भोग आणि ईश्वर १२२ आपण कित्येकदा एखाद्याच्या बोलण्याने व्यथित वा नाराज अथवा निराश होतो. कारण सकृतदर्शनी ते बोल विनाकारण ऐकावे लागलेले असतात. त्यात आपली काही चूक असते वा नसते. उदाहरणार्थ एखाद्यावेळी आपण चांगल्या मनाने व उद्देशाने, एखादा वाद वा विसंवाद सोडवायला जातो आणि आपल्यालाच चार शब्द ऐकून घ्यावे लागतात. किंवा कधी कधी आपण कशातही नसताना आपल्या प्रतिमेबद्दल वा स्वभावाबद्दल चुकीचं बोललं जातं वा वागणुकीतील नसलेले दोष दाखवले जातात. या किंवा अश्या प्रसंगात दोन गोष्टी शांतपणे मनात विश्लेषित करायच्या. सर्वात प्रथम, नेहमी आपला सद्सद्विवेक जागा ठेवायचा आणि त्यासाठी आपलं डोकं, बुद्धी आणि मन, अशी गोष्ट वा वाक्य ऐकत असताना वा ऐकल्यावर, शांत ठेवायचा प्रयत्न करायचा. इथेच नाम क्षणमात्र का होईना पण उत्तम कार्य करतं. दहा आकडे मोजण्यापेक्षा दहावेळा नाम घेतलेलं सर्वात उत्तम. जर आपण शांत राहिलो आणि आपला विवेक जागा राहिला, तर एक गोष्ट मनात स्वतःला विचारायची की, या व्यक्तीने आता माझ्याबद्दल जे बोल बोलले त्याप्रमाणे मी आहे का. उत्तर हो असेल, तर मग ती व्यक्ती सत्य कथन करत आ...