भोग आणि ईश्वर ६३
आज एक प्रश्न आला की नाम घ्यावं की नामसंकीर्तन.
नामसंकीर्तन हे नामच आहे पण नामरूप भक्तीचं काव्यात्म उच्चारण आहे, ते नामच आहे. नामसंकीर्तन म्हणजे कीर्तन वा संगीत यांसह भगवंताच्या नामाचा आनंद घेणे. त्यात एक नादमाधुर्य आहे आणि त्यातील तल्लीनता निश्चित छान असते आणि एकाग्रता नक्कीच उपयुक्त असते. परिणाम दोन्हींचा एकच आहे. पण सर्वांना संकीर्तन सर्वकाळ ते जमू शकेल असं नाही म्हणून नाम हे उत्तम कारण ते एकांतात सुद्धा साधता येते. नामसंकीर्तन हे जमेल असं नाही.
यावर थोडं विस्ताराने विचार करू. पण एखाद्याला नाम संकीर्तन वा अभंगरूपात साधत असेल आणि जमत असेल तर करण्यास काहीच हरकत नाही. मार्ग थोडासा भिन्न आहे, पण परिणाम आणि एकाग्रता तीच, उपयोग तोच आहे. मुळात कीर्तनाला परंपरा ही नारदांपासून सुरू होते, असा पुराणात उल्लेख आहे, म्हणजेच कीर्तन या परमेश्वर स्तुतीचे आद्यप्रवर्तक हे स्वतः देवर्षी नारद आहेत.
नाम हा परमेश्वराला भजण्याचा एक प्रशस्त, पण सहजसोप्पा मार्ग आहे. एखाद्याला प्रेमाने, भक्तीने, तल्लीन होऊन आळवणे म्हणजेच नाम घेणे. परमेश्वराला भक्तीरुप साद घालणे, त्याला विनवणे, त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणे, त्याच्या नामाच्या जपाच्या नादमाधुर्यात हरवून जाणे म्हणजे नाम घेणे. ही तन्मयता, तल्लीनता साधून आपल्या मनातील भक्तीचा भाव आपल्या आरध्यापर्यंत पोचवणे हाच नामाचा उद्देश आणि साध्य आहे. कारण त्याद्वारे ज्या लहरी व तरंग उत्पन्न होतात, त्याच्या तीव्रतेवर त्याची इच्छित पातळीवर पोहोचण्याची क्षमता अवलंबून असते.
सामूहिक नामजपात सर्व साधकांच्या नामाच्या लहरी व तरंग एकत्रित होऊन, त्यांचा सामूहिक परिणाम, आपल्या आराध्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो. त्याचा निश्चित परिणाम होतो. कारण एकत्रित झालेल्या लहरी निश्चित जास्त क्षमतेच्या अर्थात फ्रिक्वेन्सीच्या असतात. आपण हे जाणतोच की, रेडिओमध्ये उच्च, मध्यम व कमी फ्रिक्वेन्सीचं प्रसारण होतं आणि त्याचा परिणाम वा त्या लहरी त्या त्या ठराविक अंतरापर्यंत व्यवस्थित ऐकू येऊ शकतात.
किंबहुना तेच तत्व भ्रमणध्वनीच्या संदेशवहन मनोऱ्यात देखील वापरलं जातं आणि भ्रमणध्वनीत सुद्धा ते संदेश प्राप्त करून घेण्याची क्षमता त्या फ्रिक्वेन्सी वर अवलंबून असते. म्हणूनच काही ठिकाणी वा काही वेळा संदेश अशक्त असतात आणि आपल्याला बोलताना संपर्क तुटण्याचा अनुभव येतो. म्हणजेच संपर्क लहरींच्या क्षमतेवर, त्याचं वहन व इच्छित स्थळी पोचणं अवलंबून आहे.
आपण ज्यावेळी एकटे नाम घेतो त्यावेळी आपण एकटेच संपर्कलहरी निर्माण करतो. त्यांची वारंवारता आणि क्षमता आपणच वाढवू वा कमी वा बंद करू शकतो. म्हणूनच कोणतेही सद्गुरु वारंवार, सतत, नित्य नाम घ्या हे सतत बजावत असतात, ते याचसाठी. कोणत्या वेळी लहरींची क्षमता अधिक असते वा आपल्याकडून त्यांना उत्पन्न करण्याची क्षमता जास्त असते, किंवा वातावरणातील प्रभावामुळे त्यांची क्षमता वाढते, याचंदेखील शास्त्र आहे.
साधारण ब्राह्ममुहूर्तापासून ते सूर्योदयाच्या वेळेपर्यंत वातावरणातील सर्व प्रदूषित तत्त्वं अकार्यक्षम वा अशक्त असतात, वातावरणात, शुद्ध हवेचा परिणाम जास्त असतो, सकारात्मकता प्रचंड प्रमाणात असते, म्हणून त्यावेळी केलेली कोणतीही अध्यात्मिक, धार्मिक, अभ्यास, नामजप वा एकाग्रतेकडे नेणारी अथवा शांततेची गरज असणारी कोणतीही सातत्यपूर्ण कृती, इतर वेळेपेक्षा कितीतरी पट अधिक परिणाम करते. म्हणजेच आपण निर्माण केलेल्या संपर्कलहरी या अधिक शक्तिशाली आणि अधिक अंतरापर्यंत जाणाऱ्या आणि अधिक परिणामकारक असतात.
हाच विषय उद्याच्या भागात अजून पुढे नेऊ.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०१/०२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment