भोग आणि ईश्वर ५९
मत्सरातून उत्पन्न होणारा विकार म्हणजे द्वेष अर्थात जळफळाट ज्याला आपण म्हणू शकतो. मुळात एखाद्यावर मत्सर करण्याचं तार्किक कारण नाही. कारण कर्मसिद्धांत जर समजला आणि पटला, तर कोणतीही व्यक्ती जे मिळवते ते तिच्या तिच्या कर्माने आणि संचितानुसार. मग आपण त्या चित्रात कुठेही बसत नाही. जर आपला एखाद्या व्यक्तीच्या प्रगतीशी काहीही संबंध नाही, तर आपण त्यावर मत्सर व द्वेष करून आपल्याच भौतिक आणि आध्यात्मिक प्रगतीत अडथळा निर्माण करतो.
कारण विचारलहरी वा तरंग हे जसे आपल्याकडून बाहेर पडतात, ते तसेच परत येतात. पण येताना ते कर्मफल सोबत घेऊन येतात. कारण मागे आपण पाहिल्याप्रमाणे कर्म हे काया, वाचा आणि मन या तिन्ही माध्यमातून घडतं. म्हणजेच क्षणोक्षणी आपण जो विचार करतो, ज्या, इच्छा करतो, ज्या कामना मनात धरतो,ज्या विचारांच्या मागे मन धावतं, त्या विचारांचे विखार वा विकार हे स्वतःचा कर्मनाश करतात. म्हणून मत्सर व असूया आणि त्यापासून उत्पन्न होणारा द्वेष हे किती घातक आहेत, ह्याची कल्पना करता येईल.
म्हणूनच आपल्याकडे म्हण आहे जे पेराल तेच उगवेल. पण आपण उगवलं की विचार करत नाही वा तर्क लावत नाही की कर्माच्या सिद्धांतानुसार हे मीच कधीतरी पेरलं असू शकतं, ज्ञात वा स्मरणात असो वा नसो. याच कारणासाठी ज्या ज्यावेळी मन रिकामं असेल त्या त्यावेळी जिव्हेच्या माध्यमातून मनाला नामाचा छंद वा चाळा लावून घ्यायचा. कारण दुसऱ्या कुठल्यातरी नकारात्मक वा अहितकारक छंदापेक्षा नाम घेण्याचा छंद केंव्हाही श्रेष्ठ नव्हे सर्वश्रेष्ठ.
अजून एक जालीम शत्रू आहे आपला, मनाचा आणि आपल्याला अहितकारक मार्गावर नेणारा, तो म्हणजे अहंकार वा दुराभिमान. अहंकार हे अस तण आहे जे मोठ्यातल्या मोठ्या व्यक्तीला रसातळाला नेऊ शकतं वा नेतं. अहंकार हा माणसातील विनम्रता, मार्दवता, मानवता व सद्सद्विवेकबुद्धी नष्ट करतो. जिथे विवेक मनातून नाहीसा होतो, तिथे विचार भरकटत जातात आणि अधोगतीला सुरवात होते.
मनाला अश्या सर्व नकारात्मक, विकारी व विनाशकारी व्यवधानातून वाचवण्यासाठी अनेक उपाय, पुराणकाळा पासून ऋषीमुनी संत महंत दिव्यात्मे यांनी सांगून ठेवले आहेत. त्यातील काही उपाय हे कालबाह्य स्वरूपाचे आहेत. पण मनाला आवर घालून, मनाचा वारू नियंत्रणात ठेवून, त्याला सन्मार्गी नेणारा, एकमेव उपाय जो कालातीत आहे. असं औषध जे सर्व रोगांचा इलाज आहे. ज्याच्यामुळे वरील सर्व विचार, विकार यातून मनाला सावरून पुढे नेऊन आत्मोन्नत्ती साधता येईल.
अश्या या सर्व शत्रूचा बंदोबस्त करणारं एकमेव औषध म्हणजे नामस्मरण. कारण भगवंताच्या स्मरणाने अनेक प्रकारचे भावरोग नष्ट होतात वा दूर जातात. मनाचा हा तोल सांभाळण्याचा निग्रह एकदा केला आणि त्या ध्येयाचा ध्यास मनात धरला की, मनाला इतर काही विकारी विचार करायला उसंत मिळणार नाही आणि मन इतर विषयांच्या व विचारांच्या मागे पळणार नाही.
नामस्मरण करताना एकच तत्व पाळायचं, ते म्हणजे नाम घेत राहायचं. त्यात कोणतीही कसूर होता कामा नये. विषयांच्या स्मरणात असणाऱ्या, क्षणिक सुखाचे दास होऊन, सहा शत्रूंच्या आधीन होऊन, जन्मजन्मांतरीच्या बंधनात अडकण्यापेक्षा, नामाच्या आधीन राहून भगवंतासमीप राहिल्याचा कायमस्वरूपी व अलौकिक आनंद घेत राहणं केंव्हाही सर्वश्रेष्ठ कर्म आहे.
यावर अजून उद्या चर्चा करूया.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२८/०१/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment