Skip to main content

भोग आणि ईश्वर ४८

भोग आणि ईश्वर  ४८
  
कालचाच धागा पकडून पुढे जाऊया. असा विचार करा की, आपल्याशी संबंध येणारे सर्वजण कुठेतरी आधीच्या वा या जन्मातील काही ऋण वा ऋणानुबंध असणारेच असतात. किंबहुना इतकं ठामपणे नक्की सांगता येईल की, तसे संबंध असणारेच आयुष्यात कुठेतरी कधीतरी काही क्षण वा काळ भेटतात. पण हा काळ किती असेल हे आपले या किंवा गतजन्मातील धागे कसे आहेत वा होते वा कर्मफल काय बाकी आहे त्यानुसार ठरतं.

एखादं ऋण घेतलं की, ते जितकं आहे त्याच्यावरील व्याजासह तितकंच फेडावं लागतं. त्यामुळे सूत्रबद्ध जीवन मांडणारा विधाता नक्कीच याबाबतसुद्धा काही सूत्र ठेवून गेला असेल. त्याचा विचार केला तर लक्षात येईल की, जितकं आपलं देणंघेणं आहे वा असेल, तितकाच काळ वा वेळ आपले एखाद्या व्यक्तीशी संबंध येतात वा येऊ शकतात. म्हणजेच तितकाच काळ ती व्यक्ती आपल्या आयुष्यात येते. 

म्हणजे परस्पर संबंध असणाऱ्या नात्यातील व्यक्तीलासुद्धा हा नियम लागू होतो का. तर नक्कीच होतो. कारण नाती ही संस्कृतीच्या निर्मितीत आणि समाजाच्या रचनेत आपण निर्माण केलीत. अन्यथा विधात्याने दोनच मानवी देह निर्माण केले. थोडंसं वैचारिक गोंधळ निर्माण करणारं वाटेल पण हे सत्य आहे की, आयुष्यात आलेली प्रत्येक व्यक्ती ही तितकाच काळ आपल्या आयुष्यात राहील,जितका काळ हे ऋणानुबंध लिहिले आहेत, आपणच आपल्या गतकर्मानी.

म्हणजे जे काही काळात सोडून गेले त्यांचं काय. त्याचं दुःख करायचं की नाही, की विसरून जायचं. हा थोडा नाजूक आणि गुंतागुंतीचा प्रश्न आहे. कारण काही काही नात्यांमध्ये भावनिक गुंतवणूक असते, काही मर्मबंध असतात, काही काळाची साथसोबत असते. त्याला सहजी विसरता येणार नाही हे सत्य नाकारता येणार नाही. 

पण निदान इतकं तर नक्कीच या वाचनातून वा विवेचनातून मनाला समजावता येईल की, तितकाच काळ हे संबंध राहणं कर्मफलप्राप्त होतं. म्हणून तितकाच काळ ते राहिले. म्हणजे इतक्या कमी काळात ते का संपले, याचं उत्तर तरी तार्किक पद्धतीने मिळतं. अर्थात मन काही मशीन नाही की समजावलं आणि समजलं. पण निदान ह्या ऋणानुबंधाचा सिद्धांत तरी मनाला पटला तरी खूप काही मिळालं, असं मी म्हणेन. 

पण याची दुसरी बाजू अशी की, पुढील जन्मात किंवा त्यानंतर याचा काही संबंध येऊ शकेल वा शकतो का. तर त्याचं उत्तर सोप्प आहे. ते म्हणजे या जन्मात किती ऋण फिटलं वा किती नविन तयार केलं त्यावर ते अवलंबून राहील. दुसरं असं की, हा फक्त आपला स्वतःचा विचार झाला. पण जी व्यक्ती येऊन,बकाही काळ राहून गेली, त्या व्यक्तीच्या कर्मफलाचं आणि त्याच्या ऋणानुबंधाचं काय. 

तर तो विचार आपल्याला करता येणार नाही. पण इतकं नक्की की, जर या जन्मी आधीचे काही ऋण शिल्लक असतील आणि या जन्मी आपण नवीन काही निर्माण केले असतील, तर नक्कीच पुढील जन्मी त्याच्या फेडीसाठी पुनःश्च गाठभेट ही नक्की होऊ शकते

मागे म्हटल्याप्रमाणे कर्म आणि कर्मफल याचं मर्म असं आहे की, हा क्रिया आणि प्रतिक्रियांचा खेळ आहे. म्हणजे आपण कर्म करतो ती क्रिया आणि एखादया कर्मावर, विचारावर, एखाद्याच्या बोलण्यावर, घडलेल्या वा घडत असलेल्या घटनेवर वा प्रसंगावर आपण जी प्रतिक्रिया देतो वा प्रकट होतो तेदेखील कर्मच आहे. ही क्रिया वा प्रतिक्रिया ही काया वाचा वा मन या तिन्हीप्रकारे असू शकेल. म्हणजेच आपण स्वतःसाठी ऋण दोन प्रकारे तयार करतो. एक म्हणजे आपण प्रथम एखादं कर्म करतो त्यावेळी किंवा आपण एखादी प्रतिक्रिया देतो, त्यावेळीसुद्धा, आपण ऋण तयार करतो. 

हे ऋण आणि हा ऋणानुबंध यांचा खेळ वा शृंखला इतकी नित्य होत असते की आपल्याला समजतदेखील नाही आणि आपल्या नकळतपणे ती घडत जाते आणि आपण त्यात बद्ध होत जातो. म्हणजेच यातून एक गोष्ट लक्षात आली का की, आपण स्वतःला बद्ध करू शकतो किंवा नाही हे आपलं कर्म म्हणजेच क्रिया वा प्रतिक्रिया ठरवतं. 

यावर अजून विचार करूया उद्याच्या भागात. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१७/०१/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...