, त्यांना सादर प्रणाम.! 

श्रीज्ञानदेव महाराज की जय !! 

श्रीकृष्णार्पणमस्तू !!! 

©® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
२३/१२/२०२१
९०४९३५३८०९ whap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...