Skip to main content

भोग आणि ईश्वर ५२

भोग आणि ईश्वर  ५२
  
ज्ञानाचा विचार करताना सर्वात प्रथम जे जाणणं गरजेचं आहे ते म्हणजे आत्मज्ञान. मी कोण, कुठून आलो आणि कुठे जाणार. मुळात सर्व जिवात्मे हे एकाच सृष्टी कर्त्याच्या तेजाचा अंश आहेत. त्यामुळे तो प्रवास तेथून विभक्त होऊन सुरू झाला आणि तिथे पोहोचून भगवंतांमध्ये रत होण्यासाठीचा सुरू असलेला प्रवास आहे. भगवंतापासून विलग झालेला पुन्हा भगवंताशी मिलन करण्यास, त्यास प्राप्त होण्यास आतूर तो भक्त आणि त्याला प्राप्त करण्यासाठी , त्याची कृपा व्हावी म्हणून जी कामना, याचना, अर्चना, प्रार्थना केली जाते ती भक्ती. 

त्या ईश्वर भक्तीत रममाण होणं म्हणजे भक्तियोग साधणं. ईश्वर म्हणजे जगतपिता, ज्याची ओळख, या देहात आल्यामुळे आपण विसरलो आहोत, तो सर्व चराचराचा जन्मदाता. आत्मा ज्यावेळी शरीरात बद्ध होण्याआधी मुक्तावस्थेत भ्रमण करत असतो, त्यावेळी तो सर्व जाणतो, त्याला सर्व ज्ञात असतं.परंतु ज्याक्षणी तो पंचतत्वी देहात प्रवेश करतो, त्याक्षणी त्याला या देहाच्या मर्यादा लागू होतात. 

पुन्हा बद्धावस्थेत आल्यानंतर मूळ स्वरूपाला जाणून तेथे पोचण्याची इच्छा निर्माण होण्याची प्रक्रिया सहजी होत नाही. कारण देहातील विकार आणि सृष्टीकर्त्याची माया देहाला भिन्न मार्गावर घेऊन जातात. अनेक जन्म या भटकंतीत वाया जातात. सहजसाध्य असलेली गोष्ट दुष्कर आणि दुरापास्त होऊन जाते. त्यातच अनेक जन्मातील कर्मांचे भोग व उपभोग पाठी लागतात. त्या भोग उपभोग साखळीत चालू जन्मातील कर्म मिसळून तो अनंत जन्माचा खेळ होतो.

यातून सुटण्याचा मार्ग कठीण नाही वा खडतर नाही. पण त्यासाठी हवा निग्रह, निर्धार, नीती, नियम आणि त्या जोडीला श्रद्धा, निष्ठा आणि विश्वास. जीवन जगणं हे एका शर्यतीसारखं आहे. लक्ष्य हे भगवंताचं प्रेम मिळवण्याचं असावं. पण आपण जन्म, संसार, मुलं या नात्यांच्या गोतावळ्यात मूळ उद्देशाला विसरून जातो. पण मग सुरवात कुठे आणि कशी करावी हे उमगत नाही आणि जमत नाही.

नवविधा भक्तीच्या नऊ मार्गांपैकी कोणत्याही मार्गाने जाऊन भगवंत प्राप्त करणं शक्य आहे. परंतु काळाच्या ओघात, जगाच्या सध्याच्या काळातील जीवनपद्धतीमुळे त्यातील किती मार्ग प्रत्यक्ष वापरता येतील, ही शंका आहे. त्यातच कलियुगात भक्तीचे अनेक मार्ग हे प्रभावहीन आहेत. पण मग अश्यावेळी भगवंताच्या आराधानेसाठी काहीच शक्य नाही का, असा साहजिक प्रश्न पडू शकतो. 

पुराणकाळापासून ते गेल्या हजार वर्षातील अनेक ऋषीमुनी, संत महंत यांनी एक सुंदर सोप्पा आणि सहजसाध्य मार्ग, त्यावर स्वतः आचरण करून, उदाहरण घालून देऊन आपल्याला सिद्ध करून दिला आहे, तो म्हणजे फक्त ईश्वराचं स्मरण करणे. स्मरण करणे म्हणजे एखाद्याला मनाने आठवणे. स्मरण का करायचं तर तो विस्मृतीत गेला आहे म्हणून. 

आपण त्याचा अंश असल्याचं विस्मरण झालं म्हणून, त्यानेच या जगतात आपल्याला आणलं याचं विस्मरण झालं म्हणून, तोच जगतपालक आहे याचं विस्मरण झालं म्हणून, त्याच्या विस्मृतीत कर्मफलाचे डोंगर उभारले आणि ती ओझी वाहता वाहता आता जीवनानुभव असह्य झाले म्हणून. स्मरण करणे या शब्दात ईश्वराशी समरस होणे आणि त्याच्या नामात रममाण होणे हे दोन्ही अपेक्षित आहे. या दोन्ही व्यतिरिक्त नामस्मरण हा उपचार आहे. 

नाम घेणे म्हणजे त्या सर्वश्रेष्ठ, सर्वशक्तिमान ईश्वराशी एकरूप होऊन, फक्त त्याचा विचार करणे. स्वतःचा मी सुद्धा शिल्लक न राहणे म्हणजे नाममय होणे. इतकी तद्रुपता साधणे हीच नामाची खरी कसोटी आहे. नाम हा केवळ उपचार नसून तो सर्वोपचार आहे. याचा विस्तृत अर्थ उद्या पाहूया. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२१/०१/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...