भोग आणि ईश्वर ३७
माया आपला खेळ नित्य देहात राहून व देहाबाहेर राहूनही दाखवत असते. माया ही ब्रम्हाकार आहे आणि हे जग ब्रह्ममय आहे. म्हणजे विश्वाच्या सुरवातीपासून ते विश्वाच्या अंतापर्यंत आणि विश्व संपल्यावरसुद्धा माया अस्तित्वात असेल.
एक प्रश्न आहे की माया म्हणजे मनाचा खेळ किंवा मनाच्या वृतींचाच भाग आहे का, की मनातील काम क्रोध आदि विकार हा मायेचाच भाग वा खेळ आहे का. याचं उत्तर हे पूर्ण हो आणि पूर्ण नाही असं देता येणार नाही. मुळात मनात उत्पन्न होणारे विकार हे वृत्तीतून आणि वृत्ती विचार वा विचारांचा अभाव यातून तयार होते.
येणारे विचार हे मागील कर्मफल, मनावर आजपर्यंत घडलेले संस्कार जे आत्म्याच्या प्रवासात अनेक जन्मात जमा केलेल्या अनुभवातून आलेले असतात. त्या विचारांना गती देण्याचं वा खीळ घालण्याचं काम प्रारब्धात आलेले भाग्य वा भोग करतात.
या सर्वात माया ही विचारांना अनेक मार्गांनी प्रवृत्त वा परावृत्त करून जिवात्म्याच्या इप्सित हेतुपर्यंत त्याला पोचू न देता त्याला भरकटवून अयोग्य जागी वा अयोग्य निर्णयाप्रत नेते. अर्थात माया निर्णय कुठेही स्वतः घेत नाही. पण परिस्थितीचे व भावभावनांचे संभ्रम मात्र निर्माण करते. तिचा उद्देश हाच की जीवात्मा जन्ममृत्युच्या फेऱ्यातून बाहेर पडता कामा नये, हे पाहणं. यात तिला प्राप्त काहीच करायचं नसतं किंबहुना जीव या जगाच्या व्यवहारात गुरफटून नित्य या जगात पुनर्जन्म घेत राहून या जगताचं चक्र निरंतर चालू राहील इतकंच साध्य करणं.
एक उदाहरण घेऊ. आपण अशी अनेक उदाहरणं पाहिली आहेत पूर्वी व आतासुद्धा पाहायला मिळतात की, एखाद्या गरीब अशिक्षित कुटुंबातून एखादा मुलगा आपल्या परिस्थितीच्या विरोधात लढून, कष्ट करून, सहज साध्य नसलेलं यश साध्य करून संपूर्ण कुटुंबाला त्यातून बाहेर काढतो. एखादा तर संपूर्ण समाजाला वा राष्ट्राला आपत्ती बाहेर काढतो.
यामध्ये त्या व्यक्तीचे कष्ट कुठेही कमी लेखण्याचा उद्देश नाही. तरीही एक विचार मनात येतोच की, त्या घरात, त्याच परिस्थितीत, त्याच्या आजूबाजूला, त्याच्यासारखीच कितीतरी मुलं वा जीव असतील. पण त्या प्राप्त परिस्थितीतून बाहेर पडण्याची बुद्धी, निग्रह, जिद्द, टक्कर देण्याची वृत्ती, न हरण्याची तयारी, मनाचा कणखरपणा हा नक्कीच त्याच्या आत्म्याच्या प्रवासात कर्मफलस्वरूप प्राप्त झालेला असणार, यात शंकाच नको.
मग अश्या आत्म्यांना वा त्या देहाला मायेचे पाश बद्ध करू शकत नाहीत का. तर मनात असलेली लढण्याची जिद्द, न हरण्याची वृत्ती, जोडीला प्रबळ इच्छाशक्ती, आपल्या ध्येयावर पूर्ण श्रद्धा या भांडवलाच्या बळावर मायेच्या पाशातून मुक्त होता येतं. माया फक्त त्याच जीवांना बद्ध करू शकते व आपल्या इच्छेनुसार कार्य करायला लावते जे त्या प्रवाहात वाहावत जातात. अर्थातच ज्यांना आपली श्रद्धा, विश्वास, जिद्द, चिकाटी, कष्ट, सातत्य हे नेटाने टिकवून पुढे जाता येतं त्यांना ईश्वरसुद्धा सहाय्य करत असेल हे नक्की.
मायेचा पाश आणि विकाराच्या बेड्या परिस्थिती विपरीत असताना सुद्धा ज्यांना अडकवू वा बद्ध करू शकत नाहीत, असे आत्मे निश्चितच काही खास संचित घेऊन आलेले असतात आणि त्यांना प्राप्त स्थितीचा अडसरदेखील अडवू शकत नाही. मला वाटतं अश्याच आत्म्याच्या शोधार्थ ईश्वर असणार आणि असे जीव नजरेस येताच त्यांना उचित सहाय्य ईश्वर करत असणार हे नक्की.
पुढील भागात बघूया.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०६/०१/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment