भोग आणि ईश्वर ४९
आता क्रिया आणि प्रतिक्रिया यांचा खेळ किती महत्वाचा आहे याचं एक उदाहरण पाहूया. तुम्ही नुकत्याच थांबलेल्या पावसात चालत निघाला आहात आणि वाटेत एक बेडूक साठलेल्या पाण्यातून उडी मारून तुमच्या जवळच्या पाण्यातून उडी मारून पुढे गेला. ज्यामुळे थोडं पाणी तुमच्या कपड्यावर उडालं. त्यावर रागाने तुम्ही त्याला दगड मारलात, तर त्याचं काय नुकसान होईल, ते त्याचं कर्म आणि नशीब ठरवेल. पण तुमच्या अंगावर वा कपड्यांवर थोडा तरी चिखल उडेलच.
हीच गोष्ट प्रतिक्रिया या कर्माने आपण स्वतः घडवून आपल्या खात्यात अजून एका कर्मफलाचा भार टाकतो. ज्या ठिकाणी वा व्यक्तीला प्रतिक्रिया दिल्याने आपला व्यक्तिगत फायदा होणार नाही, त्याठिकाणी प्रतिक्रिया देऊन आपण स्वतःलाच एखाद्या नवीन बंधनात बांधून घेतो.
उदाहरणार्थ एखाद्या विषयावर आपलं मत माहीत असलेला आणि भांडणाची खुमखुमी असलेला एखादा, मुद्दाम त्याच मुद्द्यांचा आधार घेऊन, आपल्याला उकसवून, बोलायला भाग पाडतो. आपण त्याला प्रतिसाद वा प्रतिक्रिया देऊन त्याचा हेतू साध्य करतोच करतो, पण आपण त्या विषयाला त्याच्या व आपल्या मनातील विषाला खतपाणी घालून जिवंत ठेवतो.
यात त्याच्या मनातील नकारात्मक आणि अविवेकी बुद्धीचा ज्वर आपल्या मनात भरतो आणि मग ती नकारात्मकता आपल्या बुद्धीला आणि विवेकाला मारक ठरते. शेवटी यातून निष्पन्न एकच ते म्हणजे क्रिया प्रतिक्रिया यांची शृंखला तयार होते. हे वादविवाद हा एक दाखला झाला. पण सर्वच बाबतीत हे तत्व लागू पडतं. मुळात आपण आधीचे भोग व कर्माचं फल भोगत असताना त्यात अजून भर घालणं म्हणजे अजून अनेक जन्म देह व देहभोग भोगण्याचं चक्र स्वतःसाठी निर्माण करणं आहे.
आपलं रोजचं आयुष्य हासुद्धा आपल्या एकूण कर्माचा भोगांचा आणि उपभोगांचा अविरत चाललेला खेळ आहे. ज्यात आपलं प्रत्येक कर्म मिळवत जातो व भोग वजा करत जातो. ही अविरत व अविश्रांत मालिका आहे. यात दुःख आनंद समाधान सुख क्लेश कष्ट अशी सरमिसळ होत असते. सर्वच गोष्टी कधीही कायमस्वरूपी नाहीत. सुखही नाही आणि दुःखही नाही. सुखात आपण कर्तृत्ववान वाटतो, जग तसा दाखला देतं आणि दुःखात आपण नशिबाला, देवाला व दैवाला दोष देऊन हात झटकतो.
आता इथपर्यंतचं सर्व समजल्यावर यात सुधारणा कधी व कशी सुरू करणार वा करायची हा एक प्रश्न आहे. कारण भोग हे कर्मफल शिल्लक आहे तोपर्यंत आणि शेवटच्या जन्मात शेवटच्या क्षणी सुद्धा माणूस कर्म करत राहणार आणि फलाचा अधिकारी होत राहणार. मग हे चक्र भेदणार
कसं. याचा उपाय जो गीतेत भगवंतानी सांगितला आहे, तो म्हणजे बद्ध होणारी कर्म कमी करणं आणि भोगात आणि सुखात समदृष्टी ठेवणं, जेणेकरून त्यातून अजून बद्ध कर्म आपण निर्माण करणार नाही.
सर्वसामान्य माणसाला , जो भावनावश आहे आणि सुख आणि दुःख यांनी अस्थिर होणारा आहे, त्याला ही समदृष्टी साधून कर्मशून्यता, अर्थात कर्म करून अकर्मी राहणं असंभव आहे. कर्माचा जो सिद्धांत गीतेत मांडला आहे, त्यानुसार कर्म करून त्यात बद्ध न होणे , अर्थात अकर्मी राहणं ज्ञानवंताला शक्य आहे. अर्थात ज्याला पूर्ण ज्ञान प्राप्त झालेलं आहे, त्याला ही समत्वदृष्टी ज्ञानाने प्राप्त होते.
कारण त्याला माहित असतं की, मी करत असलेल्या प्रत्येक कर्मावर असलेल्या फलावर माझा अधिकार नाही. म्हणजे ते कर्म करून झाल्यावर प्राप्त होणारं फल हे कधी, कसं व कुठे भोगायला वा उपभोगायला मिळेल, हे मी नाही जाणत. कारण ते नियतीअधीन आहे. नियती ही कर्माधिन आहे. ती आलेल्या प्रत्येक कर्माचं फल द्यायला बाध्य आहे, पण योग्य वेळी आणि ती योग्य वेळ हे कर्मगती ठरवेल. म्हणजे एखाद्या सुखाच्या प्रसंगी मागील कर्माचं दुःखस्वरूप फल समोर येणं हे कोणाच्याही हाती नाही.
मग या चक्राचा भेद कसा करायचा.
यावर विचार करूया उद्याच्या भागात.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१८/०१/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment