भोग आणि ईश्वर ५५
खूपदा आपण स्वतः असं म्हणतो किंवा अनेकांना म्हणताना ऐकतो की, ईश्वरकृपेचा प्रत्यय येत नाही, किंवा ईश्वरकृपा नशिबाने मिळते इत्यादी. असे अनेक आक्षेप ऐकायला मिळतात वा वाचायला मिळतात. आपण बघतो की, बरेच वेळा पापभिरू माणसांना त्रास होतो आणि तरीही ईश्वर काही करत नाही, याचा आपल्यालापण राग येतो, निदान भोग भोगणाऱ्या त्या माणसांबद्दल वाईट जरूर वाटतं.
यात दोन प्रश्न आहेत एक ईश्वरकृपेचा आणि दुसरा चांगल्या माणसांना भोगाव्या लागणाऱ्या यातना. तसं बघितलं तर दोन्हींचा संबंध आहे आणि नाहीसुद्धा. मुळात ईश्वर हा ब्रह्मांडाचा रचयिता आहे. त्या नात्याने परमपिता आणि संपूर्ण सृष्टीची निर्मिती अर्थात जन्मदाता या नात्याने जगतजननी अर्थात विश्वमाता. म्हणजे तोच ईश्वर दुहेरी भूमिकेत आहे.
माता म्हणून या जगतावर, जगतातील प्रत्येक जीवावर, चराचरावर , सजीव निर्जीव या सर्वांवर त्याचं प्रेम आहे. त्या प्रेमाचाच प्रत्यय वा प्रचिती म्हणून दुर्जनातल्या दुर्जन व नीचातल्या नीच व्यक्ती वा असुर दानव वा राक्षसांनासुद्धा अंतिम उपाय वा निरुपाय म्हणून देहदंड देतो. एक मायच, होता होईल तितकं, आपल्या मुलांना संभाळून घेते.
परंतु ज्यावेळी एखादा पुत्र दुसऱ्या पुत्रांना क्लेश देऊन त्यांना जगणं मुश्किल करतो, त्यावेळेला बहुतांसी आधार, दुर्जनांचा संहार आणि अखंड स्थितीचा रक्षणकर्ता म्हणून त्या खल अर्थात दुष्टांना त्यांची जागा दाखवून सुष्टांना अभय देण्यास तीच माता जगतपिता म्हणून प्रकट होते.
म्हणजेच जगताचा सांभाळ आणि त्याकारणाने रक्षणार्थ संहार हे क्रमप्राप्त आहे, ते करण्याचं ब्रीद ईश्वराचं आहे, ते करणारच. हे करत असताना जगताचे सर्व व्यवहार सुरळीत चालू आहेत, हे पाहणं ईश्वरीकर्तव्य आहे. परंतु सर्व सुरळीत सुरू असताना त्यात अकारण लक्ष घालून जगतव्यवहाराची गाडी उगाच आपल्या हाती घेण्याचं कार्य, ईश्वर कधीही करत नाही. म्हणजेच अकारण व अहेतुक कोणतंच कृत्य वा ढवळाढवळ न करणं हे देखील ईश्वरी ब्रीद आहे, त्या ब्रीदाच्या रक्षणाची जबाबदारी पुन्हा त्याच ईश्वराची.
या सुरळीत चालणाऱ्या व्यवहारात आपली कर्मबंधनाची व कर्मफलाची साखळी आणि त्यायोगे भोग वा उपभोग यांच्या घडण्याची कडी यात ईश्वर हस्तक्षेप करत नाही. यातच आपले भोगसुद्धा आले. परंतु ईश्वर माता या आपल्या भूमिकेतून जगतावर आपली कृपादृष्टी सदैव, नित्य, सतत, अष्टौप्रहर, अखंड, कायम ठेवून असतो. त्या कृपेचा नित्य वर्षाव जगतावर होतच असतो.
त्या अमृतवर्षावाचा झरा नित्य भगवतहृदयातून पाझरत असतो. आपल्याला त्या कृपेचा वर्षाव नित्य जाणवो अथवा न जाणवो, हा वर्षाव होतच असतो. परंतु त्या वर्षावाची जाणीव वा त्याचा परिणाम आपल्याला का जाणवत नाही, असा प्रश्न निर्माण होतो. त्याची कारणं अनेक आहेत. पण एक महत्वाचं कारण म्हणजे हा ओघ, वर्षाव म्हणजे लहरीस्वरूपात असतात, त्यांची जाणीव व परिणाम आपण नित्य ईश्वरचिंतनात असतो वा असू किंवा असलो तरच आपल्याला जाणवेल वा आपल्यापर्यंत पोहोचेल.
नित्य ईश्वरचिंतन म्हणजेच नित्य ईश्वरस्मरण अर्थात त्याला नित्य आठवणे, त्याच्या नामाचा नित्य पुकारा करणे, त्याचा घोष करणे, त्याला स्मरणे, म्हणजेच त्याच्या नामाचं स्मरण करणे.
ईश्वरी कृपेची प्राप्ती करण्यासाठी आणि त्याची जाणीव जागृत करण्यासाठी काय काय करावं हे पुढील भागात पाहूया.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२४/०१/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment