भोग आणि ईश्वर ५४
नामाचा आणि भोगातून सुटकेचा काही कार्यकारण संबंध आहे का, असा एक प्रश्न नेहमी मनात येतो. भोग हे कर्मफल आहे आणि ते त्याच्या नियतीप्रमाणे त्या त्या निहित वेळेनुसार येणारच. त्यांच्या येण्याचा काळ व वेळ प्रत्यक्ष परमेश्वर टाळू शकत नाही. मग नाम घेऊन उपयोग काय असा एक मुद्दा पुढे येऊ शकतो.
नाम हे असं औषध आहे जे, येणाऱ्या संकटांची, भोगांची, नकारात्मकतेची भीती मनातून नाहीशी करते. येणाऱ्या संकटांना धैर्याने सामोरं जाण्याची मनःस्थिती आणि शक्ती नाम प्रदान करते. नाम मनाला अश्या उंचीवर नेतं की, जिथे नामसाधक नामाच्या आनंदात घडणाऱ्या सुख व दुःख दोन्हीत समस्थितीत राहतो. अर्थातच सुखातही आनंदी आणि दुःखातही स्थिर राहतो वा राहू शकतो.
नामाला एकदा तुम्ही चिकटलात की, नाम आपलं कार्य संथ पण स्थिरपणे करते. नामाच्या नादात मन एक प्रकारे समाधी अवस्थेचा अनुभव घेते. नाम हा नामधारकासाठी खूप मोठा योग आहे, जो निराकार,निर्गुण ईश्वराच्या साक्षात्काराचा अनुभव देतं. नामात नामाची इष्टदेवता आपल्या सह असते आणि सद्गुरू, मनापासून नाम घेणाऱ्याच्या पाठीशी सतत उभे असतात. म्हणूनच खऱ्या मनाने व निष्काम भावाने नाम घेणाऱ्या साधकाला कोणत्याही तऱ्हेची काळजी, चिंता व भीती बाळगण्याची गरजच नाही.
नामाने पापांचे पर्वत नष्ट होतात म्हणजे नक्की काय होतं. नाम नित्य, जागृत अवस्थेत, सातत्य ठेवून मनापासून वा मन पूर्ण एकाग्र करून घेतले की ते सुप्त मनात पोहोचते. त्याची परिणती म्हणजे आपण जागृतावस्थेत नसतानासुद्धा आपल्याकडून नामजप होतो, जो जागृत मनाला जाणवत नसला तरी सद्गुरू व नामाच्या इष्टदेवतेपर्यंत ते पोहोचते. याची प्रचिती व प्रत्यय अनेक संतांनी आणून दिला आहे.
पण नाम हे विरुद्ध भक्तीस्वरूप घेतल्यानेसुद्धा प्रत्यक्ष परमेश्वर अवतीर्ण होऊन त्यांनीच महत्तम पापी असुरांची इहलोकीची यात्रा संपवून त्यांना मोक्ष दिला. मोक्ष यासाठी की, प्रत्यक्ष परमेश्वर जिथे समोर उपस्थित आहे, त्याठिकाणी स्वर्गच असला पाहिजे आणि दुसरं असं की,
वेद पुराणात भगवंतानी वचन दिलं आहे की, ज्याचा मृत्यू माझ्याहातून होईल, त्याला मोक्षप्राप्ती होईल. याची कित्येक उदाहरणं आहेत, हिरण्यकश्यपू, रावण, मणी मल्लासुर इत्यादी अनेक. यांनी द्वेषाने का होईना वा रागाने का होईना, प्रत्यक्ष भगवंतांना आव्हानीत केलं आणि त्यासाठी त्यांच नाम घेतलं.
म्हणजे कोणत्याही भावनेने नाम घेतलं तरी ते आपला परिणाम एकाअर्थी सकारात्मकपणे साधते. म्हणजे त्या असुरांचा देह नष्ट झाला, हे भौतिक अर्थाने खरं असलं, तरी पारमार्थिक अर्थाने त्या असुरांचं कल्याण झालं. म्हणजे जर असुरांनासुद्धा भगवंत पापमुक्त करून मोक्ष देऊ शकतात, तर आपण तितके पापी नक्कीच नाही. म्हणून निष्ठेने, प्रेमाने आणि मनापासून नाम घ्या, तेच अंती तारणार आहे.
नाम घेत गेल्याने त्याच्या प्रभावाने, भागवंतावरील आपल्या प्रेमाने आणि सद्गुरू कृपेने खरोखरीच अनेक जन्मांची पापं धुतली जातात आणि भूत भविष्य आणि वर्तमान यांसह सर्व जन्माचं सार्थक होतं. जर नामावर आपली श्रद्धा नसेल तर सद्गुरुंवरील आपल्या निष्ठेसाठी व श्रद्धेसाठीतरी नाम घ्यावे, पण घ्यावे.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२३/०१/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment